लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख :


औद्यागिक संस्कृतीचा पुरस्कार

एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रात अनेक बदल घडून आले. वसाहतवादाने या परिवर्तनास चालना दिली. नवी उत्पादनपद्धत येथे सुरू झाली. वाफेवर व विजेवर चालणारी छोटी-मोठी यंत्रे, कापडाच्या गिरण्या, आगगाड्या, तारायंत्र यांच्या आगमनामुळे आपल्या समाजातील उच्चभ्रूंना आधुनिक विज्ञानाची ओळख झाली. रोगराई व साथी पश्चिमी औषधोपचार पद्धतीमुळे आटोक्यात आणता येतात हे कळाले. निसर्गावर नियंत्रण मिळवून त्याचा मानवी कल्याणासाठी उपयोग करून घेता येतो हे लक्षात आले. मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये हे बदल फारच झपाट्याने घडून आले. सैन्य, शस्त्रास्रे, शिस्तबद्ध प्रशासन, उंचं इमारती, धरणे, रस्ते या गोष्टींमुळे माणूस काय करू शकतो हे सुशिक्षितांना कळाले. आध्यात्मिक व धार्मिक ग्रंथांमधील ज्ञानापेक्षा निराळे ऐहिक ज्ञान व विज्ञान असू शकते व ते संपादन केले तर त्याचा व्यवहारात वापर करता येतो हे येथील वरिष्ठ जातींच्या लक्षात आले. इंग्रजी शिक्षणात भर होता समाजशास्त्र, इतिहास व साहित्यावर. त्यामुळे समाजात स्थित्यंतर कसे होते, त्याचे काय नियम असतात याचे ज्ञान झाले. समाजातील अभिजनांनी पुढाकार घेतला तर समाजपरिवर्तनास योग्य वळण देता येऊ शकते, यावर नव्या पिढीचा विश्वास बसला. पाश्चात्य तत्त्वज्ञान, युरोपचा इतिहास व राजकारणाच्या अभ्यासामुळे व्यक्तीची प्रतिष्ठा, स्वातंत्र्य यासारखी नवी सामाजिक मूल्ये व वैज्ञानिक दृष्टिकोनाचा सुशिक्षित वर्गास परिचय झाला. ख्रिश्चन धर्मोपदेशकांनी केलेल्या टीकेमुळे हिंदुधर्मातील वाईट व अमानुष चालीरीती व समज॒ती यावर प्रकाश पडला. काही समाजचघटकांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करून हिंदुधर्मास जबरदस्त धक्का दिल्यामुळे हिंदुधर्मास टिकून रहायचे असेल तर त्यात काही सुधारणा कराव्या लागतील याची जाणीव उच्चवर्णीयांना झाली.

या सर्व प्रकारातून महाराष्ट्रात एक नवी संस्कृती, नवी मूल्यव्यवस्था उदयाला आली. या नव्या संस्कृतीचा स्वीकार केला नव-मध्यमवर्गाने. इंग्रजी शिक्षणामुळे हा वर्ग तयार झाला होता. त्याने या नव्या दृष्टिकोनातून स्वतःच्या समाजाकडे, रूढींकडे, समजुतींकडे पाहण्यास सुरुवात केली. या नव्या विचाराचे प्रतिनिधी होते मुंबईतील. तेथे वसाहतवादामुळे होणाऱ्या परिवर्तनाच्या खुणा प्रथम दिसू लागल्या होत्या. जगन्नाथ शंकरशेट (१८० ३- १८६५) बाळशास्त्री जांभेकर (१८१२-१८४६) व दादोबा पांडुरंग (१८१९४- १८८२) यांच्याकडे मुंबईतील नव्या पिढीचे प्रतिनिधी म्हणून आपण पाहू शकतो. यांनी आधुनिक ज्ञानाचे स्वागत केले व नव्या विचाराचा प्रसार करण्याचे प्रयत्न केले. अंधश्रद्धा व अमानुष चालीरीतींवर टीका केली. जगन्नाथ शंकरशेट यांनी सतीची चाल बंद करण्यास सरकारला सहाय्य केले, तर बाळशास्त्रींनी 'दर्पण' या वृत्तपत्रातून आधुनिक ज्ञानाचा पुरस्कार केला. दादोबांनी 'परमहंस सभे' मार्फत जातिसंस्था, मूर्तिपूजा इत्यादी गोष्टींवर हल्ला चढवून धर्मसुधारणेस प्रारंभ केला.  मुंबईतील या पिढीने दाखविलेल्या वाटेवरून जाणारा पुण्यातील पहिला समाजसुधारक म्हणजे लोकहितवादी उर्फ गोपाळ हरि देशमुख (१८२३-१८९२). विद्यापीठपूर्व काळात शिक्षण होऊन सुद्धा नव्या औद्योगिक संस्कृतीचा पुरस्कार करणारा लोकहितवादीसारखा द्रष्टा विचारवंत त्या काळात महाराष्ट्रात दुसरा झाला नाही. त्यांनी खुल्या मनाने नव्या दृष्टिकोनाचे स्वागत केले आणि मध्ययुगीन चौकटीत बद्ध झालेल्या मराठी समाजावर कोरडे ओढले. पदार्थविज्ञानावरील 'यंत्रज्ञान' (१८५०) व अर्थशास्त्रावरील 'लक्ष्मीज्ञान (१८४९) ही पुस्तके लिहून ते औद्यागिक संस्कृतीला सामोरे गेले. तसेच शतपत्रांमधून (१८ ४८-१८५०) परंपरा, रूढी, चालरीती आणि समजुतींवर त्यांनी हल्ला केला. लोकहितवादींनी साचेबंद व जुनाट कल्पनांना कवटाळून बसलेल्या हिंदुसमाजावर, विशेषतः त्यातील उच्चवर्णीय समाजावर टीका करून त्यास नव्या युगात पदार्पण करण्याचे आवाहन केले. जवळ जवळ १०० पत्रामध्ये किंवा निबंधांमध्ये आणि वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये त्यांनी अंधश्रद्धा व अमानुष रूढीमधील वेडगळपणा व अमानुषपणा दाखवून दिला आहे. -   विचार शक्तीची देणगी  लोकहितवादींच्या मते, 'परमेश्वराने मनुष्य हा एक बुद्धिमान प्राणी या पृथ्वीवर निर्माण - केला आहे. ईश्वराने मनुष्यास ज्ञान देऊन इतर प्राण्यांपेक्षा वेगळे केले आहे. मनुष्यास विचारशक्ती आहे. वाचा आहे. तो बरेवाईटात फरक करू शकतो. म्हणून सार कोणते व असार कोणते हे त्याने ओळखले पाहिजे. हे ईश्वराचे देणे आहे. त्याचा उपयोग प्रत्येक माणसाने केला पाहिजे. असे जर झाले तर जुन्या वाईट चालीरीती मागे पडतील. त्यांचा फोलपणा स्पष्ट होईल. त्यांची निरर्थकता जाणवेल.' ज्ञान हाच पराक्रम आहे असा सिद्धांत त्यांनी मांडला आहे. 'भारतातील लोकांनी नवे ज्ञान ग्रहण करावे. इंग्रजी विद्या शिकावी आणि आपल्या दुष्ट चाली सोडाव्या यातच शहाणपण आहे. लोकांची सुधारणा होण्यासाठी त्यांनी विद्या संपादन केली पाहिजे. संस्कृतद्वारा ज्या विद्या शिकल्या जातात त्या उपयोगी नाहीत, कारण त्यामध्ये मूर्खपणाच्या समजुती फार आहेत. प्राचीन काळच्या विद्या वाढल्याने देश सुधारणार नाही. त्या ऐवजी पश्चिमेकडून जे नवे ज्ञान आपल्याकडे येते आहे त्याचे स्वागत करावे. त्याचा प्रसार करावा. “समुद्रात नावा चालविण्याची विद्या, रसायनशास्त्र किंवा यंत्रज्ञान" याचा अभ्यास केला तर चांगले कोणते व वाईट कोणते यातील मेद आपल्या लोकांना समजेल आणि जुन्या चालरीतीवरील लोकांचा विश्वास उडेल 'अशी आशा लोकहितवादींना वाटत होती.' संस्कृतात यंत्रज्ञान नाही. कोणी पंडिताने यंत्र निर्माण करण्याचे तंत्र सांगितलेले नाही. यंत्राची सुधारणाही केलेली नाही. जे जाते व्यासाच्या वेळेस हाते तेच आता आहे. जो नांगर पांडवांच्या राज्यात होता तोच आज घडीसही आहे. पूर्वी ताडपत्रावर लिहीत तसेच आज चालू आहे. शिल्पाविषयी एखादे जुने पुस्तक यंत्रज्ञानाचे उदाहरण म्हणून आपल्याकडे दाखविले जाते. पण त्यात मंगळवारी घर बांधू नये, त्रिकोण आला तर त्या जागेवर घर बांधू नये, रोहिणी नक्षत्रावर लाकडे तोडावी, हेच ज्ञान सापडेल. पदार्थज्ञानही संस्कृतात नाही. संस्कृतात शब्दशास्त्र मात्र आहे. व्याकरण, अलंकार, न्याय इत्यादीचे ज्ञान आहे. पण हे ज्ञान निरुपयोगी व पोकळ आहे. प्राचीन विद्या नाना प्रकारचे 'कुतर्क' उत्पन्न करणारी व संसारावरील चित्र उडवून आळशी करणारी व निरुपयोगी कर्म करविणारी आहे. आजमितीला आपल्या समाजाला ते ज्ञान हवे आहे ते त्यात नाही. जगातले देश, तेथील राज्ये, फौजा, व्यापार, यंत्राची उत्पत्ती योग्य “कायदा कोणता, गैरचाली कोणत्या याबाबत त्यातून काही कळत नाही. आयुर्वेदातील ज्ञान उपयोगी आहे. पण ते पूर्णत्वास गेलेले नाही. ते आता नवे शोध लावून सुधारावे. अन्यथा लोक वैद्याला सोडून नवे डॉक्टर व नव्या इस्पितळाकडे जातील. इतर विद्यांबाबतही तसेच होईल.' लोकहितवादींनी प्राचीन व मध्ययुगीन असे भारताच्या इतिहासाचे कालखंड कल्पिलेले दिसतात. प्राचीन काळात विचारशील ऋषींनी शास्त्रे लिहिली पण त्यानंतर तीन हजार वर्षांत त्यात काहीही प्रगती झाली नाही. पूर्वी ज्यांनी जे लिहून ठेवले आहे, तितके शिकावे, नवी कल्पना काढू नये अशी समजूत पडली.

 

कर्मकांडांचा अतिरेक 

ब्राह्मण मंडळी फक्त पाठांतर कर्म करण्यात धन्यता मानू लागले, त्यामुळे ज्ञानाची वृद्धी झाली नाही. इतर जातीही परंपरागत कसब शिकतात, नवीन 'युक्ती' करीत नाहीत. पूर्वी बुद्धी चालली तितकीच चालून स्थिर झाली. लोकांनी पूर्वीच्या लोकांच्या चुका काढून आपली शास्त्रे शुद्ध करावीत. श्रीमंत लोक काशीयात्रेस जातील, देवळे बांधतील पण कापड किंवा काच करण्याची यंत्रे आणून कारखाना घालणार नाहीत. ब्राह्मणांनी स्वतःच्या फायद्यासाठी कर्मकांड व खोट्या समजुतींनी लोकांना वेड लावले आहे. ब्राह्मणांनी शूद्रांना व स्त्रियांना शिक्षणापासून दूर ठेवले आहे. त्यामुळे अज्ञानाचा अंधकार सर्वत्र माजला आहे. लोक वेड्या समजुतींच्या प्रभावाखाली आले आहेत. त्यांना वाटते की पुराणातील गोष्टी खऱ्या आहेत. पुराणात अनेक गोष्टी अतिशयोक्ती करून सांगितल्या आहेत. कर्मकांडाचा अतिरेक केला आहे. आपल्या समाजातील अनेक अनिष्ट रूढींना पुराणांचा आधार दिला जातो. खरे तर पुराणे कवीच्या काव्यासारखी आहेत. त्याला वास्तवात किंवा इतिहासात काही आधार नाही. पुराणातील कथांमुळे लोक अडाणी व सुस्त झाले आहेत. या कथा “प्रारब्धावर आणि दैवाच्या सामर्थ्यावर रचिल्या” आहेत. त्यामुळे माणसांच्या कर्तृत्वावरील विश्वास उडाला आहे. प्रारब्ध, देवाची मर्जी, ईश्वरी संकेत असे म्हणून परकीयांचा अंमल आपण चालू देतो. पण त्याच्यामागील कारणांची मीमांसा करीत नाही. जे लोक पुराणातील कथा ऐकण्यात वेळ घालवितात, ग्रंथांचे पाठांतर करतात व निरर्थक व 'भ्रामक समजुतींच्या आहारी जातात त्यांच्यावर परकीयांचा अंमल येणारच. विद्येचे व ज्ञानाचे वैरी असणाऱ्या लोकांची अशीच दशा होणार. ते उद्योग करणार नाहीत. हालचाल करणार नाहीत. आता इंग्रजांचे राज्य आले आहे त्यामुळे हिंदु लोकात जागृती होईल. लोकांची झोप उडेल. त्यांना खरे ज्ञान उमजेल. लोक ताळ्यावर येतील.' हिंदुस्थानच्या 'सुवर्णयुगाचे' लोकहितवादी वर्णन करतात आणि म्हणतात की त्या युगात पुढे 'विज्ञान व ज्ञान वाढविणे' बंद झाले. 'लोकांची समजूत झाली की संस्कृत ग्रंथ लिहिणारे देव लोक होते. तसे ग्रंथ लिहिणे मनुष्याचे काम नव्हे. तसेच जन्मावरून ब्राह्मण्य मिळू लागले. त्यामुळे त्यांच्यात 'दुर्गुण व अविद्या' शिरली. परदेशगमन पूर्णतः बंद झाले. कलियुगाची कल्पना लोकांवर अंमल करू लागली. प्रारब्थाला दोष देण्यात येऊ लागला. 'नवीन मार्ग काढण्याचे' थांबले. सर्वच गोष्टींना धर्माच्या नावाखाली खपविले जाऊ लागले. अविद्येचा अंधःकार माजला. ब्राह्मणांनी वर नोंद केल्याप्रमाणे ज्ञानाची मक्तेदारी निर्माण केली. विद्या व ज्ञान जाऊन तेथे अडाणीपणा व अंधश्रद्धा यांचे साम्राज्य प्रस्थापित झाले. समाजाला बंदिस्तपणा आला. त्यामुळे परकीयांची राज्ये येथे स्थिरावली. व्यास, वाल्मिकी, नारद, कपिल, अर्जुन यांच्या देशात अज्ञानयुग अवतरले. पुराणिक, भट, भिक्षुक, आळशी, ढोंगी आणि अडाणी लोकांचे राज्य आले.' हे सांगून लोकहितवादी दुराचार, वाईट चाली, दुष्ट रूढी, अमानुष परंपरा आणि अंधश्रद्धा यांची मोठी यादी देतात. त्यांच्या मते इतिहासात एंकादी चाल काही विशिष्ट कारणामुळे पडते पण पुढे तिचे अंधपरंपरेत रूपांतर हाते व ती चालू राहते. अशा चालीरीती लोकांच्या अंगवळणी पडतात. त्याबाबतचा सारासार विचार सुटतो. शास्त्रात सत्कर्मेही दिलेली आहेत पण त्यांचा विसर पडतो व लज्जास्पद कर्मे मात्र चालू राहतात. खरे तर मनुष्य म्हणून आपण जर आपली विचारशक्ती उपयोगात आणली तर आपल्याला जाणवेल की या रूढी किती चुकीच्या आहेत.' लोकहितवादींनी ग्रंथप्रामाण्याला विरोध करून बुद्धिवादाचा आग्रह धरला. पोथ्या-पुराणातील काल्पनिक गोष्टींवर विश्वास ठेवणाऱ्या आणि प्राचीन शास्त्रापुढे मान तुकविण्याच्या वृत्तीला आव्हान देऊन त्यांनी सांगितले की “मनूचे वचन असो, याज्ञवल्क्याचे असो, कोणाचेही असो, ब्रह्मदेवाचे का असेना, बुद्धिरेव बलीयसी असे आहे.... शास्त्रास एकीकडे ठेवा, आपली बुद्धी चालवा, विचार करून पहा. घातक वचनावर हरताळ लावा.”

 

विद्या गेली, अंधश्रद्धा आली 

लोकहितवादी शास्त्रात सच्छास्त्र व असच्छास्त्र असा भेद करतात. असच्छात्रेच जास्त तयार झाली व तीच सर्वांना प्रमाणभूत होऊन बसली आहेत. खऱ्या शास्त्रामुळे जे काही चांगले घडायचे त्याला धोका निर्माण झाला आहे. कालानुरूप शास्त्रात बदल करणे जरूर असते. तत्त्ववेत्ते ऋषी असा बदल वारंवार करीत असतात. परंतु आपल्या देशात ही प्रक्रिया खंडित झाली व लोक अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकले. मंत्रांना अद्‌भुत सामर्थ्य नाही. ईश्वरप्रार्थनेस असे सामर्थ्य आहे. मांत्रिक, देवऋषी किंवा पंचाक्षरी यांचे मंत्रशास्त्र हे केवळ 'पाखंड' आहे. मंत्रशास्त्रासारखी इतर तंत्रे किंवा इंद्रजाल सारखी शास्त्रे 'मिथ्या शास्त्रे ' होत. शास्त्र व रूढी यातही लोकहितवादी भेद करतात. शास्त्र हे शहाणे तर रूढी मूर्ख लोक उत्पन्न करितात असे त्यांना वाटत होते. पूर्वीच्या महर्षींनी 'सत्य.व मिथ्या' यामध्ये निवड करण्यासाठी 'प्रत्यक्ष अनुमान' या सारखी प्रमाणे ठरवून ठेवली आहेत. त्या प्रमाणांच्या कसोटीस जी वचने उतरतील तीच फक्त सत्य वचने होत. जे 'सत्यवादी आणि परहिताचा विचार' करणारे असतात त्यांचे वचन आप्तवचन समजावे. परंतु अशा आप्तासही 'भ्रांति'नसेल असे नाही. म्हणून युक्तीने आप्तवाक्याची परीक्षा करावी. “मनात भ्रांति असेल तर आप्तही चुकून असत्य सांगू शकतो.” हे लक्षात ठेवावे असे लोकहितवादींचे म्हणणे होते. 

 

दुष्ट चालीरीतींमुळे देशात अव्यवस्था 

लोकहितवादींनी चालीरूढींचा व देशभक्तीचा संबंध जोडला होता. “अनेक लोकांनी अनेक प्रकारच्या चालीरूढींनी देशात सर्वत्र अव्यवस्था करून टाकल्यामुळे पहिले देशप्रीतिरूप माधुर्य नष्ट झाले” असा सिद्धांत त्यांनी मांडला होता. ज्या देशात स्त्रियांचे हाल होतात, केशवपन होते, वैधव्याच्या खाईत होरपळत टाकले जाते, ब्राह्मणांच्या 'अयथार्थ' कृत्यांमुळे त्यांची निंदा हाते, अशा देशावर प्रेम करा असे सांगणे त्यांना निरर्थक वाटत होते. “अविचारजन्य चालीरूढीरूप घातुक मुळ्या सद्विचाररूप कोयत्याने समूळ खणून काढल्या” तरच देशप्रेम वाढेल. 'सतीची चाल बंद करणे, पुनर्विवाह सुरू करणे, स्त्रीशिक्षण चालू करणे, शाळा स्थापणे वगैरे गोष्टींमुळे 'देशप्रीतिरूप वृक्ष' वाढेल. या विरुद्ध जे वागतील त्यांना 'स्वदेशाचे शत्रू. समजले पाहिजे' असे लोकहितवादींनी म्हटले होते. अंधश्रद्धा व दुष्ट चालीरीतीमुळे आपल्या देशातील उद्योग-प्रधानता संपुष्टात आली व ' लोक 'आळशी व निरुद्योगी बनले. संकुचित बुद्धीची वाढ झाली. 'कुबुद्धि' उत्पन्न झाली. “जे कोणी सांगेल ते ऐकून केवळ नंदीबैलासारखी मान हलवण्याची” सवय लागली. : आळशी, उदासीन, अविचारी, निरुद्योगी अल्पदृष्टि व कूपमंडूकासारखे आपल्याच छंदात गुंतून जप, तप व अनुष्ठाने करीत बसण्याची पद्धत लोकांमध्ये वाढली. पूजा-पाठ, जप- जाप्य, स्नानसंध्या, यज्ञ, याग यामध्ये वेळ घालविला जाऊ लागला. त्यामुळे उद्योग बुडाला. व्रते, उद्यापने व ब्राह्मणभोजने मात्र वाढली. व्यापार धंदे नाहीसे झाले. अनावश्यक बाबींवर पैसे खर्चण्यामुळे “कागद, सूत, कांच, सुया, कातरी यापैकी एक देखील उपयुक्त पदार्थ करण्याचे शहाणपण न येता” सर्व धंदे बुडाले. पोट भरण्याकरिता व लोकांस वेडे करण्याकरिता 'याजिकांनी व्रतार्क, ब्रतखंड, दानखंड' यासारखे ग्रंथ लिहिले. गरूडपुराण, आचारार्क, निर्णयसिंधु, तिथिनिर्णय इत्यादी 'मतलबसिंधु' लिहिले. त्यामुळे आपल्या समाजाचे अत्यंत नुकसान झाले. या परिस्थितीतून आपल्या देशाला, समाजाला बाहेर पडायचे असेल तर वेद, स्मृती आणि पुराणे यांचे नीट “पर्यालोचन करून सारासार विचाराने आणि देशास हितकर असे आचार, विचार, रूढी आणि शास्त्रे विद्वान व श्रेष्ठ" लोकांनी ठरवावीत. पूर्वीचे ऋषीही असेच करीत असत,' असे प्रतिपादन लोकहितवादींनी त्यांच्या 'स्वाध्याय' या ग्रंथात केले आहे. 

 

स्त्री-पुरुषांची समानता

समाजातील स्त्रीच्या स्थानाविषयी त्या काळात ज्या अंधश्रद्धा रूढ होत्या त्यांचा उल्लेख लोकहितवादींनी शतपत्रात व इतरत्रही जागोजाग केला आहे. आजच्या काळातही त्यातील बर्‍याच कल्पना तशाच स्वरूपात शिल्लक आहेत. 'मुलामुलींची बालपणीच लग्न करणे. स्त्रियांनी विद्या शिकू नये, कारण त्यामुळे व्यभिचार वाढेल. मुलगा झाला तर संतोष होतो, मुलगी झाली तर नाही. मुलीचा पायगुण चांगला- वाईट असतो. कन्या जन्मली तर घरात अवदसा शिरली व ती मेली तर सुख होते. स्रियांनी केला तर व्यभिचार, पुरुषांचा मात्र तो पुरुषधर्म आहे. स्त्रियांनी पुनर्विवाह केला तर धर्म बुडेल व ब्राह्मणांची अब्रू जाईल. विधवेचे केशवपन करावे म्हणजे धर्म बुडणार नाही.' इत्यादि चालीरीतींची त्यांनी हेटाळणी केली आहे. ईश्वराने स्त्री व पुरुष सारखे उत्पन्न केले आहेत व उभयतांचे अधिकार समसमान आहेत या तत्त्वावर लोकहितवादींचा गाढ विश्वास होता. त्यामुळे स्त्री-पुरुषांमध्ये भेद करणाऱ्या व स्रीस दुय्यम दर्जा देणाऱ्या रूढींबर त्यांनी निबंध, पत्रे व लेख लिहून कडक शब्दात टीका केली आहे. लहानपणी लग्न केल्यामुळे मुलामुलींचे बौद्धिक व शारीरिक नुकसान होते याची चर्चा त्यांनी केली आहे. म्हातारपणी लग्न करण्याने तरुण मुलींच्या आयुष्याचे मातेरे कसे होते याचे वर्णन त्यांनी केले आहे. पुनर्विवाह करण्यास परंपरेने मज्जाव केला होता, त्यावर त्यांनी स्वतंत्रपणे निबंध लिहून समाचार घेतला आहे. स्त्रिया अशिक्षित व अडाणी आहेत म्हणून त्यांच्यावर जुलूम होतो आहे व त्या तो मुकाट्याने सोसत आहेत. त्यांना जर थोडेसे ज्ञान असते तर या रूढीला त्या बळी पडल्या नसत्या. स्त्रिया विद्वान असत्या आणि जर त्या विधवा झाल्या असत्या तर त्यांनी पुनर्विवाह करण्याचे ठरविले असते यात लोकहितवादींना शंका नव्हती. म्हणून त्यांनी स्त्रीशिक्षणाचा जोरदार पुरस्कार केला. शिक्षण नसल्यामुळे स्त्रियांची दुर्दशा झालेली आहे असे त्यांना वाटत होते. स्रिया 'शहाण्या' असणे फार जरूर आहे. प्राचीन काळी असे नव्हते. स्त्रियांना फार मान होता. परंतु पुढे मध्ययुगीन काळात परकीय सत्तेबरोबर तिकडच्या चालीरीती आपल्याकडे आल्या. त्यातून स्त्रीला मागे ढकलले गेले. सीता व द्रौपदीस मान होता पण आताच्या स्त्रीला शिक्षणाचा अधिकारही नाही. पुरुषाची बरोबरी करण्याची तिला संधी नाही. स्त्री शहाणी झाली तरच दुष्ट चाली मोडतील. म्हणून प्रथम स्त्री शिकली पाहिजे असे लोकहितवादींचे स्पष्ट मत होते.  प्रारब्ध, ज्योतिष, पिशाच्च  स्त्रियांना दुय्यम स्थान देणाऱ्या, त्यांच्यावर जुलूम व जबरदस्ती करणाऱ्या वेडगळ व आपमतलबी रूढींप्रमाणेच लोकहितवादींनी प्रारब्ध, ज्योतिषशास्त्र, साधूबैरागींचे महत्त्व, पिशाच्च कल्पना या प्रकारच्या गोष्टींवर कडाडून हल्ला केला होता. अशा गोष्टींवरील लोकांच्या श्रद्धेची रेवडी उडवली होती. 'नशीबाने सर्व काही होते, नवसाने देव पावतो, माणसाच्या जीवनावर नवग्रहांचा अंमल चालतो, ब्राह्मणास दान केल्याने नवग्रहांची पीडा दूर होते, शकुन व दुःशकुन मानणे, लग्न करताना गण, खडाष्टक व मुहूर्त पाहणे,' इत्यादी चालीरीतींवर त्यांनी टीका केली होती. त्यातील अविचारीपणा व अविवेकी आशय यावर प्रकाश टाकला होता. साधू, बाबा, महाराज या मंडळीवरील अंधविश्वास माणसाचा घात करतो याबाबत त्यांना खात्री होती. या बाबांच्या कृष्णकर्मावर व अनैतिक वर्तनावर त्यांनी पुढील भाषेत टीका केली होती. “बाबांची कर्मे पाहिली तर उच्चार करवत नाही. कोणी व्यभिचारी, कोणी चोर, कोणी लबाड. त्यांचे चित्त सर्व काळ लोकांस लुटण्याकडे असते. ते साधू नव्हेत. ते भोंदू आहेत. स्नानसंध्याशील साधू असला म्हणजे मग तो तर दगडाप्रमाणेच समजावयाचा. त्याने हे जग नाशवंत आहे असे ठरविलेले असते. या जगास आपला उपयोग होऊ नये हा त्याचा धर्म असतो. साधू म्हणजे आळशी, निरुपयोगी, अज्ञानी पशूसारखे मूर्ख असतात. कोणी संध्याकाळपर्यंत जप करतात. कोणी महिन्यात १५ दिवस उपवास करतात. एक दोन पुस्तके जन्मभर वाचत राहतात. गोणीभर दगड पुढे मांडून त्यांची पूजा करण्यात अर्धा दिवस घालवतात. अमुक एक बुवा थोर साधू आहेत असे ते म्हणतात तेव्हा आपण जर विचारले की ते काय करतात, तर आपल्याला सांगितले जाते की, 'किती थोर, कोठे जावयाचे नाही. यावयाचे नाही. नेहमी तोंडाने जप चालू. दुपारपर्यंत स्नानसंध्या. मग भागवत इत्यादी. कोणाशी बोलत नाहीत."

 

ढोंगी पोटभरु साधू

लोकहितवादी विचारतात की अशा साधूचा समाजास काय उपयोग? हे तर पोटभरू ढोंगी व लोकास फसवणारे साधू होत. 'आगमप्रकाश' या आपल्या पुस्तकात त्यांनी आपल्या समाजात असत्याचा बाजार कसा पसरला आहे याचे परिणामकारक वर्णन केले आहे. त्यात ते म्हणतात, “ठिकठिकाणी धुन्या लावून बाबा बसले आहेत. कपाळी शेंदराचे पट्टे लावून मांत्रिक लोक भोळ्या लोकांस आपल्या कपटजालात अडकवण्याची वाट पहात आहेत. अवधूत, सिद्ध, योगी आपल्या तपस्येचे देव्हारे माजवून अंगारा देण्याकरिता आपल्या मठातून बसले आहेत. किमयागार, जादूगार, मूठ मारणारे यांच्या टोळ्या ठिकठिकाणी भेटतात. रोग दूर करणारे, पुत्रकामेच्छा तृप्त करणारे साधूसंत आढळतात. गुरूपदेश करणारे, स्वर्गमार्ग दाखविणारे आणि मोक्षाची प्राप्ती करून देणारे रामदासी सापडतील.” असे सांगून लोकहितवादी म्हणतात की “हे सर्व लोक आपल्याला लुबाडण्यास निर्माण झालेले आहेत हे लक्षात घेऊन मोठ्या सावधगिरीने व धूर्ततेने आपला बचाव आपण केला पाहिजे.” 'ऐतिहासिक गोष्टी' या पुस्तकात लोकहितवादींनी ढोंगी लोकांची कृष्णकृत्ये उघड केली आहेत व त्यांची यादीच सादर केली आहे. भाकिते सांगणारे देव व देवऋषी, मंत्र व अनुष्ठाने करणारे, भूतप्रेतांची बाधा काढणारे पंचाक्षरी व भगत, तांबे किंवा कथील याचे सोने करतो असे म्हणणारे, भूमीत पुरले ते द्रव्य काढून देणारे. ग्रहबाधा सांगणारे, गुरुमंत्र देऊन पैसा उकळणारे, अंगारे देणारे, संतती देतो म्हणणारे फकीर, पीर प्रसन्न करणारे अवलिया, ताईत व पेट्या देणारे बोवा यांचा समावेश त्यांनी या यादीत केला आहे. 

 

धर्मसुधारणेचा आग्रह

एकोणिसाव्या शतकात आधुनिक शिक्षणाचा जो प्रसार होत होता त्यामुळे या भोंदू साधू व वाईट चालीरीतींच्या जोखडातून हिंदुसमाजाची सुटका होईल अशी आशा लोकहितवादींना वाटत होती. स्त्री शिक्षणाचाही पुरस्कार त्यांनी याच दृष्टिकोनातून केला होता. परंतु इंग्रजी शिक्षणामुळे ज्ञानाचा जो प्रसार होत आहे त्यामुळेच फक्त अंधश्रद्धा क्षीण होतील असे नव्हे याची जाणीव लोकहितवादींना होती. कारण या सर्व परंपरांना व रूढींना हिंदुधर्माचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष आधार होता. म्हणूनच शिक्षणप्रसारासोबतच धर्मसुधारणेचाही प्रयत्न करावा लागेल, हे लोकहितवादींनी ओळखले होते. किंबहुना त्या काळातील सर्वच समाजसुधारकांनी हे मर्म जाणले होते. म्हणूनच लोकहितवादीपूर्व काळातील दादोबा पांडुरंग काय किंवा त्यांचे समकालीन न्या. रानडे वा. म. फुले काय सर्वांनीच धर्मसुधारणेचा आग्रह धरला होता. एकोणिसाव्या शतकात अंधश्रद्धांचा विचार हिंदुधर्माच्या संदर्भात झाला. अंधविश्वास व वेडगळ समजुतींना धर्माचे अधिष्ठान असते व म्हणून अंधश्रद्धा घालवायच्या असतील तर प्रथम धर्मात सुधारणा घडवून आणावी लागेल हे लोकहितवादींनी जाणले होते. अंधश्रद्धा अधांतरी टांगलेल्या नसतात. त्यांना धर्मग्रंथांचा, पुराणांचा किंवा धार्मिक कर्मकांडांचा पाया असतो. या पायाला आपण जो पर्यंत हात लावीत नाही तोपर्यंत अंधश्रद्धा नाहीशा करणे कठीण असते. तसेच तुम्ही जेव्हा चालीरीती, रूढी, अंधविश्वास यावर हल्ला करता तेव्हा तुम्ही धर्मावरच हल्ला करत असता असा त्याचा अर्थ लावला जातो व तुमच्यावर हिंदुधर्माचे विरोधक किंवा नास्तिक असा शिक्का मारला जातो. बुद्धिवादी व जन-सामान्यांच्या भावना न कळणारे असे आरोप तुमच्यावर केले जातात. या कोंडीतून बाहेर पडण्याचा एक मार्ग लोकहितवादी किंवा रानडे व फुले यांनी दाखविला होता. तो होता धर्मसुधारणा करण्याचा, मूर्तिपूजा, कर्मकांड, उच्चनीचता यांना फाटा देऊन उच्चतम धर्माकडे वाटचाल करण्याचा. लोकहितवादींचा परमेश्वरावर - धर्मावर - पूर्ण विश्वास होता. ते पक्के आस्तिक होते. त्यामुळे धर्मकल्पनेचे समूळ उच्चाटन करणाऱ्या सुधारणेला, परंपरा नाकारणाऱ्या आधुनिकतेला त्यांचा सक्त विरोध : होता. 'सर्वांनी ईश्वराचे भजन अंतःकरणापासून करावे, आपला जीव तसा दुसऱ्याचा जीव मानावा, मुंज, लग्न, प्रेतक्रिया हे. तीन संस्कार ठेवून बाकीचे सर्व रद्द करावे, भजनपूजन स्वभाषेत करावे, प्रत्येकास आपल्या विचाराप्रमाणे आचार करण्याची मोकळीक असावी, स्रीपुरुषांचे धर्मसंबंधी कार्यात व संसारात समान अधिकार असावेत, आचारापेक्षा नीती प्रमुख असावी, आचाराचे महत्त्व हल्ली आहे तसे असू नये, मनुष्यमात्रास तुच्छ मानू नये, जाति-अभिमान नसावा, सर्वांबरोबर दयापूर्वक वागावे, सर्वांनी सत्याने वागावे, विद्या व ज्ञान संपादन करण्यास सर्वांना अधिकार असावा.' अशी तत्त्वे लोकहितवादींनी धर्मसुधारणेसाठी सुचविली होती. त्यांच्या मते ही सर्व तत्त्वे खरे तर हिंदुधर्मातीलच आहेत. पण त्यांना आता उजाळा दिला पाहिजे. हा शुद्ध हिंदुधर्म आहे. त्याचा सर्वांनी अवलंब करावा व भ्रष्ट रूपाचा त्याग करावा. आता जो धर्म चालला आहे तो धर्म नव्हे. तो फक्त 'गोंधळ' आहे. नीती नाहीशी झाली आहे. तिची पुन्हा एकदा प्रस्थापना केली पाहिजे. धर्मात दुसरे अधर्म मिश्र झाले आहेत त्यामुळे 'वास्तविक धर्म' झाकोळला गेला आहे. प्राचीन ग्रंथकारांनी व्यवहाराची व धर्माची पुस्तके वेगवेगळी लिहिली नाहीत त्यामुळे व्यवहार व धर्म यात भेद राहिला नाही. लोकांनी क्षुल्लक धर्म व महान धर्म यातील भेद जाणावा. सत्य बोलणे, दया करणे इत्यादी नीतीचे धर्म म्हणजे परमधर्म होय. हा सोडून 'क्षुल्लक धर्म' बोकाळला आहे. सर्व धर्म आता लोकांच्या पैशावर चालला आहे. पैसा दिला म्हणजे पाप जाते, प्रायश्चित्त होते व ईश्वर प्रसन्न होतो, असे ब्राह्मण सांगतात. परंतु लोकांनी हे ओळखले पाहिजे की, मन शुद्ध ठेवावे हाच धर्म आहे. कर्म, ज्ञान व भक्ती या तीन मार्गांची तुलना करून लोकहितवादी भक्तीमार्गाची प्रशंसा करतात. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे "ज्ञान व कर्म मार्गात बरेच घोटाळे आहेत. धर्म करण्याची जी बुद्धी मनुष्याकडे आहे तिला लोकहितवादींच्या मते दोन शत्रू आहेत. एक 'लौकिकेच्छा' म्हणजे लोकांनी स्तुती करावी म्हणून, प्रसिद्धी मिळावी म्हणून पैसा खर्च करून धर्म करणे व दुसरा शत्रु म्हणजे ढोंग. परमार्थाचे आमिष दाखवून भाविकांकडून पैसा उपटणारे भट भिक्षुक, गोसावी व बैरागी यांचा त्यात समावेश होतो. खरे तर भूतदया व अहिंसा हाच श्रेष्ठ धर्म आहे. बलवंतानी निर्बलांचे रक्षण करावे हाच धर्म आहे. लोकहितवादी एकेश्वरवादी होते. भ्रम व अज्ञान यामुळे लोक विचारशून्य झाले व अनेक देवांची कल्पना निघाली. तसेच मूर्तिपूजेसही त्यांचा विरोध होता. ईश्वर अमूर्त' व अपरिमित आहे. ईश्वराचे स्मारक अखिल विश्वच असताना त्याची मूर्ती करणे हे असंमजपणाचे लक्षण आहे. ईश्वरभजन, सदाचार, परोपकार आणि त्याद्वारे मुक्ती हे जन्माचे सार्थक आहे' असे त्यांचे मत होते. 

धर्मसुधारणा करण्यावाचून गत्यंतर नाही असे मत असल्यामुळे लोकहितवादींनी त्या काळात धर्मसुधारणेचे जे प्रयत्न झाले त्यास आपल्यापरीने हातभार लावला होता. प्रार्थनासमाजाचा (१८६७) ब त्यांचा अहमदाबाद येथे ते होते तेव्हा जवळून संबंध आला. परंतु त्यांचा खरा ओढा आर्यसमाजाकडे होता (१८७५) लोकहितवादींचे व स्वामी दयानंद यांचे वैयक्तिकही संबंध होते. धर्मसुधारणेच्या वेगवेगळ्या मार्गाबाबत त्यांना ममत्त्व होते. थिऑसॉफिक सोसायटीच्या मतांशीही त्यांचे जुळत असे. कारण. 'कालमहात्म्ये' करून धर्मसुधारणा करणे जरूर आहे असा त्यांचा सिद्धान्त होता. यापूर्वीही हिंदु समाजाने आपल्या धर्मात अनेकवेळा परिवर्तन केले आहे. जुनी शास्त्रमते रद्द करून नवी चालू केली होती. असा इतिहासाचा दाखला ते देत असत. ईश्वरासंबंधी जो धर्म आहे तो जरी 'अचल' असला तरी “कालेकरून शास्त्रास चालन पाहिजे" असे त्यांचे म्हणणे होते. नीतिप्रधान धर्मकारणाचा त्यांनी आग्रह धरला होता. निरर्थक कर्मकांड आणि ज्ञानशून्य व ढोंगी आचारांना सोडचिठ्ठी देऊन सत्य, दया, नीती, समता, व्यक्तिप्रतिष्ठा वविद्यावृद्धी यांना प्राधान्य देणारा, ऐहिक जीवनात हस्तक्षेप न करणारा, मानवहितकारक धर्म प्रस्थापित व्हावा' अशी त्यांची प्रबळ इच्छा होती. पुन्हा एकदा हिंदुधर्मास उन्नत अवस्था आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे लोकहितवादींना वाटत होते आणि त्यासाठीच त्यांनी धर्मसुधारणेचा पुरस्कार केला होता. आणि अशी धर्मसुधारणा झाली तर आपोआपच अंधश्रद्धा गळून पडतील असा त्यांचा कयास होता.

लोकहितवादींनी किंवा त्यांच्या काळातील इतर सुधारकांनी अंधश्रद्धा निर्मूलन हा. जसा धर्मसुधारणेचा एक भाग मानला होता तसेच तो एकूण समाज परिवर्तनाचे एक अंग मानला होता. कारण त्यांच्या मते, समाजाचे परिवर्तन एकाच वेळी सर्व अंगात - क्षेत्रात होत असते. आर्थिक, सामाजिक, राजकीय व धार्मिक परिवर्तन हातात हात घालून एकाच वेळी होत असते असा त्यांचा विश्वास होता. त्यामुळे त्यांनी कोणतीही सामाजिक चळवळ सम्यक परिवर्तनवादी प्रयत्नाहून निराळी मानली नव्हती. लोकहितवादींसारख! विचारवंत आपल्या समाजाचा चोहोबाजूंनी विचार करून त्या सर्व बाजूत एकाच वेळी कसे स्थित्यंतर होईल याचा आकृतिबंध मांडण्याचा प्रयत्न करीत होता. वरवर पाहता वेगवेगळ्या दिसणाऱ्या प्रश्‍नांचा सुटा सुटा विचार करून ते सोडविण्यासाठी आज अलग- अलगपणे प्रयत्न होत आहेत. लोकहितवादींच्या ऐतिहासिक कार्याकडून काहीही शिकण्यास आपण नकार देत आहोत, अशी त्यामुळेच शंका येते.

 

 संदर्भ :-- 
१. गोवर्धन पारीख व इंदुमती पारीख (संपा) लोकहितवादी: समग्र वाड्मय, खंड १, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळ. मुंबई, १९८८.
२.. गोवर्धन पारीख व इंदुमती पारीख (संपा) लोकहितवादीः समग्र वाड्मय, खंड २, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळ, मुंबई, १९९०. 
३. अ. का. प्रियोळकर (संपा) लोकहितवादीकृत निबंधसंग्रह, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई १९६७. 
४. राजेंद्र व्होरा : लोकहितवादी, रानडे, आगरकर यांचे अंधश्रद्धा निर्मूलन कार्य, हा अंजली सोमण संपादित तिमिरभेद मनोविकास प्रकाशन, मुंबई, १९८९ या पुस्तकातील लेख.

 

 

-------------------------------------------------------------------
समाजसुधारक आणि अंधश्रद्धा () मध्ये प्रकाशित