समाज-जीवनात धर्माचे नेमके स्थान कोणते असावे, यावर आपल्या देशात अलीकडे गणित उलट-सुलट चर्चा झाली आहे. ही चर्चा मुख्यतः धर्मनिरपेक्षता व जमातवाद या दोन ध्रुवांवर केंद्रित झालेली आहे. धर्म व राज्यसंस्था/ शासनसंस्था, तसेच धर्म व राजकारण यांची कार्यक्षेत्रे एकमेकांपासून अलग असावीत. धर्माचे स्थान व्यक्तीच्या खाजगी जीवनापूरते सीमित असावे. शासनसंस्थेचे कायदे किंवा सार्वजनिक व्यवहार यांची धर्मापासून फारकत केली जावी आणि सर्व धर्म समभाव हे धोरण स्वीकारावे. या गोष्टींचा समावेश सामान्यतः धर्मनिरपेक्षता या विचारप्रवाहात होतो. धर्मनिरपेक्षतेच्या विरुद्धची टोक म्हणजे जमातवाद. धर्माने निश्चित केल्याप्रमाणे आणि धर्म शास्त्रात सांगितल्याप्रमाणे व्यक्तिगत व सामाजिक जीवन, धार्मिक अस्मितेवर आधारलेला राष्ट्रवाद व राजकारण, परधर्मीयांबद्दल शत्रुत्वाची भावना आणि धर्माभिमानाचा अतिरेक म्हणजे जमातवाद, असे थोडक्यात म्हणता येईल.
हिंसक जमातवाद
गेल्या दोन दशकांत जमतवादाचा जोर फारच वाढताना दिसतो आहे. शहाबानो खटला व रामजन्मभूमी आंदोलनापासून सुरू झालेली जमातवादाची लाट धर्मनिरपेक्षता थोपवू शकली नाही. जमातवादाचा पर्याय म्हणून धर्मनिरपेक्षतावाद उभा राहू शकला नाही. जमातवाद जसजसा आक्रमक व हिंसक झाला तसतसा धर्मनिरपेक्षतावाद अपुरा पडू लागला. धर्मनिरपेक्ष विचाराची प्रतिमा जनमानसात उठली तीच मुळी धर्मविरोधी विचार म्हणून. नकारात्मक भूमिका घेणारा प्रवाह म्हणून. जनसामान्यांच्या दर्भ भावनेचा आदर न करणारा विचार म्हणून. धर्मनिरपेक्षतावाद म्हणजे बुद्धिवाद असा आहे टोकाचा अर्थ घेतला गेला. अल्पसंख्यांक जमातींचे लाड करणारे, लांगूलचालन करणारे राजकारण म्हणजे धर्मनिरपेक्षता, असा आरोप करणे हिंदुत्ववादी शक्तींना सहज शक्य झाले, असे वर्तन काँग्रेस या सत्ताधारी पक्षाने किंवा डाव्या पक्षांनी केले. त्यामुळेच नकली धर्मनिरपेक्षतेचे विशेषण भाजपला वापरता आले. जमातवादाने आक्रमक व हिंसक रूप धारण केले नव्हते तोपर्यंत धर्मनिरपेक्ष विचार काही प्रमाणात तरी एक पर्याय म्हणून उपयोगी पडू शकला; पण १९८० नंतर जमतवादाने हिंसा वादाचा अंगीकार केला व सत्तेवर येण्याचे गणित आखले, तेव्हा हा विचार तोकडा पडू लागला. पण हे धर्मनिरपेक्ष शक्तींच्या लक्षात आले नाही. ते पूर्वीचेच पाढे(फक्त मोठ्याने) म्हणत राहिले. स्वतंत्र भारताच्या राज्यसंस्थेला अधिमान्यता मिळवून देणाऱ्या नेहरूप्रणित विचारधारेचा धर्मनिरपेक्षता हा एक एक महत्त्वाचा भाग होता, याकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले व त्याला एक सार्वकालिक सत्य म्हणून पहिले गेले.
नंदी व मदन यांची टीका
आशिष नंदी व टी.एन.मदन या हिंदुत्ववादी छावणीत नसलेल्या विचारवंतांनी धर्मनिरपेक्षतेच्या मर्यादा त्यांच्या लेखनातून ठळकपणे मांडल्या आहेत. धार्मिक असहिष्णूतेमुळे ते निर्माण झालेल्या भीतीशी दोन हात करणे धर्मनिरपेक्षतेमुळे शक्य होत नाही. या असहिष्णूतेमुळे निर्माण होणाऱ्या हिंसेपासून संरक्षण देणेही तिला शक्य होत नाही. वंशसंहार, हत्याकांड यांसारख्या या गोष्टींना समर्थन मिळवून देणाऱ्या या शक्तींना अटकाव करणेही धर्मनिरपेक्षतेस झेपत नाही. धर्मनिरपेक्षतेचा अर्थ बुद्धीवापरापुरता मर्यादित करणे हे योग्य नाही, हेही धर्मनिरपेक्षतावाद्यांना कळत नाही. धर्माची मानवी जीवनातील अधिमान्यताच धर्मनिरपेक्षतावादी नाकारतात, त्याची प्रतिक्रिया म्हणून त्यांच्या विचाराला विरोध होतो. तो परकीय विचार आहे, असे सांगणे सोपे जाते. अशा शब्दात नंदी व मदन यांनी धर्मनिरपेक्षतेवर टीका केली आहे.
नंदिनीच्या मते आपण धर्मनिरपेक्षता व जमातवाद यांना पर्याय शोधला पाहिजे आणि तो पर्याय त्यांना आधुनिक पूर्व धार्मिक सहिष्णुतेत सापडतो. आधुनिकपूर्व व धर्मनिरपेक्षतापूर्व धर्मसंकल्पनेची पुनर्स्थापना करणे हा मार्ग ते सुचवितात. ही धर्मसंकल्पना म्हणजे सर्वसमावेशक सहिष्णू श्रद्धा होती, एक जीवनपद्धती होती. या देशात शतकानुशतके चालत आलेल्या पारंपरिक जीवनपद्धतीत सहिष्णुतेची तत्त्वे विकसित झाली होती. अनेक धर्मसंप्रदायाचे सहअस्तित्व व सहजीवन ही बाब या पद्धतीचा अविभाज्य भाग होती. अशोकाची सहिष्णुता बौद्ध धर्मावर तर अकबराची इस्लामवर आधारलेली होती. गांधीजींची सहिष्णुता हिंदू धर्मातून आलेली होती. यातील कोणाचीही सहिष्णुतेची संकल्पना धर्मनिरपेक्षतेवर बेतलेली नव्हती.
आधुनिकतेचे पासून दूर असलेल्या जनसामान्यांच्या जीवनात धर्मसंस्थेचे हे स्थान आहे, त्यातूनच खरी सहिष्णुता येऊ शकते आणि आजपर्यंत आलेली आहे. धर्मनिरपेक्षतेच्या विचारप्रणालीकडून नवे शिकण्याची गरज सामान्य लोकांना नाही.
मदन यांच्यामध्ये धर्मश्रद्धामधून अलगता व त्यामुळे धार्मिक कलह निर्माण होतात, हे तितकेसे बरोबर नाही. याला भारतीय इतिहास साक्षी आहे. धार्मिक क्षेत्रातील परत लोकांनी मान्य केला होता. आणि स्वतःची स्वतंत्र ओळख जपली होती. सामाजिक सलोखा राखला होता तो साहजिकपणे- कृत्रिमपणे नव्हे. आधुनिक विचारप्रणालीच्या दबावाखाली धार्मिक वैविध्यास मान्यता देणे, असा हा प्रकार नव्हता. त्यांच्या जीवनपद्धतीचा तो अविभाज्य व साहजीक भाग होता. कृत्रिम धर्मनिरपेक्षवादातून आलेला नव्हता. धार्मिक व ऐहिक असा कृत्रिम भेदही नव्हता. अशा जनसामान्यांना धर्मनिरपेक्षतेचे धडे देणे म्हणजे नैतिक उर्मटपणा होय. जिवंत धर्मपरंपरा, धार्मिकता हीच आपली ताकद आहे. सामान्य लोकांच्या धार्मिकतेवर, धर्मश्रद्धेवर, त्यांच्या सहजीवनविषयक संकल्पनेवर आपण अवलंबून राहू शकतो. धर्मश्रद्धा व निरपेक्षता यांचा मेळ घालणे शक्य झाले पाहिजे.
धार्मिकता
परंतु नंदी किंवा मदन यांचे एका महत्त्वाच्या घटकाकडे दुर्लक्ष होताना दिसते. सामान्य लोकांच्या धार्मिक ' कॉमन सेन्स' वर अवलंबून राहणे बऱ्याच प्रमाणात धोकादायक होऊ शकते, कारण प्रभुत्व शाली विचारप्रणाली- जमातवादासारख्या - या धार्मिकतेला आपल्या दावणीला सहजपणे बांधू शकतात. जनसामान्यांच्या धार्मिक भावनेला- श्रद्धेला- धर्मभोळेपणा ला वाईट वळण देऊ शकतात. संघ परिवार किंवा मुस्लिम मूलतत्त्ववादी संघटनांनी ज्याप्रकारे सामान्य हिंदू व मुस्लिमांना स्वतःच्या कह्यात ओढले आहे, कृतीप्रवण केले आहे त्यावरून हे आपण समजू शकतो. धार्मिकतेचे रूपांतर धर्माभिमानात व धर्माभिमानाचे रूपांतर परधर्मी यांना शत्रु मानण्यात व या शत्रुत्वाच्या भावनेपोटी त्यांना हिंसाचाराकडे ढकलण्यात जमातवादी शक्ती यशस्वी झालेल्या आपण पाहिल्या आहेत. इतिहासात धार्मिक सलोख्याची व सामाजिक धर्म परंपरांची अनेक उदाहरणे सापडतात. आजही अनेक खेड्यात हिंदू-मुस्लिम धार्मिक प्रांगणात एकत्र येताना आढळतात. परस्पर सहकार्य व बंधुभाव नसता तर हा समाज टिकलाच नसता, पण धर्मांध शक्ती व मूलतत्त्ववादी विष एकदा का या लोकांपर्यंत पोहोचले की धार्मिक एकोप्यास तडे जातात. हजारो वर्षं नांदलेला एकोपा एका दिवसात नष्ट करण्याचे कसब जमातवादीयांनी विकसित केले आहे. गणपती उत्सव, वारकरी संप्रदाय, मोहरम, जत्रा, उरूस यांसारख्या घटकांवर जमातवाद आपला प्रभाव टाकण्याचा प्रयत्न सातत्याने करतो आहे. परस्पर सहकार्य व एकमेकांच्या धार्मिक कार्यक्रमात सहभाग यासाठी प्रसिद्ध असलेले हे घटक आज धर्मांधतेच्या आहारी जाताना दिसत आहेत. आधुनिकपुर्व धार्मिकता व सहिष्णुता पुनर्स्थापित करता येणे अशक्य झाले आहे आणि शिवाय आधुनिकपूर्व धार्मिकतेच्या व सहिष्णूतेच्या मर्यादाही आपण विसरून चालणार नाही. त्यातील विषमता, अस्पृश्यता, स्त्रीदास्य व पिळवणूक यांचीही नोंद घ्यावीच लागेल. सामान्यांच्या धर्मसमजुतीवर त्या-त्या काळातील वरिष्ठ- बलिष्ठ गटांच्या आपमतलबीपणाचा प्रभाव पडलेला होता, हेही आपण ध्यानात घेतले पाहिजे. सत्ताधारी गटांनी अधिमान्यता मिळविण्यासाठी धार्मिकतेचा वापर केला होता, याकडेही आपण दुर्लक्ष करता कामा नये.
मुक्तिदायी धर्मविचार
म्हणून नंदी व मदन यांनी पुरस्कार केलेली सामान्याची धार्मिकता जशीच्या तशी धर्मनिरपेक्षतेला किंवा जमात वादाला पर्याय होऊ शकत नाही. धार्मिक ' कॉमन सेन्स' चे रूपांतर धार्मिक गुड सेन्स मध्ये करणे आवश्यक ठरते व हे रूपांतर करताना 'कॉमन सेन्स' मधील उत्स्फूर्तता नष्ट होऊ देता कामा नये. 'गुड सेन्स' मध्ये रूपांतर करण्याची ऐतिहासिक जबाबदारी असते सामान्य लोकांच्या जीवनाशी ज्यांची नाळ जोडली गेली आहे, लोकांच्या विचार विश्वाशी जे निगडीत असतात अशा विचारवंतांची. लोकांच्या कॉमन्सशी या विचारवंतांचा सततचा संपर्क असतो. सामान्यजनांच्या जाणिवा, त्यांच्या कल्पना, श्रद्धा, ज्यांची उस्फूर्तता, त्यांच्या जीवनविषयक धारणा यांना स्पष्ट रूप देण्याचे- त्याची मांडणी करण्याचे वैचारिक कार्य हे विचारवंत करतात. लोकांच्या विचारविश्वात जे अनुस्यूत आहे त्यांना उघड रूप देतात. त्यांच्या वेदना, त्यांचा राग व्यक्त करण्याचे काम ते करतात.
आपले विचार वरून लादण्याच्या ऐवजी हे विचारवंत लोकांच्या जीवनाला स्पर्श करतील, त्यांना स्वातंत्र्य देतील अशा प्रकारे त्यांचे विचार मांडतात, लोकांच्या भाषेत मांडतात. त्यांच्या जीवनाला भिडतील अशा कल्पना संकल्पनांचा आधार घेतात. त्यांच्या इतिहासाचे दाखले देतात. या विचारवंतांचे विचार मुक्तिदायी असतात. ते एकाच वेळी सामान्य जणांच्या विचारविश्वाशी जोडले गेलेले असतात व त्यापासून उच्चपातळीवरही गेलेले असतात. म्हणूनच कॉमन सेन्सचे रूपांतर गुड सेन्समध्ये होऊ शकते. आपल्याकडे 'धार्मिक कॉमन सेंस चे' धार्मिक गुडसेंस' मध्ये रुपांतर करण्याचे ऐतिहासिक कार्य महात्मा फुले, महात्मा गांधी, विठ्ठल रामजी शिंदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मौलाना अब्दुल कलाम आझाद यांनी केले. इतरही काही नावे या संदर्भात घेता येतील. फुले, गांधीजी, शिंदे, आंबेडकर व आझाद हे सर्व जण वृत्तीने धार्मिक होते. सामान्य लोकांच्या सतत संपर्कात होते. त्यांनी धर्मातील मुक्तिदायी अधोरेखित केला. स्वातंत्र्य, समता व बंधुता यावर आधारलेल्या मानवतावादी धर्म कल्पनेचा आग्रह धरला. गांधीजी व आझाद यांनी आपल्या धर्माचा मुक्तीवादी अन्वयार्थ लावला. पारंपरिक धर्म विचारला सहिष्णुतावादी, सहकार्यवादी, व सलोखावादी अर्थ प्राप्त करून दिला. तर फुले, आंबेडकर व शिंदे यांनी नव्या समतावादी, मानवतावादी आणि विवेकवादी धर्म कल्पनेची मांडणी केली. धर्मनिरपेक्षतेचा आधार यातील कोणालाच घ्यावा लागला नाही. त्यांनी लोकांच्या श्रद्धापासून व सहाजिक प्रेरणापासून दूर न जाता स्वायत्त व स्वतंत्र प्रांतात आणून सोडले. त्यांच्यातील मनुष्यत्व, परोपकारी वृत्ती व सहकार्याची पारंपारिक भावना जास्त टोकदार करण्याचा प्रयत्न केला. या विचारवंतांच्या धार्मिक विचारा द्वारेच जमातवादाचा मुकाबला करणे आज घडीला शक्य आहे. धर्मनिरपेक्षता याबाबतीत परकी, अपुरी, दुबळी व पोकळ ठरते.
फुले, गांधी व शिंदे
महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्य धर्माची मांडणी करून शूद्र व अतिशूद्र यांची नैतिक सामूहिकता स्थापन करण्याचा प्रयत्न केला. सामान्यांच्या धार्मिक संस्कृतीमधील महत्त्वाच्या बाजूचा नवा अर्थ लावला. ब्राह्मणी वैदिक हिंदू धर्माला नाकारत असताना खंडोबा, म्हसोबा, काळभैरव यांना आपलेसे केले. त्यांना बळीराज्याचे सहकारी बनवले. समाजाचा नैतिक पाया सत्य व विवेकावर केंद्रीत असला पाहिजे व व सर्व स्त्री-पुरुष समान मानून शूद्रांची सामूहिकता निर्माण व्हावी असा आग्रह धरला. धर्माच्या नावाने लढाया करणारे सद्सद्विवेक नसल्याने भांबावले आहेत. निर्मिकाचा धर्म सत्य आहे तर भांडणे कशासाठी, असा प्रश्न ते विचारतात. एका कुटुंबातील सभासद वेगवेगळ्या धर्माचे पालन करु शकतात, असा विचार मांडून रंजले गांजले व अनाथांना पोसावे व ख्रिस्ती, मोहम्मदी, मांग व ब्राह्मणांना बंधू प्रमाणे पोटाशी धरावे यातच धार्मिकता आहे, असे प्रतिपादन केले.
महात्मा गांधींनी माझा धर्म हिंदू आहे, असे म्हटले पण या धर्माकडे मी सत्य व अहिंसेद्वारे किंवा प्रेमाच्या मार्गे आलो आहे असे म्हणून त्यास कलाटणी दिली. मी माझ्या धर्माचे वर्णन, धर्म म्हणजे सत्य असे करतो व अलीकडे मी सत्य म्हणजे परमेश्वर असे म्हणतो असे म्हणून गांधीजींनी सनातन हिंदू धर्माला स्वतःचा अर्थ दिला. ज्या सहिष्णुतेचा गौरव नंदी व मदन यांनी केला आहे, तो सहिष्णुता हा शब्द गांधीजींना पटत नव्हता. त्यांच्यामध्ये त्यामध्ये दुसऱ्या धर्माला तुम्ही कमी लेखता. परधर्माबद्दल आदर असे म्हणण्याने स्वतःकडे तुम्ही मोठेपणा घेता. म्हणूनच अहिंसा हे एकच तत्व यासंदर्भात बरोबर लागू पडते, असे त्यांचे मत होते. इतरांच्या धर्मश्रद्धा बद्दल तुमच्या धर्मा इतका आदर राखणे ही अहिंसेची शिकवण आहे. त्यातून स्वतःच्या धर्मातील उणिवांची जाणीव व्यक्त होते. धर्म व राजकारण यांच्यात फारकत करू नये, असे गांधी म्हणत, तेव्हा त्या धर्माचा अर्थ 'नैतिक रचना' असा करीत. हिंदू- इस्लाम त्यांनी धर्म पंथांच्या अर्थाने ते 'धर्म' शब्द वापरीत नसत.' राजकारणाला नैतिक अधिष्ठान असावे' असे त्यांना म्हणायचे होते.
वारकरी संप्रदाय कुटुंबातील विठ्ठल रामजी शिंदे ब्रह्म समाज- प्रार्थना समाज या आधुनिक सुधारक पंथाचे अनुयायी होते. पण या समाजांना बहुजनापर्यंत पोहचवण्याचे कार्य त्यांनी केले. अस्पृश्योद्धारास या समाजांनी प्राधान्य द्यावे असा आग्रह धरला. धर्मनीती चा शोध घेतला पाहिजे असे मानणाऱ्या शिंदे यांनी फुले यांच्या सार्वजनिक सत्यधर्मला ब्राह्म समाजात आणले व बौद्ध धर्माचा जीर्णोद्धार व्हावा असे मानले. त्यांचा प्रयत्न होता नेतिक धर्माच्या शोधाचा. नीतीचा उगम अतिमानवी तत्वात न शोधता सामाजिक रचनेत शोधला पाहिजे असे त्यांचे मत होते. ईश्वरपूजेपेक्षा मनुष्याची सेवा केल्याने ईश्वर उपासना उत्तम होते असे ते म्हणत. अस्पृश्यांच्या सेवेला वाहून घेऊन शिंदे ब्राह्म/ प्रार्थना समाजापासून दूर गेले, कारण बहुजन समाजाशी असलेली त्यांची नात पक्की होती आणि म्हणूनच त्यांना बौद्ध धर्म जवळचा वाटला.
डॉ.आंबेडकर व आझाद
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राह्मणी समाजरचनेला पर्याय म्हणून बौद्ध धर्माकडे पहिले. धर्माचा हेतू विश्वाची निर्मिती स्पष्ट करणे आहे, तर धम्माचा हेतू जगाची पुनर्रचना करणे आहे, असे आंबेडकर म्हणत. परंपरिक बौद्ध धर्मापेक्षा आपला धम्म कसा वेगळा आहे हे सांगण्यासाठी त्यांनी बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ लिहिला. समतावादी, वैश्विकतावादी व विवेकवादी असल्याने बौद्ध धर्माचा स्वीकार त्यांनी केला. या जगात राहून हे जग बदलण्यास बौद्धधर्म मदत करतो. दुःख व क्लॅश विरहित जगाकडे वाटचाल करण्यास सहाय्य करतो. दुःखाचे सामाजिक स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न बाबासाहेबांनी केला आणि कर्म व पुनर्जन्म कल्पनेचे महत्व कमी करण्याचाही प्रयत्न त्यांनी केला. तसेच अध्यात्मिक बाजूंचे अवडंबर त्यांनी कमी केले. दलित व गरीब जनतेच्या मुक्तीचे तत्वज्ञान म्हणून धम्माकडे पाहणे हे बाबासाहेबांचे जीवितकार्य होते.
मौलाना आझादयांच्या भूमिकेत व गांधीजींच्या भूमिकेत बरेच साम्य आढळते. मुस्लिम असण्याचा व भारतीय असण्याचा त्यांना सारखाच अभिमान होता. निरनिराळे वंश, संस्कृती व धर्म यांची एकत्र येण्याची भूमी मी असणे हे भारताचे भाग्य आहे. संमिश्र ता हा भारताचा राष्ट्रीय वारसा आहे व तो आपण जपला पाहिजे असे आझाद यांना वाटे. आझाद धार्मिक वृत्तीचे श्रद्धावान व्यक्तिमत्व होते. नेहरूंच्या धर्मनिरपेक्ष चौकटीत बसणारा त्यांचा विचार नव्हता. त्यांनी इस्लामचा व्यापक उदारमतवादी वैश्विककतेवर भर देणारा अर्थ सांगितला. कुराणावर भाष्य करताना त्यातील मानवतावादी आशयावर जोर दिला. सर्व धर्माची मुलतत्वे एकसारखीच आहेत. उच्चतम सत्याची शिकवणी देणे हेच काम सर्व धर्म करतात. परमेश्वराची गुणवैशिष्ट्ये, उपासना मार्ग व धार्मिक नियम या गोष्टीत फरक दिसतो. सर्व धर्मियांनी त्यांच्या धर्माच्या मूळ शुद्ध श्रद्धेचा तपास केला तर वाद होण्याचे कारणच उरणार नाही. परमेश्वर व धर्माच्या नावावर लढण्यास कुराणाची मान्यता नाही. शिंदें प्रमाणे आझाद तौलनिक धर्मशास्त्राचे अभ्यासक होते. त्या अभ्यासातून त्यांना सर्व धर्मातील साम्य दिसले. एकेश्वरवादावर त्यांनी भर दिला व उपनिषदातील तत्त्वज्ञानाकडे यासंदर्भात त्यांनी लक्ष वेधले होते.
या पाच विचारवंतांचा धर्मविचार व त्यांची धर्मविषयक भूमिकाच जमातवादाला पर्याय देऊ शकेल आणि म्हणून या विचारवंतांकडून फक्त समाज-सुधारक किंवा राजकीय विचारवंत असे न पाहता धार्मिक विचारवंत म्हणून पाहिले पाहिजे व धर्मनिरपेक्षतेच्या जाण्यासाठी त्यांच्या मांडणीतून स्फूर्ती घेतली पाहिजे - म्हणजे आपण 'लोकांची धर्मनिरपेक्षता' काय असू शकेल याची कल्पना करू शकू.
--------------------------------------------------
साधना (१६ सप्टेंबर २००६) मध्ये प्रकाशित