आजच्या घडीला भारतीय राजकारण समजून घ्यायचे असेल तर या देशातील मध्यम वर्गाचे स्वरूप समजून घ्यावे लागेल. या वर्गाचे भारतीय समाजात नेमके कोणते स्थान आहे, त्याची संस्कृती कोणत्या प्रकारची आहे व राजकारणात त्याचा प्रभाव कसा पडतो आहे याची उत्तरे शोधल्याशिवाय आपल्या देशाच्या राजकारणाचा उलगडा होणार नाही. मध्यम वर्ग भारतात पूर्वी नव्हता असे नव्हे पण आज त्याचे प्रमाण प्रचंड प्रमाणावर वाढले आहे. शिवाय त्यातील उच्च स्तरातील लोकांची संख्या विशेषकरून वाढली आहे. नॅशनल कौन्सिल फॉर अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च, दिल्ली या संस्थेने नुकत्याच केलेल्या अभ्यासाप्रमाणे भारतातील छोट्या व मोठ्या शहरांमध्ये २२ हजार ५०० रुपये ते ७० हजार रुपये या मर्यादेत वार्षिक उत्पन्न असलेल्या मध्यम वर्गाची संख्या वाढत चालली आहे आणि ७० हजारहून जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या उच्च मध्यम वर्गाची व श्रीमंतांची संख्या महानगरात व मोठ्या शहरात जास्त वेगाने वाढते आहे. दिल्लीतीलच सेंटर फॉर स्टडीज ऑफ डेव्हलपींग सोसायटीज या संस्थेने केलेल्या नमुना पाहणीनुसार (9१९९६) शिक्षण, पांढरपेशे व्यवसाय, चांगले घर, एखादे व जास्त वाहने, दूरदर्शन संचांसारख्या वस्तू व स्वतः कोणत्या वर्गात आहोत याची जाणीव ही मध्यम वर्गाची वैशिष्ट्ये 'मानली तर भारतात मध्यम वर्गाची संख्या पूर्वीपेक्षा गेल्या दशकात मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. हा वर्ग आता पूर्वीसारखा फक्त उच्च जातींपुरताच मर्यादित राहिलेला नाही. कनिष्ठ जाती व अल्पसंख्याकांचाही समावेष त्यामध्ये होतो आहे. परंपरेमुळे ठरलेली कनिष्ठ सामाजिक प्रतिष्ठा हा मध्यम वर्गात जाण्याच्या मार्गाचा अडसर राहिलेला नाही. तरीही अद्याप मध्यम वर्गात उच्च वर्णायांचीच संख्या जास्त आहे. नव्या जीवन सरणीचा (Life-style) विशेष उल्लेख या अभ्यासात करण्यात आलेला आहे. या जीवनसरणीचा अंगीकार करणाऱ्यांची संख्या देशभर वाढत चालली आहे. या जीवन सरणीची आपण पुढे सविस्तर चर्चा करणार आहोतच पण या ठिकाणी एक उदाहरण मोबाईल फोनचे घेता येईल. दोन वर्षापूर्वी चार महानगरात मिळून एक लाख लोकांकडे हा फोन होता. आज ४७ शहरातील १० लाख लोकांपर्यंत तो पोहोचला आहे. मोबाईल फोनधारक जर उच्च मध्यम वर्गातील व श्रीमंत वर्गातील आहेत असे मानले तर या वर्गाची वाढती संख्या व त्याची बदलती जीवनसरणी दोन्हीही आपल्याला यातून समजते. महांनगरातील मध्यमवर्गीय गेल्या काही वर्षात उच्चमध्यम वर्गात येतो आहे. एवढेच नव्हे तर महानगर व मोठ्या शहरांबाहेरही मध्यम वर्ग वाढतो आहे. छोट्या शहरात - अर्धशहरी भागातही तो दिसू लागला आहे. भावनगर, इंदूर, जलंदर, मीरत, बेळगाव, जळगाव, वॉल्टेर, मडगाव, कटक अशा छोट्या शहरांत मध्यम व उच्चमध्यम वर्गाची संख्या नजरेत भरण्याएवढी वाढली आहे. कृषिक्षेत्रतून आधिक्य मिळविणार्या जातींमधूनही या वर्गाची संख्या वाढते आहे.
वाढत्या वर्गाच्या वाढीची कारणे
गेल्या एक दीड दशकात मध्यम वर्गाचे प्रमाण व व्याप्ती एवढी वाढली आहे. याला कारणीभूत आहे आपण स्वीकारलेली अर्थनीती. आपल्या देशात भांडवलशाहीचा विकास एका विशिष्ट पद्धतीने झालेला आहे. ती पद्धत नवा मध्यम वर्ग निर्माण करण्यास व त्याचे प्रमाणास वाढविण्यास मुख्यत्वे करून साहाय्यभूत झाली आहे. या अर्थनीतीची सुरुवात १९८० नंतर जी इंदिरा राजवट आठी त्यापासून एका प्रकारे झाली. मारुती गाडीचे उत्पादन १९८३ मध्ये सुरू झाले. ही घटना आपल्या समाजात जो नवा मध्यम वर्ग आकार घेणार होता त्याच्या आगमनाचे चिन्ह म्हणून पाहता येते. परंतु या अर्थनीतीचा खरा प्रारंभ झाला राजीव गांधींच्या काळात, १९८४ नंतर. एकविसाव्या शतकात पदार्पण करताना समाजवादाला सोडचिठ्ठी देणे व उच्च वर्गीयांना उघडपणे साहाय्य करणारे आर्थिक धोरण अंगीकारणे, ही नीती राजीवने आपल्या नव्या राजवटीत पुढे रेटली. रेगन - थॅचर - राजीव अशी अदृश्य साखळी असल्याचा भास या काळात झाला तो या धोरणामुळेच. याचीच तार्किक परिणती पुढे नरसिंहराव यांच्या १९९१ नंतरच्या राजवटीत मनमोहनसिंगप्रणित नव्या आर्थिक धोरणात झाली. उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण या तीन सुत्रांमध्ये या धोरणांचे वर्णन करता येते. राज्यसंस्थेपेक्षा खाजगी क्षेत्र व नोकरशाहीपेक्षा स्वयंसेवी संस्था जास्त कार्यक्षम व योग्य असा विचार पुढे आला तो याच धोरणाअंतर्गत. भारतीय व आंतरराष्ट्रीय भांडवलशाही त्या काळात ज्या अवस्थेला येऊन ठेपली होती त्याला उपकारक अशी अर्थनीती व या अर्थानीतीमुळे विकसित झालेली भांडवलशाही अशी एकमेकांना सहाय्य करणारी हातमिळवणी या टप्प्यात दृष्टीस पडली. अशा प्रकारे १९८४-८५ पासून सुरू झालेल्या प्रक्रियेमुळे आपल्या अर्थव्यवस्थेत प्रचंड प्रमाणात गुंतवणूक होऊ लागली. हजारो कोटी रुपयांनी गुंतवणूक वाढठी. बाजारात १००० कोटी पेक्षा जास्त भांडवल गोळा होईल असे भाग विक्रीस आले. त्यांना पूर्वी कधी नव्हता इतका प्रतिसाद मिळाला. गुंतवणूकदारांची संख्या लाखोंनी वाढली. परदेशी भांडवलाचा ओघ सुरू झाला. अनिवासी भारतीयांनी गुंतवणूक करण्यास मोठ्या प्रमाणावर सुरूवात केली - भागभांडवलाचा बाजार हा चर्चेचा विषय झाला. परंतु अलीकडेच अर्थशास्त्रज्ञांनी केलेल्या पाहणीनुसार भारतीय अर्थव्यवस्थेत जेवढी गुंतवणूक झाली त्याप्रमाणात वस्तूंचे उत्पादन मात्र वाढले नाही. औद्योगिक भांडवलापेक्षा वित्तीय भांडवलाचे प्राबल्य वाढल्याचे हे लक्षण आहे. याचाच परिणाम म्हणून वित्तीय संस्थांचे अर्थव्यवस्थेतील महत्त्व वाढले आहे. या भागभांडवलाच्या बाजारात स्वारस्य असलेला एक उपरा वर्ग त्यातूनच निर्माण झाला. त्याचप्रमाणे प्रस्थापित औद्योगिक भांडवलाबरोबर स्पर्धा करणारा उपटसुंभ भांडवलदारांचा वर्ग उदयास आला. त्यातून त्यांची आर्थिक साम्राज्येही स्थापन झाली. उद्योगधंदे गिळंकृत करण्याचा प्रकारही गेल्या काही वर्षात वाढला आहे. वित्तीय संस्थांचे व्यवस्थापन व कंपन्यांचे व्यवस्थापन यांचे संबंध प्रभावी ठरू लागले आहेत. वित्तीय भांडवलाचे प्राबल्य वाढत असताना औद्योगिक भांडवलाचा कारभार कामगार विरोधी होत गेला. अनौपचारिक, असंघटित व विकेंद्रित उत्पादन क्रियेचा अवलंब वाढला. मोठे कारखाने वेगवेगळ्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या भागांची जुळवणी करणारी केंद्रे झाली. भांडवल केंद्रित उच्च तंत्रज्ञानावर आधारित उत्पादनपद्धत वापरण्यात येऊ लागठी. या सर्व प्रकारामुळे एका बाजूला कामगार वर्गाची ताकद कमी कमी होऊ लागली तर दुसऱ्या बाजूला व्यवस्थापकांचे पांढरपेशा कर्मचाऱ्यांचे महत्त्व वाढू लागले. सेवाक्षेत्राचे अर्थकारणातील योगदान मोठ्या प्रमाणावर वाढले, संगणकयंत्र, दूरसंचार इत्यादी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानामुळे सेवाक्षेत्राचा विकास होऊ लागला. तसेच पर्यटन नावाचा नवा उद्योग वाढला. हॉटेल उद्योग, वाहतूक उद्योग यांची वाढ झाली. बांधकाम उद्योगाची चलती झाली. सॉफ्टवेअर उद्योगात आपला देश जागतिक स्पर्धेत पुढे गेला. जाहिरात उद्योगातील गुंतवणूक वाढली. पाक्षिके व आर्थिक विषयांना वाहिलेली नियतकालिके यांच्यात वाढ झाली. जनसंपर्क उद्योगाचे महत्त्व वाढले. समांतर अर्थव्यवस्था व प्रस्थापित अर्थव्यवस्था यांचे लागेबांधे वाढले. शहरीकरणाचा वेग १९८१ च्या जनगणनेपासून १९९१ च्या जनगणनेपर्यंत व नंतरच्या दशकात वाढला आहे. ज्या प्रमाणात गुंतवणूक वाढली त्या प्रमाणात उत्पादन वाढले नाहीच पण रोजगारही वाढला नाही. त्यामुळे बेकारीचे प्रमाण मात्र वाढले. समांतर अर्थव्यवस्थेला त्यातून काही मनुष्यबळ मिळाले.
अशा भांडवलशाही विकास प्रक्रियेतून या समाजात मध्यम वर्गाची निर्मिती व वाढ झाली आहे. हा मध्यम वर्ग भांडवलदार वर्गाशी संधान जोडून आहे. याचा या व्यवस्थेत हिसंबंध गुंतलेला आहे. त्याने भांडवलशाही संस्कृती आपलीशी केली आहे. तेथील जीवघेणी स्पर्धा, हिंसेवर आधारलेली नफेखोरी, विनाविलंब व अचानक मिळणारा लाभ, प्रतिस्पर्ध्यावर मात करण्याची वृत्ती. आर्थिक व पांढरपेशीय गुन्हेगारी या सर्व गोष्टी त्याने आता अंगीकारल्या आहेत. हर्षद मेहता हा या नव्या मध्यम वर्गाचा हिरो बनला होता. राजीव गांधींच्या काळात संसूचन व दूरसंचार क्षेत्रात काम करणारा तंत्रज्ञ सॅम पिट्रोडा हा त्याचा पहिला हिरो होता. तर पुढच्या काळात निवडणूक प्रक्रियेत क्रांती घडविणारे शेषन यांस त्याने आपला आदर्श मानले. या तीन आदर्शातून त्याची वृत्ती कळते. त्याला आधुनिक तंत्रज्ञानाचे आकर्षण आहे. हातचलाखी करून प्रचंड पैसा मिळविण्याची महत्त्वाकांक्षा तो बाळगतो व एकाधिकारशाही पद्धतीची मनमानी करून नेत्यांवर जरब बसविण्याबद्दल त्याला आदर आहे. एका जबरदस्त नेत्याच्या हातात सर्व कारभार देऊन शिस्त लावणे ही गोष्ट त्याला आकर्षित करते. हिंसेचा मार्ग अनुसरायला तो मागेपुढे पहात नाही. मार्गाबद्दल तो आग्रही नाही पण त्याला कमी वेळ घेणारे चटकन ध्येय साध्य होऊ शकेल असे शॉर्टकटस् आवडतात. तो स्वत: हिंसा करेलच असे नव्हे पण दुसऱ्याकडून ती करवून घेण्यात त्याला काहीच अयोग्य वाटत नाही. तो स्वतः भ्रष्टाचारी व्यवस्थेत व अर्थकारणात पूर्ण बुडालेला आहे. तो वस्तूंच्या मागे लागलेला आहे. सुपर मार्केटमध्ये वेळ घालवायला त्याला आवडते. आपल्या जीवनसरणीमुळे मिळणारी सामाजिक प्रतिष्ठा त्याला प्रिय आहे. इतरांच्या मनात ईर्षा निर्माण करण्यात त्याला रस आहे. स्वतःच्या मुलाबाळांना स्पर्धेत कसे टिकून राहायचे, हातचलाखी करून व डावपेच खेळत पुढे कसे जायचे याचे धडे तो देतो. व्यवहारवाद हे त्याचे तत्वज्ञान आहे. त्याचे परदेशातील त्याच्या सारख्या वर्गाशी भावनिक संबंध आहेत. या वर्गाला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले आहे. आंतरराष्ट्रीय अर्थकारणामुळे, व संचरण क्रांतीमुळे हे शक्य झाले आहे. या वर्गाचे तत्वज्ञान आपल्याला संपर्क माध्यमातून व दूरदर्शनवरील मालिकांमध्ये प्रतिबिंबित झालेले दिसते. पूर्वी ब्राह्मण वर्ण जातीप्रमाणे आपली जीवनसरणी असावी असा कनिष्ठ जातींचा प्रयत्न असे. आज या नव्या मध्यम वर्गाप्रमाणे आपण जगावे - वागावे अशी इच्छा. इतर सर्व वर्गात निर्माण झाली आहे किंवा होऊ पाहात आहे.
मध्यम वर्गाचे राजकारण
भारतीय समाजात एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेला अर्थकारणात व समाजकारणात कळीच्या जागा अडवून बसलेला व स्वतःची संस्कृती व जगण्याची तऱ्हा सर्व समाजाला आदर्श वाटायला लावणारा मध्यम वर्ग राजकारणामध्ये हस्तक्षेप करणार हे क्रमप्राप्तच आहे. परंतु मध्यमवर्गाचा राजकारण आणि राज्यसंस्थेकडे पाहण्याचा दृष्टिकोण अंतर्विरोधाने भरलेला आहे याची नोंद प्रथम घेतली पाहिजे. खाजगीकरणाच्या लाटेवर आरूढ झाल्यावर राज्यसंस्थेने आपले बस्तान गुंडाळावे असे त्याला वाटायला लागले. कमकुवत गटांना कल्याणकारी योजनांमार्फत विनाकारण मदत करू नये असे त्याचे मत असते. प्रत्येकाने आपआपली लायकी वाढवून विकास करून घ्यावा या मताचा पुरस्कार हा वर्ग करतो. आरक्षणाच्या धोरणाला त्यांचा विरोध असतो तो यासाठीच राजकारणी नेते वरच्या पदावर - सत्तेच्या स्थानी लायकी नसताना जाऊन बसले आहेत. निरक्षर व सामान्य लोकांना जातीच्या मुद्यावर भूलवून हे नेते सत्ता काबीज करतात व नंतर अकार्यक्षम पद्धतीने कारभार करतात. त्यांना खरेतर काही कळत नसते. लोकशाही कोणालाही मोठे करते. आरक्षणाने नोकरशाहीत अकार्यक्षमता वाढली आहे. भ्रष्टाचारही वाढला आहे असे या वर्गाला वाटते. लालू प्रसाद, मुलायमसिंग सारखे नेते त्याला नकोसे वाटतात. त्यांच्या भ्रष्टाचाराच्या गोष्टी या वर्गाच्या संपर्कमाध्यमातून चविष्ठपणे सांगितल्या जातात. स्वतः पांढरपेशी व आर्थिक गुन्हे करण्यात वाकबगार असलेला हा वर्ग राजकारण्यांच्या भ्रष्टाचारास मात्र विटलेला असतो. त्याला शेषनसारखे नेते आवडतात. जनसमुदायांचे राजकारण करणाऱ्या नेत्यांचा त्यांना राग असतो. मागास व कनिष्ठ जातींच्या नेत्यांबद्दल त्यांच्या मनात उपजतच अढी असते. त्याच्यावर विनोद करणे, त्याची व्यंगचित्रे रंगविणे यात या वर्गाला स्वारस्य असते. यांच्या उच्चभू पार्टीत या नेत्यांच्या खऱ्याखोट्या कथा रंगवून सांगितल्या जातात. तर अशा या वर्गास राजकारणात स्वारस्य निर्मोण झाले राजीव गांधींच्या राजवटीत. त्यांनी जेव्हा स्वच्छ प्रशासनाची घोषणा दिली तेव्हा त्यांनी कॉम्युटर बॉईजना महत्त्व दिले. सॅम पिट्रोडाला पुढे आणले. समाजवादाला मागे टाकले. व्यवस्थापकीय पद्धतीचे आधुनिक राजकारण सुरू करण्याचा प्रयत्न केला. मोठ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांचे किंवा तज्ञांचे महत्त्व वाढविले. २१ व्या शतकात जाण्यासाठी हाक दिली. निवडणूक मोहीमही पोलीटिकल मार्केटिंग पद्धतीने चालविली. डून स्कूल मधील मित्रांना राजकारणात ओढले. एल.के.झा यांचा अर्थकारणात सल्ला घेता. राजकारणाच्या या पद्धतीचे आकर्षण वाटून नवा मध्यम वर्ग - जो त्या काळात आकार घेत होता - त्यांच्या राजकारणाकडे सकारात्मक दृष्टीने पाहू लागला होता. अरूणसिंग, अरूण नेहरू, सतीश शर्मा यांसारखे त्यांच्या विचारांचे प्रतिनिधी राजकारणात दिसू लागल्याने त्यांना ते जवळचे वाटू लागले. राजीव गांधीच त्यांना स्वत:च्या वर्गाचे प्रतिनिधी वाटू लागले असेही म्हणता येईल. पण सर्व काही पुढे बदलले. व्ही.पी. सिंगांचे सरकार आले. आणि पुन्हा एकदा मध्यम वर्गाला राजकारण्यांचा तिटकारा येऊ लागला. त्यात मंडल आयोगाच्या शिफारसी सरकारने स्वीकारल्या मंडलविरोधी आंदोलनात मध्यम वर्गीयांचा दृष्टिकोन प्रतिबिंबित झाला होता असे म्हटले तर चुकीचे होणार नाही. याच काळात आक्रमक हिंदुत्वाचा पाया रचण्यात आला, मध्यम वर्गास या आक्रमकतेने आकर्षून घेतले, आपण व ते असा फरक करण्याची पद्धत या वर्गाने याच काळात स्पष्टपणे व्यक्त केली असे म्हणता येईल.
१९८४ मध्ये शिखांच्या बाबतीत, मंडलच्या वेळी मागासजातींबाबतीत तर हिंदुत्वाच्या आक्रमक लाटेत मुस्लिमांबाबत आपण व ते अशी भावना चेतवण्यात या वर्गाने पुढाकार घेतला. रथयात्रेचे चित्रण व स्वागत ज्या पद्धतीने संपर्कमाध्यमांनी केले त्यावरून त्यामागील विचार मध्यम वर्गाला आपला कसा वाटत होता हे दिसून येते. राममंदिराच्या प्रकरणात संघ परिवारातील कनिष्ठ मध्यम वर्ग व नवा मध्यम वर्ग प्रथमच एका व्यासपीठावर आले. त्यांच्यातील अंतर्विरोध एका प्रकारे व्यक्त होत असतानाच त्यावर मात करण्यात आली ती जनसमूहांच्या कृतिशीलतेतून हिंदुत्वाचा हा आविष्कार नव्या व जुन्या मध्यम वर्गाला भावला व त्याचे राजकारण पुढे येऊ लागले. या राजकारणाला वैचारिक तात्विक आधार देण्याचे काम मध्यम वर्गाने केले. सांस्कृतिक क्षेत्राने केले. त्याचा परिपाक बाबरी मशीद पाडण्यात झाला. मुस्लिमांचा जमातवाद पुढे करून अत्यंत पद्धतशीरपणे हिंसक कृती करण्यास प्रवृत्त करण्यास मध्यम वर्गाने प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे साहाय्य केले. त्यास वैचारिक समर्थन मिळवून दिले, पाठिंबा दिला. त्यानंतरच्या दंगलीत काही ठिकाणी इतरांकरवी सहभागी होऊन आपल्या राजकारणाची पातळी दाखवून दिली. दुसऱ्या बाजूला याच वर्गातील उच्चभ्रू मनमोहनसिंग यांच्यावर फारच खूष होते. मनमोहनसिंग यांच्या नव्या आर्थिक धोरणात त्यांना त्यांच्या हितसंबंधांचे प्रथमच प्रतिबिंब पडलेले दिसले. त्यांची अंदाजपत्रकावरील भाषणे दूरदर्शनवर पाहणे किंवा पालखीवालांची अंदाजपत्रकावरील व्याख्याने प्रत्यक्ष ऐकणे या गोष्टी नव्या मध्यम वर्गास सुखावणाऱ्या वाटल्या. याच कालखंडात या वर्गाची वाढ जोमाने झाली व त्याचा समाजातील प्रभावही वाढला. ज्या पद्धतीचे जीवन त्याला अपेक्षित होते ती पद्धत अनुसरणे त्याला याच काळात खऱ्या अर्थाने शक्य झाले. ज्या गोष्टीसाठी तो तडफडत होता त्या सर्व त्याला सहजरित्या आता मिळू लागल्या त्यामुळे. मनमोहनसिंग नव्या मध्यम वर्गात लोकप्रिय झाले. परंतु मनमोहनसिंगांचा पक्ष या वर्गास पसंत नव्हता. ते भाजपमध्ये असते तर त्याला आवडले असते. केंद्रात कॉंग्रेसचे सरकार असताना महाराष्ट्रासारख्या राज्यात भाजप-शिवसेना युतीचे राज्य आले युतीच्या सरकारने आपण खाजगीकरण, जागतिकीकरण व उदारीकरण याचाच पाठपुरावा करणार आहोत हे स्पष्टपणे दाखवून दिले. त्यामुळे भाजपचे आर्थिक धोरणं प्रत्यक्षात काय असणार हे त्याला कळाले. भाजपने १९९२ चा बाबरी मशीद पाडण्याच्या प्रकारापासून आपला पाठींबा वाढवित नेला होता. त्यात एक प्रभावी घटक होता हा मध्यम वर्ग. पुढे १९९६ च्या निवडणुकीत भाजपने १६० जागा मिळवून केंद्रात सत्ता संपादन करू शकतो असे दाखवून दिले. वाजपेयींचे अल्पकालीन मंत्रीमंडल सत्तेवरही आले. पण इतरांनी पाठींबा देण्यास नकार दिल्याने त्यास राजीनामा द्यावा लागला व आघाडीचे सरकार आले. आघाडी सरकारमुळे अस्थिरता निर्माण झाल्याची हाकाटी देण्यात आठी. देवेगौडा हा हंबल फॉर्मर मध्यम वर्गाला न पटणारा होता. काँग्रेस पक्षाचे नेतृत्व केसरींकडे आल्यावर त्या पक्षाबद्दलची अप्रीती वाढली. लवकरच निवडणुका जाहीर झाल्या. निवडणुकीच्या प्रचार मोहिमेत भाजप सत्तेवर येणार अशी हवा पद्धतशीरपणे संपर्कमाध्यमांनी (ज्यामध्ये काम करणारे मध्यम वर्गाचे आहेत) निर्माण केली. त्यामुळे प्रादेशिक व छोट्यामोठ्या गटांनी भाजपबरोबर युती केली. परिणामतः सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप निवडून आला. अटलबिहारी वाजपेयी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करून काठावरील मध्यमवर्गाला भाजपने आपलेसे केले होते. मवाळ, कविता करणारा, शहरी, उच्च जातीचा व परिणामकारक भाषणे करणारा अनुभवी नेता म्हणून मध्यम वर्गाला त्यांचे आकर्षण निर्माण झाले. भाजपची आघाडी सत्तेवर आली. जणूकाही एकट्या भाजपचेच सरकार सत्तेवर आले आहे असा आभास तयार झाला. मध्यम वर्गापुढील पेच सुटला. राजकारणात आपला प्रतिनिधी कोण या संभ्रमात पडलेला हा वर्ग आता भाजपकडे आशेने पहतो आहे. या वर्गाने १९९८ च्या निवडणुकीत या पक्षाच्या बाजूने आपले वजन टाकले. हिंदुत्ववादाला डावपेचाचा भाग म्हणून मागे टाकणे व व्यवहारवादी भूमिका घेऊन कोणाशीही युती करून सत्ता काबीज करणे व आपला कार्यभाग साधणे आणि हे सर्व करताना वाजपेयींसारखा नेता पंतप्रधान म्हणून असणे हा प्रकार मध्यम वर्गाच्या संस्कृतीत बसणाराच आहे. दुटप्पी मूल्यव्यवस्था बाळगणारा व स्पर्धेत पुढे जाण्यासाठी प्रसंगी समझोता करणारा, त्याच वेळी नैतिक मुलामा देणारा दांभिक व्यवहार म्हणून हा प्रकार नव्या मध्यम वर्गाच्य चौकटीत बसतो. भाजपला व संघाला पूर्वापार कनिष्ठ मध्यम वर्गाचा, सुशिक्षित शहरी वर्गाचा पाठिंबा मिळतच असे. पण हा वर्ग संख्येने थोडा होता व समाजात त्याचे म्हणावे तसे प्राबल्यही नव्हते. त्यामुळे जरी व्यापारी व छोट्या व्यावसायिकांचा पाठिंबा जोडीला होता तरी भाजप सत्तेच्या जवळपास फिरकू शकत नव्हता. परंतु गेल्या दहा-पंधरा वर्षात झपाट्याने वाढलेला, समाजात मानाचे स्थान मिळवलेला मध्यम वर्ग जेव्हा भाजप आपला पक्ष मानू लागला तेव्हा भाजपला सत्तेच्या जवळ जाण्याची शक्यता निर्माण झाली. अर्थात आक्रमक हिंदुत्वाला प्रतिसाद देणारी किंवा सत्तेवर येणार म्हटल्यावर त्याच्या पारड्यात वजन टाकणारी मंडळीही भाजपचा पाठिंबा वाढविण्यास मदत करीत आहेतच. जातवादी पक्षाचे व नेत्यांचे ज्याप्रकारे सीमांतीकरण होत आहे ते मध्यम वर्गास भावणारेच आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाचे आयतेच हत्यार व सत्ता हातात असल्यामुळे आज या नेत्यांचे सीमांतीकरण भाजप करणार असेल तर भाजपबाबतचे मध्यम वर्गाचे प्रेम वाढेलच. स्वदेशीबाबतच्या दुटप्पी भूमिकेचाही विचार केला पाहिजे. एकाच वेळी जागतिकीकरणाचा व स्वदेशीचा घोष करणे, तडजोडवादी व्यावहारिक भूमिका घेऊन परदेशी भांडवलाशी हातमिळवणी करणे, त्यात अनिवासी भारतीयांना प्राधान्य देणे वगैरे गोष्टी मध्यम वर्गाला पटणाऱ्याच आहेत. औद्योगिक भांडवल, वित्तीय भांडवल, व्यवस्थापन, व्यापार, सेवाक्षेत्र व भांडवली शेती या वर्तुळातील मालक-भांडवलदार-श्रीमंत वर्ग व उच्च मध्यम वर्ग यांच्यात उद्दिष्ठांबाबत, मार्गाबाबत एकवाक्यता आली आहे. व्यवस्थापनात उच्चस्थानी असठेला उच्च मध्यमवर्गीय अधिकारी केव्हा स्वतःच मालकांच्या बाजूला जाऊन बसेल हे सांगता येंत नाही. शिवाय मध्यम वर्गाचे आदर्श मोठमोठे भांडवलदार होऊ लागले आहेत त्यामुळे त्यांच्या व मध्यम वर्गाच्या विचारात अंतरच राहिलेले नाही. भांडवलदार वर्गातील परदेशी शिकून आलेली नवी पिढी आधुनिक व्यवस्थापनाच्या तत्वाप्रमाणे कारभार करते. उच्चशिक्षित अधिकारी किंवा तंत्रज्ञ व ही नवी पिढी यांच्यात दरी राहिलेली नाही. त्यांची मूल्यव्यवस्था एकच झालेली आहे. हा उच्च अधिकाऱ्यांचा वर्ग व जाहिरात क्षेत्रातील नवी पिढी, संपर्क माध्यमांतील नवी पिढी यांच्यातही एकसारखेपणा आला आहे. परिणामी मध्यम वर्गाची व मालक वर्गाची विचारप्रणाली यात साम्य निर्माण झाठे आहे. जांगतिकीकरण, खाजगीकरण उदारीकरण, नवी जीवनसरणी, यांबाबत त्यांच्यात एकमत आहे. आता राजकारणात जर याच विचारपद्धतीचे व कार्यपद्धतीचे नेते असतील तर त्यांना ते राजकारण जवळचे वाटणार हे साहजिकच आहे. प्रमोद महाजन, सुरेश कलमाडी, सुषमा स्वराज हे मध्यम वर्गाला आपले प्रतिनिधी वाटतात याचे कारण हेच आहे. शेकडो माजी लष्करी अधिकारी भाजपमध्ये एका वेळी प्रवेश करतात हे हा पक्ष मध्यम वर्गाला प्रिय वाटू लागला आहे याचेच लक्षण मानावे लागेल. पूर्व सैनिक सेवा परिषद, विद्या भारती, भारतीय अध्यापक परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विज्ञान भारती, अखिल भारतीय अधिवक्त (वकील) परिषद, विदेश विभाग, सेवा भारती, भारतीय मजदूर संघ (त्यातील पांढरपेशी कर्मचाऱ्यांच्या संघटना) संघ परिवारातील या संघटना म्हणजे मध्यम वर्गाला आकृष्ठ करणाऱ्या राजकारणाचा भाग आहेत व मध्यम वर्गाला यासाठीच भाजपबाबत ममत्व वाटते. संघाचे नेतृत्व आजही सुशिक्षित मध्यम वर्गातून आलेले आहे हे या ठिकाणी विसरून चालणार नाही, चातुर्वर्ण व्यवस्थेतील संकुचित पावित्र्य आक्रमक हिंदुत्वाला अटकाव करणारे ठरेल हे ओळखून देवरसांच्या संघाने सावरकरी हिंदुत्वाचा अंगीकार केला व ब्राम्हणेतर जातीतील नव्याने उदयाला येणाऱ्या मध्यम वर्गाला आकर्षित करून घेण्यास सुरूवात केली. त्याच्या परिणामी संघ परिवाराला आपला सामाजिक आधार विस्तृत करता आला हेही ध्यानात घेतले पाहिजे. भाजपचा भारतीय राजकारणातील उदय व मध्यम वर्गाचा भारतीय समाजातील वाढता प्रभाव या एकाच कालखंडात घडलेल्या घटना म्हणजे योगायोग नव्हे.
-----------------------------------------------------------------
संयोग: दिवाळी विशेषांक (१९९८) मध्ये प्रकाशित