पौर्वात्यवादाने प्रभावित झालेला राष्ट्रवाद: विष्णुशास्त्री चिपळूणकर


विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे असाधारण कार्य व राष्ट्रवादी विचार यावर आजपर्यंत विपुल लेखन झालेले आहे. विशेषतः त्यांच्या निबंधमालेचा अभ्यास बऱ्याच विद्वानांनी केला आहे. मराठी भाषा, निबंध व वाङ्मयसमीक्षा या प्रकारांत त्यांनी जो स्वतःचा ठसा उमटविला त्याची नोंद घेण्यात आली आहे. महाराष्ट्रातील राष्ट्रवादाच्या विकासास निबंधमालेने कसे साहाय्य केले तसेच एकोणिसाव्या शतकातील सांस्कृतिक उत्थानास विष्णूशास्त्रींनी कसा हातभार लावला याची दखल घेण्यात आलेली आहे. मराठी नियतकालिकांच्या इतिहासातही निबंधमालेचा गौरवाने उल्लेख झालेला आहे. विष्णूशास्त्रींच्या कामगिरीचा गौरव करणारे लेखन जसे झाले आहे तसेच त्यांच्या कार्याच्या मर्यादा दर्शविणारे व त्यांच्या विचारांतील दोषांचे दिग्दर्शन करणारे लेखनही झालेले आहे. त्यांच्यावर टीका करणाऱ्या काहींनी तर त्यांना देशांचे दुश्मन म्हणण्यास मागेपुढे पाहिलेले नाही. राष्ट्रवादाचे भाष्यकार, सांस्कृतिक उत्थानाचे उदगातेपासून देशाचे दुश्मनपर्यंत असे दोन विरुद्ध टोकाचे दृष्टिकोन चिपळूणकरांबाबत समीक्षकांनी घेतलेले आढळतात. त्याचप्रमाणे त्यांना झुकते माप देऊन काही बाबतीत त्यांच्या भूमिकेतील उणेपणा स्पष्ट करणारे अभ्यासकही चिपळूणकरांना लाभले.

विष्णूशास्त्रींच्या कामगिरीबाबत अशी टोकाची विधाने केली जातात किंवा त्यांच्या कार्याची योग्यता दाखवीत असतानाच त्याचा मर्यादाही त्याच्या मर्यादाही सांगितल्या जातात. म्हणून त्यांच्या लेखनाचा नव्याने अभ्यास करणे आवश्यक झाले आहे आणि त्यांच्या सामाजिक व राजकीय विचारांचा परामर्श घेण्याची गरजही निर्माण झाली आहे. वसाहतवाद, पौर्वात्यवाद व राष्ट्रवाद यांचा अलीकडे साहित्य, इतिहास व राज्यशास्त्रात जो अभ्यास होतो आहे त्यात चिपळूणकरांच्या भूमिकेचा व त्यांना पडलेल्या प्रश्नांचा समावेश होणे महत्वाचे आहे. प्रस्तुत लेखात असाच एक प्रयत्न केला आहे.

अवघ्या बत्तीस वर्षांच्या आयुष्यात विष्णूशास्त्रींनी अनेक उपक्रमांचा प्रारंभ केला व ते यशस्वीपणे राबविले. ' शालापत्रक ' या नियतकालिकाच्या संपादनाची जबाबदारी त्यांच्याकडे १८६८ पासून आली. त्यात त्यांनी ३-४ वर्षे लेखनही केले. त्यांच्या जीवितकार्याचा परमोच्चबिंदू म्हणजे निबंधमाला. मालेचा प्रारंभ १८७४ मध्ये करून ती १८८१ पर्यंत चालविली. चित्रशाळा, काव्येतिहासंग्रह व किताबखाना हे उपक्रम त्यांनी १८७७ ते १८७९ या तीन वर्षात सुरु केले. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना १८८० मध्ये करून तदनंतर दोन वर्षांनी 'केसरी' व 'मराठा' ही वृत्तपत्रे चालू करण्यास साहाय्य केले. अशा प्रकारे भाषा, साहित्य, वृत्तपत्र, शिक्षण व ग्रंथनिर्मिती या क्षेत्रांत विष्णूशास्त्रींनी आपल्या अल्प आयुष्यात महत्वाची कामगिरी बजावली. न्यू इंग्लिश स्कूल किंवा केसरी-मराठा यासारखे उपक्रम पुढे जोमाने वाढले व शिक्षण व वृत्तपत्रक्षेत्रात त्यांनी अनन्यसाधारण स्थान प्राप्त केले. निबंधमाला विष्णूशास्त्रींनी स्वतःच १८८१ मध्ये बंद केली. या सर्व कार्यामागे त्यांचा काय विचार होता, कोणती प्रेरणा होती, समाज, देश, इतिहास, साहित्य, भाषा याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन कोणता होता, विष्णूशास्त्रीचें ध्येय व आदर्श कोणते होते, कोणत्या मार्गाचा अवलंब त्यांनी हे ध्येय साध्य करण्यासाठी केला, त्यांच्यावर कोणते प्रभाव होते व त्याला ते कसा प्रतिसाद देत होते या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्याला त्यांनी केलेले लेखन अभ्यासावे लागेल.

शालापत्रकामध्ये फेब्रुवारी १८७२ ते फेब्रुवारी १८७५ पर्यंत लिहिलेले निबंध हे त्यांचे प्रारंभीचे लेखन होय. यात विष्णुशास्त्री इंग्रजी, संस्कृत व मराठी कविता हे विषय हाताळतात. त्यानंतर येते निबंधमाला. जानेवारी १८७४ मध्ये प्रारंभ करून नोव्हेंबर १८८१ पर्यंत त्यांनी ती एकहाती चालविली. एकूण ८४ अंक काढले. त्यांत अनेक विषयांवर निबंध लिहिले तरी त्यांचा मुख्य भर आहे भाषा, साहित्य व त्यासंबंधित विषयांवर. साहित्यासारख्या विषयावर लिहिताना विष्णुशास्त्री काही वेळा विषयाला धरून तर काही वेळा विषयांतर करून तत्कालीन समाजकारण व इंग्रजी आम्लावर भाष्य करतात. याशिवाय ' लोकहितवादी ' , ' इतिहास ' व ' आमच्या देशाची स्थिती ' हे निबंध प्रत्यक्ष सामाजिक व राजकीय विषयांवरीलच आहेत. ग्रंथपरीक्षणे करताना विष्णुशास्त्री ग्रंथाच्या विषयावरील स्वतःचे मतही  मांडतात. केसरी १८८१ मध्ये सुरु झाला तेव्हापासून १७ मार्च १८८२ रोजी अकाली मृत्यू होईपर्यंत विष्णुशास्त्री केसरीत लिहीत होते. जातिभेद, समाजसुधारकांच्या संस्था, अनुकरण, नाटक व देशोन्नती अशा विविध विषयांवरील स्फुटलेखांचा त्यांत समावेश होतो. शालापत्रकामधील कवितेवरील लेख, निबंधमालेतील भाषा, साहित्य, इतिहास व देशस्थिती यावरील आणि केसरीतील स्फुट लेखन याचा साकल्याने अभ्यास केला तर विष्णूशास्त्रींनी पौर्वात्यवादाला दिलेला प्रतिसाद दिसतो. पौर्वात्यवादाशी जुळवून घेण्याचा, समझोता करण्याचा प्रयत्न जाणवत दिसतो. त्यांच्या सर्वच लेखांत पौर्वात्यवादाचा प्रभाव जाणवत राहतो. यापुढील लेखात आपल्याला या मुद्द्याला धरून विष्णूशास्त्रींच्या तत्वज्ञानाची चर्चा करायची आहे.

 

पौर्वात्यवादाचा प्रभाव

चिपळूणकर व त्या काळातील विचारवंतांवर पौर्वात्यवादाचा प्रभाव पडलेला होता. पौर्वात्यवाद म्हणजे पौर्वात्य जगाकडे पाहण्याचा पाश्चिमात्य दृष्टिकोन, पौर्वात्य संस्कृतीबद्दलचे ज्ञान, पाश्चिमात्यांच्या पौर्वात्य देशांबद्दलच्या कल्पना, पौर्वात्यांचा इतिहास व समाज समजून घेण्याची पद्धत, भारतास समाजाला स्वतःची ओळख करून घेण्यासाठी पाश्चिमात्यांनी पुरविलेला पाया, पौर्वात्य देशांना स्वतःचा इतिहास व वर्तमान समजून घेण्यासाठी पश्चिमेकडून मिळालेली अभ्यासपद्धत, भविष्यात या देशांनी कोणता मार्ग अनुसरावा याबाबत सिद्धांत. वासाहतिक देशांनी साम्राज्यवादी वर्चस्व आपसूक मान्य करावे यासाठी आवश्यक अशी संमती पौर्वात्यवादाने निर्माण केली असे म्हणता येईल. पौर्वात्यवाद ही एकसंध विचारप्रणाली नव्हती. एकूण दोन प्रकारचा पौर्वात्यवाद होता असे दिसते. पहिला प्रकार आहे विलियम जोन्स ( १७४६-१७९४ ) म्युलर ( १८२३-१९०० ), हेनरी कोलब्रुक ( १७६५-१८१६ ) यांचा प्राच्यविद्यातज्ज्ञांनी भारताच्या प्राचीन काळातील सुवर्णयुगाची महती गायली . संस्कृत साहित्याची प्रशंसा केली होती व त्या भाषेत व युरोपीय भाषेतील साम्य लक्ष वेधून या भाषा बोलणारे लोक एकाच वंशाचे असले पाहिजेत असा आर्यवंशाच्या श्रेष्ठत्वाचा सिद्धांत मांडला होता. दुसरा प्रकार आहे तो ग्रँट, जेम्स मिल ( १८३६ ) व थॉमस मेकॉले (१८०० - १८५९) यांचा. भारतीय संस्कृती, साहित्य व समाज मागासलेला होता व आहे, त्यास इंग्रजी राजवट संपर्कामुळे सुधारणा करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जेम्स मिलच्या भारताचा इतिहास (१८१७) किंवा मेकॉलेचे शिक्षणावरील धोरणात्मक विचार (१८३५) हे या पौर्वात्यवादाचे स्रोत होते. . विष्णशास्त्री दोन प्रकारच्या पौर्वात्यवादांना प्रतिसाद देत होते. त्यांच्याशी समझोता करीत होते. पौर्वात्यवादाचे असे वेगवेगळे प्रकार होते असे म्हणताना हे ध्यानात घेतले पाहिजे कि या प्रकारांच्या सीमारेषा फार धूसर होत्या. बऱ्याच वेळा त्यांत सरमिसळ झालेली आढळते. विष्णूशास्त्रांवरील पौर्वात्यवादाच्या प्रभावाचे विश्लेषण करताना ही गोष्ट आपल्याला जाणवेलच.

 

मेकॉलेचा नवीन अवतार

निबंधमाला हे चिपळूणकरांचे सर्वात महत्वाचे योगदान मानले जाते. चिपळूणकर व निबंधमाा हे समीकरण मराठी संस्कृतीत पक्के रुजले आहे. निबंधमाला सुरु करण्याची प्रेरणा त्यांना इंग्रजी नियतकालिकांकडून मिळाली असावी असे दिसते. इंग्रजी भाषा यावरील निबंधात चिपळूणकरांनी स्पेकटेटर (१७११), एडिंबरो रिव्ह्यू (१८०२), द रॅम्ब्लर (१७५०) वेस्ट मिनिस्टर (१८२४) या व इतर नियतकालिकांची माहिती ज्या पद्धतीने दिली आहे त्यावरूनही असे दिसते की, या नियतकालिकांचे एडिसनसारखे संपादक किंवा त्यातील मेकॉलेसारखे लेखक यांच्याप्रमाणे मराठीत एखादे पत्र काढावे व लेखन करावे असा विचार त्यांनी केलेला असावा. त्यांनी जे नियतकालिक सुरु केले त्यामध्ये निबंध हा वाङ्मयप्रकार विकसित केला आहे. त्यांच्या पूर्वी मराठी वृत्तपत्रसृष्टीत अनेकांनी हा प्रकार हाताळला होता. गद्यलेखनाचा प्रारंभच निबंध या माध्यमातून आधुनिक काळात झाला. पण निबंध या प्रकाराचा सर्वोच्च बिंदू गाठला गेला निबंधमालेत असे वाङ्मयइतिहासकार मानतात. चिपळूणकरांनी स्वतःसमोर मराठीतील निबंधांचा आदर्श न ठेवता इंग्रजीतील मेकॉलेसारख्या निबंधकर्त्यांचा ठेवला होता. त्यांच्या वाचनापैकी बहुतेक ग्रंथ इंग्रजी व काही थोडे संस्कृत व त्याहून फार थोडे मराठी होते. त्यांच्या लेखनाला, विचारला व पद्धतीला इंग्रजी वळण पुष्कळच लागले होते. इंग्रजी उतारे, इंग्रजी वळण, इंग्रजी विचार, इंग्रजी पद्धत ही सर्व निबंधमालेने स्वीकारलेली दिसतात. चिपळूणकरांचे वाचन इंग्रजीतील अठराव्या शतकातील व एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील वाङ्मयाचे होते. या काळातील लेखकांचा, गद्य-वाङ्मयप्रकाराचा व वाङ्मयसमीक्षेचा त्यांच्यावर सखोल परिणाम झाला होता असे त्यांचे चरित्रकार सांगतात. विशेषतः सॅम्युअल जॉन्सन ( १७०९ - १७९४) आणि मेकॉलेचा प्रभाव त्यांच्यावर सर्वात जास्त पडलेला होता. वर उल्लेखिलेल्या एडिंबरो रिव्ह्यू (१८०२) या त्रैमासिकाचा आदर्श त्यांनी समोर ठेवला होता व त्यातील मेकॉलेच्या निबंध त्यांना अनुकरणीय वाटत होते, असे त्यांच्या निबंधमालेवरून लक्षात येते. मेकॉलेचे या त्रैमासीकातील निबंध म्हणजे " इंग्रजी विद्येचे केवळ भांडार आहे " असे चिपळूणकरांचे मत होते. मेकॉलेची विद्वत्ता, त्याची लिहिण्याची रीत, त्याला असलेली विविध माहिती, त्याची दृष्टांत देण्याची सवय व भाषापद्धती, त्याची लहान व खुबीदार वाक्ये, त्याची सोपी व निवडक शब्दयोजना, विषयनिरूपणाची सुबोध व सरळ शैली आणि विनोदात्मकता याची प्रशंसा भरघोस शब्दांत चिपळूणकरांनी केली होती. सामान्य वाचकांसही मोठमोठ्या विषयांची माहिती करून देण्यामधील चतुराई ज्याला शिकवायची असेल त्यास ती मेकॉलेकडून जशी शिकायला मिळेल तशी बहुधा दुसऱ्या कोणाकडूनही मिळणार नाही अशी त्यांची धारणा होती. चिपळूणकरांनीही या निरुपणपद्धतीचे धडे मेकॉलेकडूनच घेतले होते. असे म्हटले तर ते चुकीचे होणार नाही. निबंधमालेत मेकॉलेच्या विचारांची व टीकापद्धतीची इतकी हुबेहूब नक्कल केलेली आढळून येते व मेकोलेचा कोटिक्रम, त्याचा तिखटपणा, एखाद्यावर घसरले की त्याला पूर्णपणे चीत करण्याची तऱ्हा, गरुड पक्षासारख्या सारस्वताच्या अनेक शाखांत भराऱ्या मारून लेख बहुश्रुतपणाने, विविध माहितीने, सफाईदार, सोप्या व जोरदार भाषेने चित्तवेधक करण्याची हातोटी वगैरे गुणांचे इतक्या आश्चर्यकारक रीतीने अनुकरण केलेले दृतोत्पत्तीस येते की, निष्पक्षपाती मनुष्यास मेकॉलेच्या निबंधांचे निबंधमालेने शिष्यत्वच पत्करले आहे असे वाटते. मेकॉलेच्या निबंधातून आपल्या मताच्या मंडनार्थ व खंडनार्थ चिपळूणकरांनी अनेक उतारे घेतले आहेत. या अवतारणांवरूनही मेकॉलेच्या विचारांचे व पद्धतीचे त्यांच्या विचारपद्धतीस किती वळण लागले होते हे समजते. मेकॉलेने ' एडिंबरो रिव्ह्यू ' मध्ये जसे दीर्घ निबंध लिहिले तसेच चिपळूणकरांनी निबंधमालेत लिहिले. मोरोपंत व लोकहितवादीवरील त्यांचे निबंध १२-१३ अंक चालू होते. मेकॉले व तत्सम निबंधकांवर खंडन-मंडनपर (Rhetoric) पद्धतीचा प्रभाव होता तीच पद्धत चिपळूणकरांनी उचलली होती असे दिसते. युक्तिवाद करून पूर्वपक्ष - उत्तरपक्ष  या पद्धतीने विरोधकांवर टीका करण्याची मेकॉलेची धाटणी निबंधमालेत दृष्टीस पडते. उपहास, उपरोध व पूरक स्थित्यंतरे हे त्या काळातील इंग्रजी निबंधांचे विशेषतः मेकॉलेच्या निबंधांचे वैशिष्ट्य निबंधमालेतील निबंधांत आढळते. ठसकेबाजपणा, अलंकारचातुर्य, अतिशयोक्तीची हौस, विचारातील उथळपणा, प्रतिपक्षाची तर उडविण्यातील हातोटी ही मेकॉलेची वैशिष्ट्ये मालेने आपलीशी केली होती. अशा तऱ्हेने मेकॉलेच्या लेखनातील फक्त गुणच नव्हे तर काही अवगुणही चिपळूणकरांकडे आले होते असे काही प्रसंगी स्पष्ट होते. समाज व संस्कृतीचा जसजसा विकास होत जातो तसतसा काव्याचा महिमा कमी होत जातो हे मेकॉलेचे म्हणणे तसे पहिले तर चुकीचे आहे तरीही ते चपळूणकरांनी तसेच्या तसे उचलले आहे. मेकॉले हा खरे तर मोठा विचारवंत वगैरे नव्हता. ज्या बाबतीत आपला व्यासंग फारसा नाही त्या बाबतीत चुरचुरीत व भरमसाट विधाने करण्याचे मेकॉलेचे वैशिष्ट्य विष्णूशास्त्रींनमध्येही उतरले होते असे निबंधमालेत दिसते. निबंधमालेला ४ वर्षे पूर्ण होत असतानाच विदर्भातील एका वाचकाने ' मेकॉलेचा नवीन अवतार ' असा लेख चिपळूणकरांना उद्देशून लिहिला होता. म्हणजे समकालीन टीकाकारांतही चिपळूणकर मेकॉलेचे अनुकरण करीत होते, हा मुद्दा मान्य पावला होता. इतर विषयांप्रमाणे निबंधमालेत चिपळूणकरांचा साहित्यविचार व्यक्त झालेला आहे. तसेच वाङ्मयसमीक्षाही केलेली आहे. या दोन्ही प्रांतातील त्यांच्या लेखनावर पाश्चात्यांचा प्रभाव पडलेला होता. विशेषतः मेकॉलेचे या संदर्भातील मत त्यांनी मार्गदर्शक मानले होते. काव्य, नाट्य, गाड्या अथवा इतर वाङ्मय तसेच इंग्रजी, संस्कृत वा मराठी साहित्य यावरील त्यांच्या विचारावर मेकॉलेप्रणित समीक्षापद्धतीचा पगडा होता असे दृष्टीस पडते. याबद्दलच्या काही निबंधांचा विचार आपण पुढे करणार आहोत.

मेकॉलेला त्याच्या आयुष्यात बरीच कीर्ती मिळाली. त्याचे ' इतिहास ' (१८२८), ' बेकन ' (१८३७) या व इतर विषयावरील निबंध त्यातील लेखनशैलीबद्दल प्रसिद्ध होते. तो ज्या प्रकारे १८ व्या व १९ व्या शतकातील शैलीचे मिश्रण करीत असे किंवा खंडन-मंदानपद्धतीचा व अलंकाराचा उपयोग करीत असे त्यामुळे शालेय शिक्षणात त्याच्या निबंधांना फार महत्व प्राप्त झाले होते. परंतु त्याची कीर्ती टिकली नाही. त्याचा आता विसर पडला आहे. त्याच्या विचारासाठी त्याचे निबंध कोणी वंचित नाही. मेकॉलेबाबतचा हा अभिप्राय काही अंशी जॉन्सनलाही लागू पडतो.

 

जॉन्सनचा आदर्श

मेकॉलेनंतर चिपळूणकारणांवर प्रभाव टाकणारा लेखक म्हणजे सॅम्युअल जॉन्सन. वाङ्मयाच्या इतिहासात नोंद घ्यावी असे उच्च दर्ज्याचे काहीही जॉन्सनने लिहिले नाही. त्याच्या काळातील ज्ञानभांडारास किंवा तत्त्वज्ञानास त्याने कोणतेही भरीव योगदान केले नाही. त्याची मते पूर्वग्रहदूषितपणाबद्दल प्रसिद्ध होती. त्याचा वाङ्मयविचारास तात्विक खोली फारशी नव्हती. त्याची कीर्ती त्याच्या कामगिरीपेक्षा त्याच्या व्यक्तिमत्वावर अवलंबून होती. जॉन्सनला वादविवादाची खुमखुमी फार होती व त्यात प्रतिपक्षावर कडी करण्यासाठी तो कोणत्याही मतांचा आधार घेत असे. ते मत त्याचे असेलच असे नव्हे. अठराव्या शतकातील इंग्रजी साहित्याच्या इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांना मात्र जॉन्सनची कामगिरी तपासून पाहावी लागते.

विष्णूशास्त्रींनवर जॉन्सनच्या साहित्यापेक्षा त्याच्या जीवनचरित्राचा व व्यक्तिमत्वाचा प्रभाव होता असे त्यांचे चरित्रकार सांगतात. ' डॉक्टर जॉन्सन हा आठ अंकांत प्रसिद्ध झालेला चिपळूणकरांचा निबंध म्हणजे त्यांचे स्पष्टपणे न लिहिलेले असे प्रच्छन्न आत्मचरित्र आहे असे म्हंटले गेले आहे. त्यांच्या व  जॉन्सनच्या जीवनात व स्वभावांत बरेच साम्य होते. मॅकोलेकडून विष्णूशास्त्रींनी  "काही साहित्यगुण उचलले असले तरी जॉन्सनच्या चारित्र्याचा जितका परिणाम त्यांच्या मनोजीवनावर झालेला होता तितका दुसऱ्या कोणत्याही लेखकाचा झाल्याचे दिसत नाही. जॉन्सनचे अकुतोयभाय आणि आव्हानप्रद व्यक्तिमत्व, त्याची राष्ट्राभिमानाने रसरसलेली आणि राष्ट्रवादाच्या कवचात अवगुंठित होऊन बसलेली व्यवच्छेदक अस्मिता " चिपळूणकरांना विलक्षण आदरणीय आणि अनुकरणीय वाटत होती. जॉन्सन त्यांना इंग्रजीच्या गुणावगुणांचा प्रतिनिधी म्हणून प्रिय होता. इंग्रजांच्या विजिगीषू अस्मितेविषयी चिपळूकरांना आश्चर्य, असूया व नितांत आदर वाटत असे. इंग्रजांचे देशाभिमान व स्वातंत्रप्रियता यासारखे गुण त्यांनी आदर्श मानले होते. या सर्वांचे प्रतिबिंब जॉन्सनच्या
जीवनात पडले होते. म्हणून जॉन्सनवरील त्यांचा प्रदीर्घ निबंध इतका चांगला वटला आहे. स्वतःचा दूराभिमान, दुराग्रह कोणत्याही परिस्थितीत सहसा सोडायचा नाही, प्रतिपक्षाची कोटी उलटली तरीही ती उडवून देऊन जितंमया अशा अभिनिवेशाने उलट त्याच्यावर तुटून पडायचे ही जॉन्सनची वादपद्धती चिपळूणकरांनी मनापासून अवलंबली असा पुरावा आपल्याला मालेत सर्वत्र मिळतो. जॉन्सनवरील निबंध चिपळूणकरांनी त्याच्या जीवनाशी अगदी समरस होऊन लिहिलेला आहे याचे कारण त्याची जीवनशैली त्यांना पसंत होती. तसेच त्यांनी इंग्रजी भाषेची जी सेवा केली, त्या भाषेत ग्रंथरचना करून तिला शोभा आणली व स्वतःच्या आचरणाने अभिमानास्पद स्थान स्वदेशात प्राप्त केले म्हणून चिपळूणकरांना जॉन्सनबद्दल मनापासून आदर वाटत होता. आपण स्वतः असेच काहीसे करतो आहोत व आपल्यात व जॉन्सनमध्ये साधर्म्य आहे याचा त्यांना अभिमान वाटत होता. इंग्रजी भाषेत आपल्या गद्यलेखनाने जॉन्सनने अठराव्या शतकात विशेष भर घातली, त्यामुळे चपळूणकरांना तो एक अनुकरणीय लेखक वाटत होता. आपण त्याच्याच वाटेने जातो आहोत याची जाणीव त्यांना होती. जॉन्सनवरील निबंधात या सर्वांची प्रचिती सतत येत राहते.

 

इंग्रजी ज्ञान विज्ञान

स्वतःच्या जीवितकार्याची प्रेरणा ज्यांना इंग्रजी साहित्य व संस्कृतीकडून मिळाली आणि मेकॉले व जॉन्सन यासारखे लेखक ज्यांचे आदर्श होते अशा विष्णूशास्त्रींनी इंग्रजांची प्रशंसा केली नसती तरच नवल घडले असते. निबंधमालेच्या पानोपानी इंग्रजी भाषा, साहित्य, इतिहास, विज्ञान, अर्थकारण, राष्ट्रीय स्वभावविशेष, समाज इत्यादींची प्रशंसा  आढळते. ती काही वेळा सकारण येते, काही वेळा विषयांतर करून येते. स्वकीयांशी तुलना करताना तर येतेच येते. सुधारक व सुशिक्षित मंडळी इंग्रजी संस्कृतीच्या आहारी गेली आहेत असा आरोप विष्णुशास्त्री सातत्याने करीत असत. मात्र इंग्रजांच्या प्रशंसेमध्ये ते स्वतः या मंडळींच्या पुढे होते असे म्हटले तर फार चुकीचे होणार नाही. इंग्रजी राज्य म्हणजे दैवी योग्य आहे असे न्या. रानड्यांसारखे सुधारक म्हणत असत. "इंग्रजांसारख्या  परम ज्ञानसंपन्न राष्ट्राशी सुदैवेकरून एतद्देशियांचा जो योग्य झाला आहे त्याचे जर साफल्य व्हावयाचे असेल... " हे चिपळूणकरांचे निरीक्षण रानड्यांपेक्षा फार वेगळे होते असे म्हणता येणार नाही.
हिंदुस्थानचा इंग्लंडशी जो योग्य जुळून आला त्याचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे इंग्रजी विद्येचा व आपला संबंध प्रस्थापित होणे. कारण इंग्लड हे परम ज्ञानसंपन्न राष्ट्र होते असे चिपळूणकरांचे मत होते. इंग्रजांच्या सहवासामुळे 'ज्ञानप्रसार करण्याची साधने आपणास अनुकूल ' झाली आहेत. इंग्रजी भाषेत जे "अगाध ज्ञान भरले आहे त्याचा पाट फोडून जर आपल्याला भाषेकडे वळविता येईल तर केवढी मजा येईल" असे त्यांना वाटत होते. निबंधमालेमार्फत ते हाच प्रयत्न जाणीवपूर्वक करीत होते. काव्यविषयक ग्रंथ इंग्रजी भाषेप्रमाणे संस्कृतमध्ये नाहीत, त्यामुळे काव्याचे स्वरूप काय असते, कवीस कोणते गुण आवश्यक आहेत, कवित्व ही ईश्वरी देणगी आहे की प्रयत्नाधीन आहे याचे निरूपण संस्कृतमध्ये सापडत नाही. युरोपातील सामान्य पंडितांस आमचे काव्यग्रंथ जसे समजतात तसे आपल्या शास्त्री-मंडळींनाही समजत नाहीत. या साहित्यातील अप्रतिम रसाचा आस्वाद घेण्यास आम्हाला इंग्रजी शिकविले नसते तर ते आम्हाला केव्हाही समजले नसते. इंग्लंडमध्ये ज्ञानप्रसाराची साधने इतकी उपलब्ध झाली आहेत के ' आळशी लोकांची मिजास सांभाळूनही त्यांना ज्ञानाच्या मार्गात ओढण्यास ' कादंबऱ्या, नाटके, पुस्तके, भाषणे, नाट्यप्रयोग इत्यादी प्रकार सतत वापरले जातात. तसे आपल्याकडे इंग्रजी राज्यामुळे अलीकडे शक्य होऊ लागले आहे. इंग्रजी विद्येच्या प्रसारामुळे अनेक विषयांचे ज्ञान भारतीयांना होऊ लागले आहे. इंग्रजी भाषेत वेगवेगळ्या विषयांवर बुद्धिमान लोकांनी वर्षानुवर्षे काम करून उत्तम ग्रंथ लिहिले आहेत. आपल्या नव्या पिढीला या ' ज्ञानरूप संपत्तीचा ' लाभ होतो आहे. इंग्रज सरकारच्या उदार आश्रयाने व्याकरण, कोष या क्षेत्रांत काम होऊ लागले आहे. त्यामुळे आपल्या भाषेची अभिवृद्धी होत आहे. लोकशिक्षणाचा उत्कृष्ट मार्ग त्यामुळे उपलब्ध झाला आहे. इंग्रजी भाषेच्या अनुकरणाने मराठीत नवे वाङ्मय-प्रकार सुरु झाले. गद्यलेखनाची पद्धत पडली. मराठी भाषेस त्याच मोठा लाभ झाला. नाटक किंवा कादंबरी हे प्रकार आपल्याकडे आले किंवा विनोदास महत्व प्राप्त झाले याचेही कारण इंग्रजी साहित्याचा प्रसार व प्रभावच. ग्रंथ लिहिण्यासाठी आवश्यक ते कष्ट करण्याची, उद्योग करण्याची, इंग्रजांच्या गुणांची तरफदारी चिपळूणकर मुक्तकंठाने करतात. इंग्रजी सरकारने हिंदुस्थानला दिलेली 'अमौलिक देणगी म्हणजे ज्ञान ' असा अभिप्राय चिपळूणकर व्यक्त करतात. जॉन्सन किंवा मेकॉले यांना ते इतके श्रेष्ठ ग्रंथकार मानीत होते की, त्यांच्यासारखे ग्रंथ मराठीत करून देण्यास अनेक ' दक्षिणाप्रेजकमिटी ' लागतील असे त्यांना वाटत होते. इंग्लडमध्ये मोठमोठे विद्वान असून सहस्रावधी सामान्य लोकांतही विद्येचा प्रसार पुष्कळ झाला आहे असे त्यांचे मत होते.

इंग्लंड व हिंदुस्थान यांचा संबंध आल्यामुळे विद्येचा, ज्ञानाचा प्रसार आपल्याकडे होतो आहे तसाच त्यांच्या विज्ञानातील प्रगतीचा फायदाही आपल्याला होणार आहे व होतो आहे असे विष्णूशास्त्रींना वाटत होते. त्यांनी विज्ञानात नवनवीन शोध लावले आहेत, नवी शास्त्रे निर्माण केली आहेत व त्यांचा विस्तारही केला आहे. " हे अपरंपार भांडवल आयतेच आमच्या स्वाधीन होणार आहे. " इंग्लडमध्ये अठराव्या व एकोणिसाव्या शतकांत विज्ञानाची प्रगती झाली होती व तेथे औद्योगिक क्रांतीही झाली होती. यामुळे तो वैज्ञानिक व आर्थिकदृष्ट्या प्रगत देश बनला होता. इंग्लंडने केलेल्या या प्रगतीचे विष्णुशास्त्रींना आश्चर्य वाटत होते. तसेच अशा देशाशी आपला संबंध आल्यामुळे आपला फायदा होईल असा अंदाज त्यांचा होता. व्यावहारिक कला हे संज्ञा वापरून ते म्हणतात की या कलांचे ज्ञान युरोपात व अमेरिकेत वाढले आहे व त्यामुळे मानवजातीचे कल्याण झाले आहे व होण्यासारखे आहे. छापखाना, आगगाडी, तारायंत्र, प्रकाशलेख्य, गिरणी अशा अद्भुत शक्ती आज निर्माण झाल्या आहेत. महाभारतातील अचाट गोष्टी एकोणिसाव्या शतकात प्रत्यक्षात घडू लागल्या आहेत. तंत्रज्ञानातील या सर्व आश्चर्यकारक गोष्टींचा उल्लेख करून विष्णूशास्त्री म्हणतात, "रावणाने जसे सर्व देव काबीज करून कोणाची पाककर्मावर, कोणाची सम्मार्जनावर वगैरे नेमणूक करून साऱ्यांस सारखे राबविले होते त्याचप्रमाणे आमच्या प्रस्तुतच्या राज्यकर्त्यांनी सर्व महाभूते वठणीस आणून त्यांजपासून ते चोपून कामे घेत आहेत." पाश्चात्यांची ही 'अपूर्व विद्या ' आपल्या पायांनी आमच्या देशास चालून आली आहे. ही 'मोठी सोय झाली ' होती असे विष्णूशास्त्रींना वाटत होते. त्याचप्रमाणे पूर्वी आपल्या देशाचा व्यापार अगदीच संकुचित झाला होता तो आता वैज्ञानिक प्रगतीमुळे जगभर होण्याच्या सोई झाल्या आहेत. आगगाड्या, आगबोटी, तारायंत्रे, टपाल या सर्वांपासून व्यापारी लोकांचा फायदा होत आहे. ' आमच्या देशाची स्थिती ' या त्यांच्या निबंधात विष्णूशास्त्रींनी पाश्चात्यांच्या यंत्रविद्येचा हा महिमा गायला आहे. इंग्रजी राज्यामुळे इतरही अनेक लाभ हिंदुस्थानी जनतेला झाले आहेत. त्यांतील दोन-तीन लाभ विसणुशास्त्री ठळकपणे नोंदवतात. " पूर्वी ज्या प्रकारची स्वस्थता या देशात बहुधा कधीही प्राप्त झाली नसेल " अशी इंग्रजी राज्य प्रस्थापित झाल्यापासून नांदत आहे. " लढाया, मारामाऱ्या, पेंढारी, दंगा वगैरे गोष्टी आता साऱ्या स्वप्नवत झाल्या आहेत ", "पाश्चात्य राज्याच्या विस्तीर्ण छायेखाली हे अवघे भरतखंड खुशाल झोपेत घोरत आहे " , "आढ्याला पाय लावून बिनधोक निजण्याचा काळ या राष्ट्रास यापूर्वी कधीही लाधला नाही " या शब्दात विष्णुशास्त्री इंग्रजी राज्यामुळे जी शांतता व सुव्यवस्था येथे प्रस्थापित झाली होती त्याचे वर्णन करतात. इंग्रजी राज्यात लोकांना ' मानसिक स्वातंत्र्य ' प्राप्त झाले. '' हवा तसा विचार करण्याची व ते विचार वागद्वारा किंवा लेखांद्वारा प्रसिद्ध करण्याची मोकळीक" मिळाली. पाश्चात्य लोकांपासून कित्ता घेण्यासारखी आणखी एक गोष्ट म्हणजे त्यांचा व्यवस्थितपणा. त्यांच्या या लोकोत्तर गुणामुळेच ते आपल्या अवाढव्य देशावर राज्य करू शकतात, हे विष्णूशास्त्रींनी जाणले होते. साहसप्रियता हा गुणही इंग्रजांकडून घेण्यासारखा आहे. हा गुण राष्ट्रात असेल तरच त्या राष्ट्राचा उत्कर्ष होतो. इंग्रजांची एवढी प्रगती झाली आहे व त्यांचे राज्य सर्वदूर पसरले आहे कारण त्यांची साहसप्रियता. जगात सर्वत्र इंग्रजी मंडळी साहस, प्रवास व नवनवे प्रांत शोधण्यात गुंतली आहेत. " राजकारण, युध्दकर्म, व्यापार, विद्या, कला, मुशाफिरी काहीही घ्या कोठेही कसूर आहे असे नाही. त्यामुळे इंग्रज या युगाचे विश्वकर्मेच होऊन बसले आहेत " असे निरीक्षण विष्णुशास्त्री नोंदवितात.
इंग्रजांची एवढी स्तुती त्यांनी केली याचा अर्थ वसाहतवादी राज्याचा हेतू त्यांच्या लक्षात आला नव्हता असे नव्हे. परोपकारबुद्धीने इंग्रजांनी येथे राज्य स्थापन केलेले नव्हते. या देशाच्या हिताव्यतिरिक्त अन्य काही हेतू त्यांच्या राज्य करण्यामागे होता हे बजावून या परकीय राजवटीमुळे आपल्या समाजाचे कोणते नुकसान झाले होते, याचा आढावा विष्णुशास्त्री 'आमच्या देशाची स्थिती ' या निबंधात घेतात. त्यांच्या मते इंग्रजी राज्यामुळे सर्वात मोठा तोटा जर कोणता झाला होता तर तो म्हणजे स्वातंत्र्यनाश हा होय. त्यामुळे आपल्या देशावरील आपला ताबा गेला होता. सर्व जमीन, जंगले, झाडे सरकारी मालकीची झाली होती. कोणताही कर बसविण्याचा अधिकार सरकारकडे गेला होता. लोकांना कोणतेही हक्क नव्हते. जे काही हक्क मिळत ते राज्यकर्त्यांच्या मेहेरबानीमुळे. राष्ट्र पिळून काढून भुकेकंगाल करण्याचा कट चालू होता. स्वदेशी मालाला काही किंमत उरली नव्हती. सर्व महत्व होते ते मँचेस्टरच्या कापडास. सरकारने शिक्षणाची उत्तम सोया केलेली होती. पण विद्यापीठातून बाहेर पडणाऱ्या पदवीधराने जर नोकरीची मागणी केली तर ती त्याला मिळत नसे. आणखी एक मोठे नुकसान इंग्रजी सत्तेमुळे झाले होते. हिंदुस्तानातील लोकांची मानसिक उन्नती थांबली होती. परवशता हळूहळू लोकांच्या अंगवळणी पडू लागली होती. लाचारी वाढत चालली होती, त्याचे त्यांना वाईट वाटत होते.
याच निबंधात विष्णुशास्त्री हेही निक्षून सांगतात की, स्वातंत्र्याला आम्ही लायक नव्हतो व पारतंत्र्य तत्कालीन स्थितीत हितावह होते ही मते खोटी होती. विष्णुशास्त्री इतिहासातील दाखले देऊन असे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात की, या देशातील लोकांनी हजारो वर्षे राज्य केलेले आहे. कर्तबगारी दाखविली आहे. युरोपातील लोक मागासलेले होते ठेवयेथे मोठी सुधारणा झालेली होती. प्राचीन काळापासून मध्ययुगीन काळापर्यंत कोणकोणते महापुरुष देशात होऊन गेले याचा उल्लेख करतात आणि या सर्वांचा नित्कर्ष म्हणून हिंदुस्थानातील लोक स्वातंत्र्यास योग्य होते व इंग्रजी राज्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता असे नव्हे, हे दाखवून देतात.

या प्रतिपादनामागे देशाभिमानाची , राष्ट्रभक्तीची कल्पना आहे. विष्णूशास्त्रींच्या सर्वच निबंधात हा देशाभिमानभरुन राहिलेला आहे. त्यांचा धर्माभिमान किंवा भाषाभिमान याचाही उगम देशाभिमानातूनच झाला होता. स्वभाषा स्वधर्म व स्वदेश यावर त्यांची अतोनात भक्ती होती व अवहेलना करणाऱ्या कोणाचीही तमा ते बालगीत नसत. हा त्यांचा देशाभिमान युरोपिअन लोकांचा इतिहास व सद्यःहस्थिती पाहून उत्पन्न झाला होता. जॉन्सन या त्यांच्या अडहर्षच त्यांना जाणवलेला व भावलेला एक गुण म्हणजे देशभक्ती. त्या त्या गुणांचा शास्त्रीबुवांच्या परिणाम झालेला होता, असे त्यांचे सर्व चरित्रकार सांगतात. देशाभिमान ही मनोवृत्ती आपल्याकडे आढळत नाही असे त्यांचे मत होते. याचे विवेचन आपण पुढे करणार आहोत.

 

स्वदेशाची प्रतिमा

हिंदुस्तानसारख्या पूर्वेकडील समाजापेक्षा पश्चिमेकडील समाज हे ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, राजकारण व अर्थकारण या प्रांतांत वरचढ आहेत, प्रगत आहेत आणि पूर्वेकडील देशांनी त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकल्या पाहिजेत, त्याशिवाय त्यांची सुधारणा होणार नाही. त्यांचे मागासलेपण नष्ट पावणार नाही हा ग्रँट, जेम्स मिल किंवा मेकॉले यांचा पौर्वात्यवादी विचार सर्वसाधारणतः चिपळूणकरांना मान्य होता हे वरील चर्चेत आपण पाहिले. पश्चिमेकडील देशांपेक्षा आपला देश बऱ्याच क्षेत्रांत मागासलेला आहे असे स्पष्ट मत चिपळूणकरांनी निबंधमालेतील निरनिराळ्या निबंधांत मांडले आहे. इंग्लंड व हिंदुस्थान किंवा पश्चिमी देश व पौर्वात्य देश यांची तुलना करीत त्यांच्यातील फरक सतत अधोरेखित केला आहे. पूर्व व पश्चिम यांतील फरकावर जोर देणे व पूर्व कशी वेगळी व मागास आहे याची नोंद करणे हे पौर्वात्यवादाचे एक महत्वाचे लक्षण चिपळूणकरांच्या या संदर्भातील चर्चेमध्ये स्पष्ट होत जाते. स्वदेशाची कोणती प्रतिमा त्यांच्या मनामध्ये होती, हिंदुस्थानकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय होता हे पाहणे त्यासाठीच आवश्यक आहे. स्वकीयांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन व स्वदेशाची यांची प्रतिमा पौर्वात्यवादाने निश्चित केलेली होती असे दिसते. त्यांनी मांडलेल्या पुढील मुद्द्यांवरून हे स्पष्ट होईल. ' इतिहास ' या त्यांच्या गाजलेल्या निबंधात हिंदुस्थानात इतिहास लिहिण्याची परंपरा कशी नव्हती हे ते उदाहरणे देऊन सांगतात. सप्रमाण इतिहास लिहिण्याची पद्धत जशी ग्रीक व रोमन लोकांत पडली तशी आपल्याकडे कधीही पडली नव्हती. इतिहासाचा अभाव हे आपल्या प्राचीन विद्येचे मोठेच व्यंग होय. पूर्वी जसा इतिहास नावाचा प्रकार प्रकार नव्हता तसाच विद्यासुख हा प्रकार ही आम्हाला माहित नव्हता. मनोरंजनाचे हे साधन जुन्या पिढीला उपलब्धच नव्हते. मराठीत ग्रंथ नव्हते असे नाही पण ते फार थोडे व दुर्मिळ होते. गद्यग्रंथ म्हणजे ऐतिहासिक किंवा पौराणिक बखरी, पंचोपाख्यान, विदुरनीति वगैरे मोजकी पुस्तके होती. पद्यग्रंथ असत. ते जास्तही असत. पण ते हरदासांकडे असत. त्यांच्या प्रती सर्वांना उपलब्ध नव्हत्या. लोकशिक्षणाचा प्रघात नसल्यामुळे लोकांत विद्याभिरुचीचा पूर्ण अभाव होता. पुराणे किंवा ज्ञानेश्वरी असे प्राकृत ग्रंथ हजारो लोक वाचीत पण केवळ पारमार्थिक बुद्धीने. ते पुण्यकर्म आहे या हेतूने त्यांचे पारायण चाले. अर्थज्ञान होऊन किंवा रसानुभव घेऊन वाचणारे फारच थोडे असत. ग्रंथवाचनाचा मार्ग उपलब्ध नसल्यामुळे करमणुकीसाठी पूर्वीच्या लोकांस सोंगट्या, बुद्धिबळ वगैरे खेळ, कैफ किंवा व्यभिचार अशी निंद्य व लज्जास्पद साधने जवळ करावी लागत. ' वाचन ' या निबंधात विष्णुशास्त्री वक्तृत्वगुणाची वाढ लोकसत्ताक राज्यात कशी होते असे सांगून ग्रीसमधील अथेन्स राज्यात नामांकित वक्ते कसे तयार झाले हे दाखवून देतात. इंग्लड - फ्रान्स किंवा अमेरिका या देशांत जेव्हा लोकांस अधिकाधिक स्वातंत्र्य मिळू लागले तेव्हा तेथेही वक्तृत्वकला प्रगत झाली. याउलट आशिया खंडात आजपर्यंत शेकडो मोठमोठी राज्ये होऊन गेली "पण एकातही वक्त्याच्या भाषणाने सगळे लोक एकदम चेतवून गेले आहेत, वक्त्यांच्या पाठशाळा, घातल्या असून त्यातून... व्याख्यान चालले आहे." अथवा संस्थानाच्या कारभाराच्या सभांतून " दोन वक्त्यांच्या परस्परांवर कोट्या प्रतीकोट्या चालल्या आहेत असा प्रकार बिलकुल कोठेही आढळत नाही." "फार काय पण वक्ता व वक्तृत्व हे शब्दही आशिया खंडातील कोणत्याही भाषेत सापडतील असे वाटत नाही. " पौर्वात्यवादात जे कारण अगदी बरोबर असते तेच कारण विष्णूशास्त्रींनी या फरकाचे दिले आहे. " आमच्या देशात राज्यात एक प्रकार काय तो साम्राज्याचाच होता म्हणजे सगळी सत्ता एका राजाच्या एक प्रकार काय तो साम्राज्याचाच होता म्हणजे सगळी सत्ता एका राजाच्या हाती असून सर्व प्रजा त्याची केवळ अंकित. अशीच राज्यपद्धती अगदी प्राचीन काळापासून तो आजपर्यंत सारखी चालत आली आहे. यास्तव वक्तृत्वाची उत्पत्ती येथे कधी झाली नाही. " "लोकसत्ताक राज्याची कल्पना इकडील पूर्वदेशीय लोकांच्या मनास किती अपरिचित आहे याची उत्कृष्ट प्रचिती आम्हांस आमच्या घरचीच आहे. हल्ली आमच्या देशात इतक्या हजारो सभा दर वर्षी उपस्थित होतात व लवकरच लयासही पावतात याचे मुख्य कारण पाहू गेले असता ही सभांची पद्धत केवळ अन्यदेशीय असल्यामुळे तिचे बी इकडील लोकप्रचारात रुजण्यास अजून पुष्कळ काळ पाहिजे हे होय असे आम्हास वाटते." "... आज हजारो वर्षे लोकप्रवृत्तीचा ओघ चालत आला आहे त्यास एकाएकीच वळण देऊ लागले असता कसे चालेल? ... लोकसत्ताक राज्याची कल्पना एशियाकडील लोकांस बिलकुल माहित नव्हती म्हणून संस्कृत, फारशी, अरबी वगैरे भाषांतून ग्रीक व लॅटिन भाषांप्रमाणे वक्तृत्वाचे ग्रंथ मुळीच नाहीत." पौर्वात्यवादी असे मानीत की, आशियाशी देशात पौर्वात्य एकाधिकारशाही (Oriental Despotism) नावाचा प्रकार रूढ होता. तेथे लोकसत्ताक पद्धती रुजण्यास पोषक वातावरण निर्माण झाले पाहिजे तोपर्यंत प्रातिनिधिक राजकीय संस्थांची सुरुवात करणे योग्य ठरणार नाही. नेमके हेच प्रतिपादन विष्णूशास्त्रींनीही केले आहे. इंग्रजी राज्य आल्यापासून वक्तृत्वकलेचा प्रसार आपल्या देशात होत आहे; पण ही कला अद्यापि बाल्यावस्थेत आहे. विद्येचा प्रसार होऊन वक्तृत्वकलेचा उगम आपल्याकडे झाला पण म्हणावा तास झाला नाही. दुसऱ्या प्रत्येक गोष्टीच्या संबंधी आमची सध्याची स्थिती जशी निकृष्टतेची आहे तशीच या बाबतीतही आहे असे त्यांना वाटत होते. युरोपातील देशाभिमानी पुरुषांत व येथील तशा लोकांत, कलाकौशल्याच्या सभांत आणि इकडील कौशल्य शिक्षक मंडळीत, तिकडील ल्यूथरसारखे धर्मसुधारक व आपल्याकडील दयानंद सरस्वतींसारखे लोक यांत जशी तफावत आढळते तशीच वक्तृत्वाचे कार्य करणाऱ्या मंडळीत व तिकडील वक्तृतगुणात आहे.

 

पाश्चात्य पौर्वात्य

पाश्चात्य -पौर्वात्य हा फरक विष्णूशास्त्रींच्या लेखनात सर्वत्र डोकावतो. आपल्या लोकांवर टीका करण्याची एकही संधी ते गमावत नाहीत. पाश्चात्यांच्या अनुकरणाने आपल्या देशात सभा व मंडळ्या सुरु झाल्या आहेत. त्यांचेकडून व्हावे तितके कार्य अद्यापि झालेले नाही. तरीही त्यांचे स्वागत ते करतात कारण लौकिक हितसंबंधाच्या बहुधा कोणतीच हालचाल आजपर्यंत जी मुळी होत नसे, ती स्थिती जाऊन लोकांस आज इतके तरी कळू लागले आहे की, नुसती आपली व आपल्या कुटुंबाच्या निर्वाहाची तजवीज केली म्हणजे कृतकृत्यता झाली असे नाही. औदासीन्याची ही वृत्ती आज शेकडो वर्षे आमच्या हाडामांसात खिळलेली होती. ही बधिरता मोडून मूळचा रुधिराभिसरण व्यापार पूर्ववत आमच्या राष्ट्ररूप शरीरात चालू झाला, हे लहानसान कार्य नव्हे. सार्वजनिक सभांचे तेज आपल्या देशात तितके पडत नाही कारण येथील लोकांना लोकस्वातंत्र्य ही गोष्टच माहीत नाही. याउलट विष्णुशास्त्री सांगतात की, इंग्लंडात मोठमोठ्या लोकांपासून यःकथित मजुरापर्यंत सर्वांस लोकांचे हक्क म्हणजे काय हे कळते आहे तेव्हा तेथे पार्लमेंटासारख्या सभा आहेत व त्यांचे सभासद निवडताना तिकडे मोठी गडबड उडून जाते, पण इकडे पाहावे तो अगदी प्राचीन काळापासून राजा म्हणजे ईश्वराचा अंश या कल्पना मनूच्या कारकिर्दीपासून आजपर्यंत खिळून राहिलेल्या आहेत.
जॉन्सनवरील चरित्रात्मक निबंधात विष्णुशास्त्री स्वदेशाची आणखी एक त्रुटी दाखवितात. ते सांगतात की, मराठीत किंवा हिंदुस्थानातील इतर कोणत्याही भाषेत चरित्रलेखनाचा प्रकार अजिबात आढळत नाही. इतिहासाच्या अभावी आपल्या राष्ट्राविषयी जुनी माहिती नाश्ता झाली तसेच चरित्रांचा अभावी महान पुरुषांची कर्तबगारी आपल्याला अज्ञात राहिली. शंकरविजय, भक्तिविजय असे काही ग्रंथ आहेत पण त्यांचे स्वरूप पौराणिक आहे ऐतिहासिक नव्हे. इंगजी विद्येचा प्रसार होत असल्याने आता चरित्रलेखन सुरु होईल अशी विष्णूशास्त्रींची कल्पना होती.

' अनुकरण ' या केसरीतील निबंधात विष्णूशास्त्रींनी इंग्रजांच्या कोणत्या गुणांचे अनुकरण करावे व आपण त्यांच्यात काय फरक आहे हे दाखवून दिले आहे व हे करताना हिंदुस्थानी समाजावर टीका केली आहे. त्याची वैगुण्ये उघड केली आहेत. इंग्रजांचा व्यवस्थितपणा व वक्तशीरपणा हे गुण अनुकरणीय आहेत असे त्यांचे मत होते. कारण आपल्याकडे त्याच्या अगदी उलट स्थिती आहे. मोठमोठ्या संस्थानांतील कारभारापासून ते जेवणावळीच्या साध्या कामापर्यंत आपल्याला काय दिसते? तर सुस्ती, अंदाधुंदी, हलगर्जीपणा, कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही. याउलट इंग्रजांचे वर्तन पाहिल्यास काय दिसते? राज्यकारभार , व्यापार, सामान्य व्यवहार चोहोकडे घड्याळाचा ठोका. सृष्टीचे व्यापार आजवर सुयंत्रपणे चालले आहेत तसाच प्रकार आमच्या राज्यकर्त्यांच्या व्यवहाराचा होय. इंग्रजांचा एक राष्ट्रीय गुण म्हणजे जात्यभिमान. या गुणामुळेच अफाट आर्यभूमीचे राज्य ते चालवू शकतात. इंग्रज सर्व देशभर पसरले आहेत पण प्रसंग पडला तर लगेच एकत्र येतात. परस्परांना मदत करतात. त्याची वैगुण्ये उघड केली आहेत. इंग्रजांचा व्यवस्थितपणा व वक्तशीरपणा हे गुण अनुकरणीय आहेत असे त्यांचे मत होते. कारण आपल्याकडे त्याच्या अगदी उलट स्थिती आहे. मोठमोठ्या संस्थानांतील कारभारापासून ते जेवणावळीच्या साध्या कामापर्यंत आपल्याला काय दिसते? तर सुस्ती, अंदाधुंदी, हलगर्जीपणा, कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही. याउलट इंग्रजांचे वर्तन पाहिल्यास काय दिसते? राज्यकारभार , व्यापार, सामान्य व्यवहार चोहोकडे घड्याळाचा ठोका. सृष्टीचे व्यापार आजवर सुयंत्रपणे चालले आहेत तसाच प्रकार आमच्या राज्यकर्त्यांच्या व्यवहाराचा होय. इंग्रजांचा एक राष्ट्रीय गुण म्हणजे जात्यभिमान. या गुणामुळेच अफाट आर्यभूमीचे राज्य ते चालवू शकतात. इंग्रज सर्व देशभर पसरले आहेत पण प्रसंग पडला तर लगेच एकत्र येतात. परस्परांना मदत करतात. एकदिलाने एकमेकांस पाठबळ देतात. तसेच पाश्चात्यांकडून आपण घेण्यासारखा आणखी एक गुण म्हणजे एकी. जात्यभिमान व एकी ही दोन्ही गुणवैशिष्ट्ये इंग्रजांना आज अत्युच्च स्थानावर घेऊन गेली आहेत. हिंदुस्थानात ह्या गुणांचा अभाव आहे. त्यामुळेच आपला पराभव झाला.

देशाभिमान ही मनोवृत्तीच म्हणण्यासारखी पूर्वेकडील देशातील लोकांना ठाऊक नाही. युरोप व अमेरिकेत स्वदेशप्रीती म्हणून एक प्रबळ मनोवृत्ती जशी आढळते तशी आशिया खंडातील कोणत्याही देशात आढळत नाही असे सांगून विष्णुशास्त्री १८५७ च्या बंडाची व पश्चिमेकडील बंडांची तुलना करतात. त्यांच्या मते इंग्लंड, फ्रान्स किंवा अमेरिकेतील बंडे व १८५७ चे बंड यांत अतिशय अंतर आहे. त्या देशांतील " दंगेकराच्या बाबतीवरून झाले आणि इकडील बंडास कारण देशाभिमान बिलकुल नसून केवळ धर्माभिमान होय. " " काडतूस या एका शब्दाने सारा बंगाल इलाखा क्षणात पेटवून दिला. पण इतकी काली फौज जी एकाएकी बिथरली तिच्यापैकी एकाही शिपायाच्या अंगी सारा बंगाल इलाखा क्षणात पेटवून दिला. पण इतकी काली फौज जी एकाएकी बिथरली तिच्यापैकी एकाही शिपायाच्या अंगी ह्यामडन किंवा वॉशिंग्टन यांच्या अंगातला आवेश संचारला असेल असे बिलकुल म्हणवत नाही. आपल्याकडे लोकांस अभिमानास चढवायची बाजू कोणती ? तर यज्ञोपवीत, गोब्राह्मण इत्यादी. स्वातंत्र्य, जन्मभूमी या शब्दांत वरच्यासारखा प्रभाव प्राच्य देशात थोडाच आढळतो." आपल्या देशात स्वदेशाविषयी अभिमान नाही, हा मुद्दा विष्णुशास्त्री वारंवार मांडताना दिसतात. 'अनुकरण ' या निबंधात ते म्हणतात, आपल्या देशात सर्वांची स्वार्थावर नजर असते. एकट्याच्या हिताकरिता सारे राष्ट्रही बुडवायला ते मागेपुढे पहावयाचे नाही. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही. गुलामगिरीचे मेलेले अन्न खाण्याची हौस. हा प्रकार चोहोकडे माजला आहे. " राष्ट्राची तर गोष्ट राहिलीच पण आपली ज्ञाती, आपले कुटुंब, आपली मंडळी एवढ्यापुरती सुद्धा एकी आढळेनाशी झाली आहे. " युरोपात देशाकरता प्राण देण्यास लोक मागे-पुढे पाहत नाहीत आपल्याकडे मात्र संकुचित मनोवृत्तीने स्वदेशाकडे पाहिले जाते. आपल्या समाजातील अनेक अपप्रवृत्तींचा उल्लेख विष्णुशास्त्री जागोजाग करतात व युरोपात कसे त्याच्या उलट चित्र दिसते. याकडे आपले लक्ष वेधतात. फक्त अनुकरण करणे, आरंभशूरत्व, मत्सर , अविश्वास, क्षुद्रप्रवृत्ती, कपटभाव, औदार्याचा अभाव, आप्पलपोटेपणा, कमकुवतपणा, मनोधैर्याचा अभाव, जोम नसणे, आवेश नसणे, साहसप्रवृत्तीचा अभाव, रिकामटेकडेपणा, राजे-राजवाड्यांची मिजास, आळस व वेडेपणा, समजुतींचा मूर्खपणा, व्यसनीपणा, उद्योगीपणाचा अभाव इत्यादि अवगुणांची चर्चा त्यांनी निरनिराळ्या निबंधांत केली आहे ती वाचून वाचकास लोकहितवादींची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. परंतु याच लोकहितवादींवर विष्णूशास्त्रींनी जबरदस्त हल्ला एक मोठा निबंध लिहून केला होता हे सर्वश्रुत आहे. या निबंधातील एक महत्वाचा मुद्दा म्हणजे लोकहितवादी स्वकीयांचे दोष अत्यंत कडक भाषेत दाखवितात हा होय. विष्णूशास्त्रींची स्वदेशावरील टीका वाचून असे लक्षात येते की, त्यांच्यात व लोकहितवादींमध्ये या बाबतीत बरेच साम्य आहे. पूर्वी म्हटल्याप्रमाणे पौर्वात्यवादाचे एक प्रमुख अंग होते, पौर्वात्य व पाश्चिमात्य यांतील तफावत - फरक दर्शविणे; पौर्वात्य संस्कृती नावाची एक वेगळी संस्कृती मानणे व तिची वैशिष्ट्ये पश्चिमेकडील संस्कृतीपेक्षा कशी निराळी होती हे स्पष्ट करणे. पौर्वात्य संस्कृती नावाची एक वेगळी संस्कृती मानणे व तिची वैशिष्ट्ये पश्चिमेकडील संस्कृतीपेक्षा कशी निराळी होती हे स्पष्ट करणे. पौर्वात्य संस्कृती आध्यात्मिकतेवर जोर देते तर पाश्चिमात्य ऐहिकतेवर असा फरक मानणे हा त्यातीलच एक भाग होता. विष्णुशास्त्रींनी हा मुद्दा पूर्णपणे आत्मसात केला होता. आपल्या देशात इतिहास लिहिण्याची प्रथा पडली नाही त्याचे एक कारण म्हणजे आपल्या लोकांच्या मनाचा " एकंदर कल निवृत्तिमार्गाकडे जेवढा दृष्टीस पडतो तेवढा प्रवृत्तिमार्गाकडे नाही. " जग सर्व मिथ्या आहे अशी भावना आपल्या लोकांत दृढ झाली आहे. प्रपंचातील सर्व व्यवहार म्हणजे ईश्वरी मायेचा गोंधळ आहे अशी समजूत असल्यामुळे व परमार्थाकडे विशेष ओढा असल्यामुळे रक्तपात, राज्याच्या घडामोडी इत्यादींची वर्णने करणे किंवा असामान्य रक्तपात, राज्याच्या घडामोडी इत्यादींची वर्णने करणे किंवा असामान्य व्यक्तींची स्तुती गात बसणे निरर्थक वाटणे साहजिकच आहे. म्हणून इतिहास-लेखन आपल्या लोकांनी केले नसावे अशी कारणमीमांसा विष्णुशास्त्री करतात. अर्थज्ञान होण्यासाठी किंवा रसास्वाद घेण्यासाठी वाचन करण्याची पद्धती आपल्याकडे कशी नव्हती व धार्मिक ग्रंथांचे पारायण पारमार्थिक हेतूने कसे केले जायचे हे विष्णूशास्त्रीचें निरीक्षण आपण यापूर्वी दिलेले आहेच. हिंदुस्थानी लोकांचा कल परमार्थाकडे  आहे हाच मुद्दा त्यासंदर्भात विष्णुशास्त्री मांडताना दिसतात. ' वक्तृत्व ' या निबंधातही यांनी हा मुद्दा मांडला आहे. " अध्यात्म या विषयावर हिंदुस्थानात पूर्वीपासून जितका विचार झाला व एकंदर लोकांच्या मनाचा तिकडे जितका पूर्ण कल आढळतो तितका बहुदा पृथ्वीवरील थोड्याच देशांत सापडेल." प्राचीन काली आध्यात्मिक वृत्तीचे प्राबल्य होतेच पण अलीकडच्या काळातही एत्तद्देशीय लोकांचा कल अध्यात्माकडे असल्याचे विष्णूशास्त्रींना दिसते. उदाहरणार्थ, कवितेसाठी इतके विषय असताना व जगातील इतर भाषांत ते हाताळले जात असताना आपल्याकडील भाषांत कवितेचा " धर्माच्या व परमार्थाच्या विषयाकडेच विशेष रोख दृष्टीस पडतो. " वक्तृत्वाचा ओघही आपल्याकडे पूर्वीपासून " ऐहिक विषयाकडे न वळता पारलौकिक हिताच्या साधनांकडे वळला" संस्कृत व मराठी कवितेची तुलना करून मराठी कवितेचे एक वैगुण्य म्हणून विष्णुशास्त्री सांगतात की, मराठी कवींचा उद्देश " लोकांची मने प्रवृत्तिमार्गाकडून निघून निवृत्तिमार्गाकडे लागावी" हा होता. मराठी कवितेत भक्ती व वैराग्य या रसांचे प्राबल्य आहे. याउलट संस्कृत कवितेचा कल सामान्यतः आथिर्क विषयांकडे होता. मराठी कवितेनेही ऐहिक विषयांकडे वळावे असे विष्णूशास्त्रीचें म्हणणे होते असे वाटते.

 

विद्येचे पुनरुज्जीवन

पाश्चात्य व पौर्वात्य असा भेद स्पष्ट करीत असताना विष्णूशास्त्रींना हे जाणवत होते की, ज्याप्रमाणे पश्चिमेत एके काळी पुनरुज्जीवन झाले तसेच येथेही होईल व ते इंग्रजी ज्ञान व विज्ञानामुळे होईल. ' आमच्या देशाची स्थिती ' या आपल्या सर्वात महत्वाच्या निबंधात विष्णूशास्त्रींनी पुनरुज्जीवनाचा सिद्धांत मांडला आहे. त्यास त्यांनी ' विद्येचे पुनरुज्जीवन 'असे संबोधिले आहे. विद्येचे पुनरुज्जीवन झाले तर समाजात स्थित्यंतर होते असा त्यांचा विश्वास होता. युरोपात असेच झाले होते. विष्णूशास्त्रीचें प्रमेय थोडक्यात पुढीलप्रमाणे सांगता येईल. युरोपातील देश शतकानुशतके अद्याननिद्रेत होते. ग्रीक व रोमनांच्या प्राचीन विद्येमुळे त्यांची जागृती झाली. अनेक बंधनांतून युरोपातील समाज मुक्त झाले. धर्मगुरूंचा अमल त्यांनी झुगारून दिला. नवे धर्मपंथ उदयाला आले. पारलौकिक पारतंत्र्याचा नाश करून लोक राजेशाहीवर उलटले व त्यांनी स्वतःचे हक्क प्रस्थापित केले. राजा म्हणजे ईश्वरी अंश होय असा असमंजस कल्पनांचा त्याग केला. " सज्ञान दशेचे फळ देशोन्नती हे होय" असा नित्कर्ष काढून विष्णुशास्त्री सांगतात की, आपल्या देशातही जो जो इंग्रजी विद्येचा प्रसार होत जाईल तो तो सुधारणा, स्वातंत्र्य, सुख यांचा प्रसार अवश्य होत जाणार. इंग्रजी विद्येचे वज्र आपल्या समाजात स्थित्यंतर घडवून आणेल. आपला देश " कुंभकर्णासारख्या निद्रपद भोगीत स्वस्थ व सुस्त होऊन पडला आहे त्यास जागे करण्याची प्रथम तजवीज झाली पाहिजे " 'अज्ञानध्वंसनाची ' अलीकडे जबरदस्त साधने उपलब्ध झाली आहेत त्याचा योग्य तो वापर केला पाहिजे. देशस्थिती सुधारण्याचा राजमान्य मार्ग म्हणजे लोकांस ज्ञानसंपन्न करणे. ज्ञानसंपन्न करण्याची दोन मोठी साधने म्हणजे " रसना व लेखणी " रसना या प्रकारात शाळा, व्याख्याने यांचा समावेश होतो तर दुसऱ्या प्रकारात वृत्तपत्रे, मासिके व ग्रंथ येतात. सरकारने या बाबतीत बराच वाट उचलला आहे. शाळा-विद्यापीठांची स्थापना केली आहे. देशभाषांची वृद्धी व्हावी म्हणूनही प्रयत्न केला आहे. बाकीचा भार लोकांनी उचलला पाहिजे. " सर्व क्रियेचे मूळ मन आहे यास्तव तेच सुविचारसंपन्न व पोक्त झाले असता केवढा फायदा होणार बरे ?" असे प्रमेय मांडून विष्णुशास्त्री म्हणतात की, मनास ही अवस्था प्राप्त करून देण्यात इंग्रजी विद्या उपयुक्त ठरणार आहे. भारताची एकोणिसाव्या शतकातील व इंग्लंडची जॉन्सनच्या काळातील म्हणजेच अठराव्या शतकातील परिस्थितीत विष्णूशास्त्रींच्या काळातील मराठी भाषेप्रमाणे होती. वाचकांच्याकडेही इकडच्या वाचकांइतकीच अभिज्ञता व रसिकता होती. लोकस्थितीतही साम्य होते. सरकार व प्रजा यांच्यात अधिकाराबाबत जशी स्पर्धा येथे लागली होती तशीच अठराव्या शतकात इंग्लडमध्ये लागली होती.

जॉन्सनच्या काळात इंग्रजी भाषेस परिपक्वता आणण्याचे प्रयत्न झाले. जॉन्सनने स्वतःच कोशाची निर्मिती केली. त्यामुळे भाषेचे नियमन होऊ शकले. तसेच निबंध, कादंबरी व चरित्र यासारखे वाङ्मयप्रकार रूढ झाले. त्रैमासिकांची सुरुवात झाली. कादंबरी हा प्रकार हाताळणारे सर वॉल्टर स्कॉट सारखे कादंबरीकार उदयास आले. चरित्रांची रचना करण्यात आली. विलीयम रॉबर्टसन सारख्या इतिहासकारांनी इतिहासग्रंथांची निर्मिती केली. या सर्वांच्या अथक परिश्रमातून इंग्रजी भाषेची उन्नती होऊ शकली. विष्णूशास्त्रींच्या मते असाच प्रकार मराठीबाबतही होऊ शकेल. त्या दिशेने प्रारंभही झाला आहे. दादोबा पांडुरंगांचे व्याकरण, मोल्स्वर्थ यांचा कोश असे प्रयत्न होऊ लागले आहेत. याच मार्गाने गेल्यास मराठी भाषेची अभिवृद्धी होऊ शकेल. इंग्लिश भाषेत गद्यप्रकार जॉन्सनच्या काळात जसे उदयाला आले तसे आपल्याकडेही होऊ लागले होते. निबंध, कादंबरी, चरित्र व इतिहास हे गद्यप्रकार विष्णूशास्त्रींच्या काळात सुरु होत होते. स्वतः विष्णूशास्त्रीच निबंधमालेतून निबंध व चरित्र हे प्रकार अत्यंत समर्थपणे हाताळीत होते. कोष, व्याकरण व गद्यप्रकार या सर्वच क्षेत्रांत नव्या सुशिक्षितांनी लढा घालून इंग्लंडचा व जॉन्सनचा आदर्श ठेऊन मराठी भाषेची उन्नती केली पाहिजेत. सध्याचे प्रयत्न पुरेसे नव्हेत. दीर्घकाळ व सरकारवर अवलंबून न राहता लोकाश्रयाच्या जोरावर हे काम केले पाहिजे, असे विष्णूशास्त्रीचें मत होते.

भाषेच्या स्थितीप्रमाणे लोकस्थितीतही जॉन्सनच्या काळ व विष्णूशास्त्रींचा काळ यांत साम्य होते विष्णूशास्त्रींना वाटत होते. इंग्लंडमध्ये लोकांच्या अधिकाराचा प्रश्न अठराव्या शतकात धसाला लागला होता. अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धामुळे हा प्रश्न चर्चेला आला होता व त्यात राजा व त्याचा पक्ष मागे पडून लोकपक्ष पुढे आला होता. हिंदुस्थानात एकोणिसाव्या शतकात नेमके हेच घडत होते असे विष्णूशास्त्रींना दिसत होते. पाश्चात्य विद्येच्या संस्कारामुळे लोकांची जागृती होत होती. वर्तमानपत्रांचा प्रसार होऊन सार्वजनिक सभा सुरु झाली आहे. सामाजिक प्रश्नांची जाहीर चर्चा होऊ लागली आहे. इंग्लिश लोकांनी ज्या सुधारणा सुरु केल्या, जे शिक्षण - विद्या येथे सुरु केली त्यातून हे सारे घडते आहे व हळूहळू लोकांना अधिकार द्यावेच लागतील असे त्यांना वाटत होते. इंग्लडमधील लोकांनी आपले गाऱ्हाणे सरकारच्या घातले, हक्कांसाठी आग्रह धरला त्याप्रमाणे स्वदेशातील सुशिक्षितांनी करावे. काही सरकारी अधिकारी किंवा किंवा इंग्रजी वृत्तपत्रे त्यास विरोध करतील पण त्यास न जुमानता प्रयत्न चालू ठेवाला पाहिजे. ज्या देशात व बर्क यासारखे महात्मे निपजले किंवा बाईट-फॉसेट यासारखे निपक्षपाती आजहीआहेत त्या देशात गाऱ्हाणे पोहोचले तर त्याचा काही काळानंतर का होईना उपयोग होईल.

 

सामाजिक स्थित्यंतर

समाजाच्या, देशाच्या स्थित्यंतराबाबत युरोपात जो विचार मान्य पावत होता तो विचार विष्णूशास्त्रींनीं जसाच्या तसा स्वीकारला असे दिसते. कोणत्या देशास सुधारलेला देश मानायचे व कोणत्या देशास मागासलेला याचे निर्णय त्यांनी पॊर्वात्यवादाकडून घेतले होते. हा विचार, हा निकष विष्णुशास्त्रीने पुढील प्रकारे अंगिकारला होता. कोणत्याही समाजात आरंभी कल्पनेचा विकास होऊ लागतो व नंतर बुद्धीची वाढ होते. लहान मुलाची कल्पनाशक्ती सुरुवातीस होत जाते व जसजसे त्यास कळू लागते तसतसा सारासारविचार वाढतो. तो कशात आहे, कशात नाही याचे विवेचन तो करू लागतो. माणसाच्या विकासात हे जसे घडते तसेच एकंदर राष्ट्रातही आढळते. सर्व समाजात प्रारंभीचे ग्रंथ कवितेचेच असतात तो काळ अप्रबुद्धतेचा असतो. कल्पनेचे प्राबल्य त्या काळात असते. त्यामुळे उच्च दर्जाचे काव्य निर्माण होते. पण पुढे कल्पना जाऊन तिच्या जागी विवेचनशक्तीचा जोर वाढतो. नानाविध शास्त्रांची निर्मिती होते. अंतराळात काय चमत्कार आहेत, पृथ्वीच्या पोटात रचना कशी आहे, मनोव्यापार कोणत्या नियमांनी चालतात वगैरे गोष्टींकडे लोकांचे मन वळते. मेकॉलेच्या एडिंबर्ग रिव्ह्यू मधील निबंधातील पुढील विचाराचा प्रभाव विष्णूशास्त्रींच्या या संदर्भातील मांडणीवर पडलेला स्पष्टपणे दिसतो.
We think that, as civilization advances, poetry almost necessarily declines... Nations like individuals first perceive and then abstract. They advance from particular images to general terms. Hence the vocabulary of an enlightened society is philosophical, that of a half civilised people is poetical. This change in the language of men is partly the cause and partly the effect of a corresponding change in the nature of their intellectual operations, of a change by which science gains and poetry loses. In a rude state of society men are children with a greater variety of ideas. In an enlightened age there will be much intelligence, much science, much philosophy...little poetry. And as the magic lantern acts... As the light of knowledge breaks in... ' विद्वत्व आणि कवित्व ' या निबंधात हा सिद्धांत विष्णूशास्त्रींनी सविस्तरपणे मांडला आहे. युरोपातील प्रबोधनाच्या युगातील एक मूलभूत विचार होता समाजविकासाबाबतचा. राष्ट्राची आद्यस्थिती म्हणजे मनुष्याच्या आद्यस्थितीसारखी असते. लहानपणी कुतूहल सतत जागृत असते तसेच जे राष्ट्र बाल्यावस्थेत असते त्याचे असते. त्यास सृष्टीची राहाटी पाहून चमत्कार वाटतो. परंतु सज्ञान राष्ट्रास पदार्थविज्ञान वगैरे शास्त्रांची माहिती होऊन सृष्टीचे बरेच यथार्थज्ञान झाले असल्यामुळे त्याची जिज्ञासा तृप्त झालेली असते. बाल्यावस्थेतील राष्ट्राची मात्र हे चमत्कार पाहून मती गुंग होऊन जाते. राष्ट्राच्या पूर्वस्थितीत धर्माचे प्राबल्य जास्त असते आपल्या देशात तर प्राचीन काळी व आत्ताही लोकांचा कल एकंदरीत अध्यात्माकडे आहे. कवितेचे इतके विषय असताना आपल्याकडे मात्र सर्व भाषांत धर्माच्या व परमार्थाच्या विषयाकडेच विशेष ओढा दिसतो. (हे मुद्दे वरील चर्चेत आपण नोंदले आहेतच. ) वक्तृत्वाबाबतही तेच आढळते. वक्तृत्वाचा विषय राजकारण, देशाभिमान वगैरे नसून धर्म हाच राहिला आहे. ग्रीक व रोमन लोकांप्रमाणे येथे ऐहिक विषयाकडे वक्तृत्वकला वळली नाही. पारलौकिक हिताच्या बाजूनेच ती वळली. या वर्णनामागे विष्णूशास्त्रींची भूमिका दडलेली दिसते. त्यांच्या मते राष्ट्राच्या पूर्वावस्थेत धर्म व अध्यात्माचे, कल्पनाशक्तीचे व कवितेचे प्राबल्य असते ती अवस्था जाऊन समाजाचा विकास झाला म्हणजे या गोष्टी मागे पडून शास्त्र, सारासारविचार यांचे महत्व वाढत जाते. कवितेचे महत्व कमी होऊन, गद्यलेखनास सुरुवात होते. ' इंग्रजी भाषा ' या निबंधात गद्यलेखनाबाबतचा त्यांचा विचार स्पष्टपणे येतो. भाषेत गद्य ग्रंथाचा प्रसार सुरु होणे हे , लोकसुधारणेचे एक मोठे चिन्ह होय. पद्यरचना जाऊन गद्याकडे काळ होतो तेव्हा केवळ मनोरंजन करणाऱ्या विषयांपेक्षा अधिक योग्यतेच्या विषयाकडे लोकांची मने वळतात. गद्यात  ज्या विषयावर लेखन होते तो विषय सर्वसाधारणतः शास्त्रीय असतो. व्यावहारिक भाषेत शास्त्रीय विषयावर गद्यलेखन करणे हे राष्ट्राच्या सज्ञान अवस्थेचे लक्षण असते. या निरीक्षणाचा पाठपुरावा विष्णुशास्त्री वेगवेगळ्या निबंधात करताना दिसतात. इंग्रजी भाषेचे उदाहरण घेऊन ते वाचकांना सांगतात की, त्या भाषेत एलिझाबेथच्या कारकिर्दीपासून गद्यलेखनाची सुरुवात झाली. प्राचीन ग्रीक व रोमन ग्रंथांचे अध्ययन सुरु झाल्यामुळे युरोपातील सर्वच देशांत जागृती होऊ लागली. तोच प्रकार इंग्लंडातही घडून आला. बेकन, हुकर, सारखे महान लेखक गद्यलेखन करू लागले आणि इंग्रजी भाषा विकास पावू लागली. त्या भाषेला ' प्रौढ व मनोवेधक रूप ' प्राप्त झाले. असाच विकास हिंदुस्थानातील भाषांमध्ये होऊ लागला होता. या विकासात इंग्रजी भाषेचा संपर्क, इंग्रजी विद्येचा संस्कार अत्यंत महत्वाचा ठरत होता असे विष्णूशास्त्रीचें निरीक्षण होते. ( ते आपण पूर्वी नोंदले आहे.) ' मराठी भाषेची सांप्रतची स्थिती ' या निबंधात मराठी भाषेच्या तत्कालीन परिस्थितीचे वर्णन करताना त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, मराठी भाषेच्या उत्कर्षास इंग्रजी भाषा उपयोगी पडणार आहे. "सर्व जगातील ज्ञानभांडार तीत साठविले असल्यामुळे तिचे साहाय्य मराठीसारख्या परिपक्व होऊ पाहणाऱ्या भाषेस होईल तितके थोडेच आहे."

अशा प्रकारे इंग्रजी विद्येच्या संपर्कामुळे आपल्या भाषेचे व समाजाचे पुनरुज्जीवन होत जाईल असा विचार मांडून विष्णुशास्त्री संस्कृतच्या पुनरुज्जीवनाकडे वळतात. प्राचीन विद्यांचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न त्या काळात सुरु झाले होते. त्यामध्ये पाश्चात्य विद्वानांनी पुढाकार घेतला होता त्याबद्दल संतोष व्यक्त करून विष्णुशास्त्री म्हणतात की, संस्कृतच्या अभ्यासामुळे देशभाषेची बरीच सुधारणा होऊ लागली आहे. संस्कृतच्या अभ्यासामुळे मराठीसारख्या भाषेचीच सुधारणा होणार होती असे नव्हे तर सर्वच प्राचीन विद्यांची महती कळणार होती. लॅटिन व ग्रीक या भाषांच्या अभ्यासामुळे इंग्रजीसारख्या युरोपातील भाषांमध्ये सुधारणा झाली. त्यांतील हजारो शब्द इंग्रजी भाषेत आले व त्या भाषांची पद्धतीही इंग्रजीने काही प्रमाणात उचलली. संस्कृतच्या अभ्यासामुळे महाराष्ट्रभाषेत तसाच फेरफार होत चालला होता. महाराष्ट्रभाषेतही संस्कृतच्या पुनरुज्जीवनामुळे प्रौढता व सरसता येणार आहे. शास्त्रीय परिभाषा निर्माण होण्यास इंग्रजीस जसा लॅटिनचा उपयोग झाला तसाच संस्कृतचा उपयोग मराठी भाषेत शास्त्रीय परिभाषा निर्माण होण्यास होईल असा त्यांचा अंदाज होता. लोकहितवादींनी ब्राह्मणांच्या विद्येची टवाळी केली तेव्हा विष्णूशास्त्रींनी संस्कृत भाषेच्या परिभाषा निर्माण होण्यास होईल असा त्यांचा अंदाज होता. लोकहितवादींनी ब्राह्मणांच्या विद्येची टवाळी केली तेव्हा विष्णूशास्त्रींनी संस्कृत भाषेच्या पुनरुज्जीवनाचा आग्रह धरला. पश्चिमी देशांत संस्कृतचा अभ्यास दिवसेंदिवस वाढत चालला असताना हिंदुस्थानात मात्र पाठशाळा बंद करण्याचा प्रयत्न चालू आहे यावर त्यांनी टीका केली होती, ती याच भूमिकेतून मेकॉलेसारख्या संस्कृत विद्येस गौण मानणाऱ्या अन्यथा त्यांना प्रिय असणाऱ्या लेखकावरही विष्णूशास्त्री हल्ला करतात. कारण त्यांचा असा विश्वास होता की, संस्कृत विद्येच्या पुनरुज्जीवनातून देशभाषेचा विकास होईल व त्यातूनच लोकस्थितीत फरक पडेल. एकूणच स्थित्यंतर घडून येईल. इंग्रजी व संस्कृत विद्येच्या संस्कारामुळे या समाजात पुनरुज्जीवन घडून येईल, या त्यांच्या विश्वासाचे, पुरावे निरनिराळ्या निबंधातून आढळतात. तसेच समाजामध्ये जे स्थित्यंतर होते त्याचे दर्शन भाषेत होणाऱ्या परिवर्तनात दृष्टीस पडते, हा त्यांचा मुद्दाही आपल्याला त्यांच्या लेखनात सर्वत्र दिसतो.

 

सामाजिक सुधारणा

विद्येचे पुनरुज्जीवन या सिद्धांतावर शास्त्रीबुवांचा गाढ विश्वास असल्यामुळे अज्ञानाचा अंधकार कमी होत जाऊन ज्ञानप्राप्ती झाल्यास लोकांची मने ' सुविचारसंपन्न ' व ' पोक्त ' होतील; आणि हेच सुधारणेचे लक्षण होय, असे त्यांचे मत होते. ' लोकभ्रम ' या निबंधात त्यांनी भुतेखेते, शकुन, शुभाशुभयोग देव, नवस, ज्योतिष व अशा प्रकारच्या अंधश्रद्धा व धर्माचा कसा संबंध नाही हे रोजच्या जीवनातील उदाहरणे घेऊन पटवून दिले आहे. विज्ञानाच्या प्रगतीमुळे या कल्पना कशा वेडगळपणाच्या ठरतात, समाजाच्या पूर्वस्थितीत यांना स्थान असते पण जसा विज्ञानाचा प्रकाश पडत जातो तसा त्यातील अडाणीपणा लक्षात येतो. न्यूटन, गॅलिलिओ व केपलर या शास्त्रज्ञांच्या शोधांचा संदर्भ घेऊन विष्णूशास्त्रींनी हा मुद्दा स्पष्ट केला आहे. विज्ञानामुळे निसर्गातील घटनांचा कार्यकारणभाव कळतो तेव्हा आस्तिक्यबुध्दी दृढ होते असे मत त्यांनी ' लोकभ्रम ' या निबंधात शेवटी व्यक्त केले आहे.

परंतु त्या काळात चालू असलेल्या समाजसुधारणेबाबत विष्णूशास्त्रींची भूमिका अंतर्विरोधाने भरलेली होती असे दिसते. लोकहितवादी, न्या. रानडे, म. फुले आणि स्वामी दयानंद या सुधारकांवर त्यांनी अत्यंत तिखट भाषेत टीका केलेली आहे, त्यांची चेष्टा-कुचेष्टा केलेली आहे. स्त्रीचे कुटुंबातील व समाजातील स्थान यावर तत्कालीन सुधारकांचा विशेषतः उच्च जातीतील सुधारकांचा भर होता. विष्णूशास्त्रीचें या बाबतीतील म्हणणे थोडे वेगळे होते. ' लोकभ्रम ' या निबंधात त्यांनी विधवांमुळे अपशकुन होतो याचे परिणामकारक वर्णन या निबंधात आढळते परंतु याही पुढे जाऊन जॉन्सनवरील निबंधात ते स्त्रीचे हक्क ही संज्ञा वापरतात. बायकोस आपल्यावाचून दुसरी गती नाही, आपण पाहिजे तसा तिच्यावर अंमल चालवला तरी चालतो, हे लक्षात घेऊन तिचा सतत जाच करणे या हे परम अधमपणाचे कृत्य आहे. रथचक्रन्यायाने स्त्रीचा अधिकार संसार-कृत्यात पुरुषाच्या बरोबर आहे यास्तव तो तिला देणे हे रास्त आहे. आमच्या जुन्या पिढीस स्त्रीचे हक्क समजत नाहीत. नवी बायको करणे व नवा जोड विकत घेणे या दोन्ही गोष्टी त्यांना सारख्याच वाटतात व त्यामुळे चार-पाच पर्यंत बायका करण्याचा प्रघात चालत आला आहे. स्त्रीच्या कुटुंबातील स्थानाबद्दल विष्णूशास्त्रीचें मत असे असले तरी किंवा स्त्रियांच्या दु:स्थितीबद्दल त्यांना जाणीव होती तरी ते समाजसुधारकांच्या भूमिकेस पाठिंबा देत होते असे नव्हे. रानडे, लोकहितवादी किंवा आगरकर यांनी स्त्रियांच्या स्थितीबाबत कनवाळूपणे फक्त लिहिले नाही तर त्या स्थितीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी सुधारणा करणे  आवश्यक आहेत असा आग्रह धरला. विष्णूशास्त्रींनी मात्र सुधारकांच्या प्रयत्नांतील दोष, अपुरेपणा, उथळपणा व धैर्याचा अभाव यावर हल्ला चढविला. सुधारणांचा पुरस्कार केला नाही, पण त्याचबरोबर हेही खरे आहे की त्यांचा सुधारणेस पाठिंबा नव्हता असे नव्हे. खुद्द आगरकरांचा अभिप्राय असा आहे की, शास्त्रीबुवांची मते प्रागतिक होती. य. दि. फडकेंच्या मते शास्त्रीबुवा कर्मठ अथवा सनातनी नव्हते. त्यांचे चरित्रकार ग. त्र्यं. माडखोलकर आपल्याला सांगतात की, ते विलक्षण आधुनिक होते. देशाभिमानामुळे त्यास मुरड पडली होती तेवढीच शास्त्रीबुवांनी स्वतःबद्दल पुढील उदगार काढलेले आहेत. "... कित्येक समंजस मंडळींचे कदाचित असे अनुमान होईल की वरील बालविवाहादी प्रकार आम्हाला सर्वथा मान्य होत व आजपर्यंत जे चालत आले आहे ते सर्व जसेच्या तसे चालू ठेवण्याविषयी आमचा आग्रह आहे. वस्तुतः पाहता वरील मते काढण्यास बिलकुल आधार नाही. " असे होते तर सुधारकांत व त्यांच्यात कोणता महत्वाचा फरक होता ? विष्णूशास्त्रींच्या मते आपल्याकडील चालीरीतींमुळे आपली सत्ता गेली हे खरे नाही. लोकहितवादी प्रभुतींचे असे प्रतिपादन होते की, रुढीग्रस्ततेमुळे, सामाजिक मागासलेपणामुळे आपला पराभव झाला. ही कारणमीमांसा विष्णूशास्त्रींना मान्य नव्हती. इंग्लड हा आपल्यापेक्षा प्रगत देश आहे हे ते स्वतःच ठिकठिकाणी सांगतात तसेच आपल्या समाजातील दोषांवर बोट ठेवतात पण या दोहोंचा कार्यकारणभाव त्यांना अमान्य होता. त्यांच्या मते कालमहिमा, कालगती, योगायोग ह्या कारणांमुळे आपण आज उतरणीला लागलो आहोत. ग्रीक व रोमन संस्कृतीचा ऱ्हास जसा झाला तसाच आपलाही झाला अन्यथा आपल्या देशास काहीही झालेले नाही. पूर्वी आपल्या लोकांनी जेव्हा मर्दुमकी गाजवली तेव्हा ते कसे आड आले नाहीत ? असे विचारून विष्णुशास्त्री त्यांच्या वाचकांचा एका अर्थाने आत्मविश्वास वाढवितात. पण सामाजिक सुधारणा करण्याबाबत निश्चित व सकारात्मक भूमिका घेणे टाळतात. सामाजिक सुधारणा जरूर आहेत का ? या प्रश्नाचे उत्तर विष्णूशास्त्रींनी होकारार्थी दिले असते. कारण यापूर्वी नोंद केल्याप्रमाणे सामाजिक स्थित्यंतराच्या सिद्धांतावर विश्वास होता व वैज्ञानिक प्रगती झालेला हा प्रगत व काव्य, कल्पना, त्यांना मान्य होती. यामुळे एकुणात सुधारणा होण्यास त्यांचा पाठिंबाच होता, असे म्हणता येते. त्यासाठी कायदे करावेत का? व परकीय सत्तेने करावेत का याला त्यांनी नकारार्थी उत्तर दिले असते. 

 

धर्मसुधारणेस विरोध

विष्णूशास्त्रींच्या सामाजिक सुधारणेबाबतच्या भूमिकेत असा पेच दिसतो पण धार्मिक सुधारणेबाबत मात्र तो अजिबात दिसत नाही. ते स्पष्टपणे त्यास विरोध करतात. मिशनरींची हिंदुधर्मावरील टीका, फुल्यांचा हल्ला व प्रार्थनासमाज, आर्यसमाज यांचे धर्मसुधारणेचे प्रयत्न या सर्वांचा प्रतिवाद करण्यात त्यांनी मालेची बरीच पाने खर्ची घातली आहेत.

धर्मसुधारणेबाबतच्या शास्त्रीबुवांच्या दृष्टिकोनावर त्यांच्या हिंदूधर्माभिमानाची सावली पडली होती. हिंदुधर्म सर्वात प्राचीन असून शंकराचार्यांसारख्यांनी ज्याच्या रक्षणार्थ आपली बुद्धी खर्चली आहे तो मेकॉले, मिशनरी किंवा फुले यांच्या " बडबडीने व शुष्क तर्कांनी ऱ्हास पावेल हे मुळीच संभवत नाही" असे त्यांना वाटत होते. शास्तीबुवांचे इतिहासाचे आकलनही धर्माभिमानावर बेतलेले होते. मराठ्यांची सत्ता प्रस्थापित झाल्यामुळे हिंदुधर्मावरील संकट टळले . "मुसलमानी धर्माने येथील धर्माचा समूळ उच्छेद करण्याकरिता कंबर बांधली होती तोच पुढे पुढे त्याशी मित्रत्वाने राहण्यास ख़ुशी झाला... परधर्माचा पाय मागे हटून हिंदुधर्माचे पुनः सर्वत्र संजीवन झाले. विष्णूशास्त्रींच्या काळात ख्रिश्चन धर्माचे संकट उद्भवले होते. त्याच्या प्रभावाखाली आणि मिशनऱ्यांच्या प्रचारामुळे येथील काही लोक हिंदू धर्मापासून दूर जाऊ लागले होते. काहींनी त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न सुरू केला होता. या दोन्ही प्रकारच्या लोकांवर विष्णुशास्त्रींचा मनस्वी राग होता. विशेषतः प्रार्थनासमाज, आर्यसमाज व सत्यशोधक समाज या समाजावर त्यांनी जळजळीत टीका केली आहे. म. फुले व त्यांचा सत्यशोधक समाज यावर त्यांचा जास्त राग होता. कारण फुले फक्त हिंदू धर्मावर टीकाच करीत होते असे नव्हे तर ब्राह्मणांवर आपमतलबीपणाचा व कावेबाजपणा चा आरोप करीत होते यासंदर्भातील त्यांची टीका आपण स्वतंत्रपणे पुढे नोंदवणार आहोत. दयानंदांचा आर्य समाज किंवा न्यायमूर्ती रानडे यांचा प्रार्थना समाज हा विष्णुशास्त्री यांच्या टीकेचे लक्ष्य ठरला कारण हे समाज हिंदू धर्मातील दोष दाखवत होते व विशेषता त्यातील मूर्तीपूजा वर हल्ला करीत होते आणि ख्रिश्चन धर्मातील काही गोष्टींचे अनुकरण करीत होते. ' अनुकरण' या त्यांच्या निबंधात त्यांनी प्रार्थना समाज वाले ख्रिश्चनांच्या प्रार्थनेचे, चर्चमधील सामूहिक गायनाचे, स्त्रियांना नटून थटून तेथे नेण्याचे अनुकरण कसे करीत होते याची चेष्टा केली आहे. ख्रिश्चनांची नक्कल करणाऱ्या मंडळीत मार्टिन ल्यूथरचा आवाका नाही हेही त्यांनी दाखवून दिले होते. तसेच ज्या ख्रिश्चनांचे अनुकरण ते करीत होते त्यांच्या धर्मातही अनेक वेडगणपणाच्या कल्पना व गोष्टी होत्या व त्या हिंदूंपेक्षा फार वेगळ्या नव्हत्या, हे त्यांनी सोदाहरण दाखवून दिले होते.

परंतु यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा विष्णुशास्त्री मांडतात तो' मोरोपंतांची कविता' या निबंधात. न्या. रानडे आपला कोणता तात्विक मतभेद आहे याचे सविस्तर विवेचन त्यांनी या निबंधात केलेले आहे. न्यायमूर्तींच्या मते मोरोपंतांने परमात्म्याशी हवी तशी सलगी व हास्यविनोद केला आहे त्यामुळे हे काव्य सुधारलेल्या समाजातील लोकांस पसंत होण्यासारखे नाही. याला विष्णुशास्त्रींनी उत्तर देताना म्हटले आहे की, की पेशवाईच्या काळात लिहिलेले हे काव्य व त्यातील विचार न्यायमूर्ती किंवा त्यांच्या सुधारलेल्या समाजास आवडले नाही तर त्याला उपाय नाही. तसेच, मोरोपंतांचा परमेश्वर ' साकार, मनुष्यदेहधारी ' राम किंवा कृष्ण आहे तर न्यायमूर्ती यांचा परमेश्वर म्हणजे निर्गुण निराकार, " डोळे मिटले म्हणजे दिसायचा व वीणा रवाने जागृत व्हावयाचा " अशा प्रकारचा आहे. मूर्तिपूजकांचा काव्यातील रसानुभव

मूर्तिपूजकांस घेता येणार नाही. जोपर्यंत सामान्यजनांच्या रूदयात या काव्याला स्थान आहे तोपर्यंत " कितीही रेव्हरेंडसाहेबांचे, मुल्लासाहेबांचे किंवा रावबहादुरांचे (न्या. रानडे) अभिप्राय त्यास प्रतिकूल पडले तरी" हरकत नाही. 
न्यायमूर्ती द्वैमताचे मताचे होते तर मोरोपंत हे अद्वैत मताचे. त्यामुळे त्या दोघांच्या भूमिकेत अंतर पडले. पण याचा अर्थ अद्वैतवाले भक्तीस महत्त्व देत नाहीत असा नव्हे असे विष्णुशास्त्री सांगतात. " कोणतेही मत घेतले तरी देव व मनुष्य यांचा पूज्य-पूजक भाव सुटत नाही. द्वैतवाद्याच्या मते वरील भाव सिद्धच आहे. अद्वैतवाद्याच्या मते तरी द्वैत घालवण्याचा उपाय ईश्वरभजनच होय." अद्वैतवादी आपणच सर्व सृष्टी निर्माण केली असे म्हणत नाही. अद्वैतमताचे धुरीण शंकराचार्य यांनी ईश्वरोपासनेनिर्मित अनेक स्तोत्रे करून ठेवली आहेत. विष्णुशास्त्री हे दाखवून देतात की, महाराष्ट्रातील कवींनी अद्वैत मानले तरी भक्तीचा निषेध कोठेही केलेला नाही. उलट खरी भक्ती विद्वानात आढळणाऱ्या ऐवजी " तुकोबा, ग्यानोबा यांच्या कंपूतच " आढळेल असे ते स्पष्ट करतात.

विष्णुशास्त्रींच्या टीकेकडे काळजीपूर्वक पाहिले तर दिसते की त्यांना प्रार्थनासमाजवाले, धर्मसुधारणेचा पुरस्कार करून खरेतर हिंदू धर्माच्या किल्ल्यानेच रक्षण करीत होते हे लक्षात आले नाही. आपल्या धर्मातील अनिष्ट गोष्टींना रजा दिली किंवा धर्म उच्चतर पातळीवर नेला तर परधर्माचे आकर्षण राहणार नाही, अशीही भूमिका प्रार्थनासमाजाची त्यामागे असावी. मुस्लिम धर्माच्या आगमनानंतर जशी हिंदू-मुस्लिम यांच्यात देवघेव झाली तशीच देवघेव विष्णुशास्त्रींच्या काळात चालू होती. त्याचा खरा अंदाज त्यांना आला नाही असे वाटते. रानडे यांना द्वैतवादी मानण्याऐवजी विशिष्ट अद्वैतवादी मानले तर त्यांची भूमिका जास्त स्पष्ट होते, हे येथे नोंदले पाहिजे. हिंदूधर्माचे समर्थन करून व त्याचा अभिमान बाळगून ख्रिश्चन धर्माच्या आक्रमणाला प्रतिसाद द्यायचा असे शास्त्रीबुवांनी पक्के ठरविलेले होते. त्यामुळे रानडे यांचा धर्मविचार त्यांना रुचला नाही. तो ख्रिश्चन धर्माचे अनुकरण वाटला. प्रत्यक्षात रानड्यांनी प्रार्थनासमाज हा भक्तिमार्गाचेच नवे रूप कसे आहे व आपला समाज भारतीय परंपरेचे सातत्य कसे राहतो हे व्यवस्थितपणे स्पष्ट केले होते.
म. फुल्यांवर शास्त्रीबुवांचा सर्वात जास्त रोष होता कारण त्यांच्या मते फुले मिशनऱ्यांच्या कच्छपी लागले होते. ते ' ज्ञानोदय ' या मिशनऱ्यांच्या मुखपत्राच्या कंपूतील होते. जणू काही फुल्यांनी ख्रिश्चन धर्माचा अंगीकार केला होता, अशाच कल्पनेने विष्णुशास्त्री त्यांच्यावर तुटून पडतात. अर्थात आगरकरही फुले यांचा उल्लेख रेव्हंड म्हणून करतात. विष्णुशास्त्रीसारख्यांना हे ठाऊक नव्हते की, फुल्यांना ख्रिश्चन धर्मातील दोष व वेडगळपणाचा गोष्टींची जाणीव होती व ते सार्वजनिक सत्यधर्म या उच्चतम धर्माचा आराखडा तयार करीत होते. न्या. रानडे व त्यांचे सहकारी ही ख्रिश्चन धर्मातील दोष जाणून घेत होते व त्यांची नोंद करीत असत. ख्रिश्चन धर्मात त्या काळात जे नवीन प्रवाह येत होते त्याची कल्पना रानड्यांना होती. ख्रिश्चनांमधील सुधारक पंथीयांचाच प्रभाव फुल्यांवर होता. तसेच थॉमस पेनचा होता. विष्णुशास्त्रींनी किंवा नंतर आगरकरांनी हे सर्व जाणून घेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत नाही.

दयानंद सरस्वतींच्या पुण्यातील व्याख्यानांचा व नंतर झालेल्या मिरवणुकीच्या निमित्ताने विष्णुशास्त्रींनी त्यांचा समाचार घेतला आहे. स्वामीजींनी हिंदूधर्मातीत मूर्तिपूजा, पुराणे, ब्राह्मणांचे वर्चस्व अनेक देवदेवता व अनिष्ठ रूढी यावर टीका केली होती. पुण्यातील सनातनी मंडळींनी स्वामीजींना गर्भआनंद अशी उपमा देऊन एका गाढवाची मिरवणूक काढली होती. या मंडळींच्या मनातील विचार विष्णुशास्त्रींच्या निबंधात उतरले आहेत. दयानंद काय करू पाहत होते याकडे नीट लक्ष शास्त्रीबुवांनी दिले नव्हते असे दिसते. अन्यथा " आधुनिक हिंदुत्वाच्या सामर्थ्यशाली नेतृत्व " करणाऱ्या आर्यसमाजावर विष्णुशास्त्री एवढे तुटून पडले नसते. ख्रिश्चन व मुसलमान या धर्मांवर आर्य समाजाचा कटाक्ष होता. वैदिक धर्माची पुनर्स्थापना करण्याची कल्पना मांडणाऱ्या व कर्माधिष्टीत वर्णव्यवस्थेचा पुरस्कार करणाऱ्या तसेच हिंदुत्वाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या आर्यसमाजाचे व विष्णूशास्त्रींचे बऱ्याच बाबतीत जुळले असते. पण तत्कालीन संदर्भाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न शास्त्रीबुवांनी केला नाही. शिवाय ब्राह्मणांवर टीका करणाऱ्या कोणाचीही ही गय ते करीत नव्हते. याची सविस्तर चर्चा पुढे येणारच आहे.

विष्णुशास्त्रीचें स्वधर्माबाबतचे प्रेम स्वदेशाभिमानातून येते. ते स्वतः फार धार्मिक होते असे नव्हे. राष्ट्रभक्तीचा एक भाग म्हणून स्वधर्माचे प्रेम त्यांना वाटते. त्यांच्या कुटुंबात त्यांना धार्मिक वळण लागले नव्हते. त्यांनी धर्माचा फार अभ्यास वगैरे केला होता असे नव्हे. ज्या भक्तीची किंवा मोरोपंतांची प्रशंसा ते करीतहोते, तशी भक्ती किंवा धार्मिकता त्यांच्या हृदयता नव्हती, व लेखनातही नव्हती, असे पांगारकर निबंधमालेवरील आपल्या पुस्तकात म्हणतात, त्याची नोंद विष्णुशास्त्रींच्या धर्माबाबतच्या भूमिकेच्या संदर्भात करणे जरूर आहे. विष्णुशास्त्रीचें स्वधर्माबाबतचे प्रेम स्वदेशाभिमानातून येते. ते स्वतः फार धार्मिक होते असे नव्हे. राष्ट्रभक्तीचा एक भाग म्हणून स्वधर्माचे प्रेम त्यांना वाटे. त्यांच्या कुटुंबात त्यांना धार्मिक वळण लागले नव्हते. त्यांनी धर्माचा फार अभ्यास वगैरे केला होता असेही नव्हे. ज्या भक्तीची किंवा मोरोपंतांची प्रशंसा ते करीत होते, तशी भक्ती किंवा धार्मिकता त्यांच्या हृदयता नव्हती, व लेखनातही नव्हती, असे पांगारकर निबंधमालेवरील आपल्या पुस्तकात म्हणतात, त्याची नोंद विष्णुशास्त्रींच्या धर्माबाबतच्या भूमिकेच्या संदर्भात करणे जरूर आहे.

 

आर्यांचे श्रेष्ठत्व

एकोणिसाव्या शतकातील प्रबोधन व राष्ट्रवादाच्या चळवळीचे एक महत्त्वाचे अंग होते आर्य वंशाचा सिद्धांत. विल्यम जोन्स याने अठराव्या शतकाच्या शेवटी इंडो-युरोपियन संस्कृतीचा सिद्धांत मांडला. संस्कृत, पर्शियन, ग्रीक व लॅटिन या भाषांतील समान धागा त्याने दाखवून दिला व प्राचीन भारतीय संस्कृती प्राचीन इंडो-युरोपियन संस्कृतीतून कशी उत्पन्न झाली आहे याचे प्रमेय मांडले. पुढे हा धागा पकडून जर्मन भाषाशास्त्रज्ञांनी भारत, पर्शिया व युरोपातील इंडो- युरोपियन भाषा बोलणारे लोक एकाच संस्कृतीचे वंशाचे होते, पूर्वी ते एकाच भौगोलिक प्रदेशात राहत होते. ऋग्वेदात त्यांना आर्य असा शब्द वापरला आहे. जर्मनीत जन्मलेल्या फ्रेडरिक मॅक्स म्युलर (१८२३-१९००) या ऑक्‍सफर्ड विद्यापीठातील भाषाशास्त्रज्ञाने या सिद्धांताचा आधार घेऊन प्राचीन भारतीय संस्कृत साहित्य व तत्त्वज्ञानाची प्रशंसा केली. ग्रीक, इंग्लिश व भारतीय लोकांचे मूळ एकच आहे, ते एकाच वंशाचे आहेत हे त्याने जोर देऊन मांडले. या त्याच्या सिद्धांताचा उच्चवर्णीय हिंदू सुशिक्षितांवर अपेक्षित परिणाम झाला. इंग्रज व भारतीय एकमेकांचे चुलतभाऊच आहेत असा अर्थ त्यातून निघू लागला. इंग्रजी साम्राज्यामुळे हे एकमेकांपासून प्राचीन काळी दूर गेलेले भाऊ एकत्र आले असे केशवचंद्र सेन वगैरे ब्राह्मोसमाजाचे नेते म्हणू लागले. आर्य समाजाचे संस्थापक दयानंद सरस्वतींवर या सिद्धांताचा मोठा पगडा होता. महाराष्ट्रातही आर्यवंशाचा सिद्धांत सुशिक्षितांनी ताबडतोब स्वीकारला. चिपळूणकर त्यामध्ये आघाडीवर होते. राज्यकर्त्यांचा व आपला वंश आहे हे लक्षात आल्याने त्यांच्या वसाहतवादविरोधाला आधार मिळाला.

मॅक्सम्युलरने केलेली वेदांची भाषांतरे व त्याचे इतर लेख चिपळूणकरांनी वाचले होते. ' श्वेतद्वीपीय महावैदिक ' या नावाने त्याचा उल्लेख ते करीत असत. त्याचे ' Lectures on the Science of Language ' हे पुस्तक त्यांनी वाचलेले होते. आपल्या ' इंग्रजी भाषा ' या निबंधात चिपळूणकरांनी इंडो-युरोपिय भाषासमूहाबाबतचा सिद्धांत स्पष्ट केला आहे. जगातील भाषांचे कसे दोन समूह किंवा शाखा आहेत; त्यांतील आर्यशाखेतून संस्कृत, इराणी, ग्रीक, इटालियन व व जर्मन या भाषांची उत्पत्ती झाली आहे. इंग्लिश भाषेचे मूळ याच शाखेत आहे. भाषाशास्त्र एकोणिसाव्या शतकात विकसित पावले याचे कारण संस्कृत भाषेचा शोध होय असे सांगून चिपळूणकर म्हणतात की, युरोपातील बहुतेक देशांतील लोक तसेच तिकडचे हिंदू, इराणी वगैरे लोक पूर्वी एकाच ठिकाणी राहत होते व एकच भाषा बोलत होते. पुढे त्यांचे फाटाफूट झाली. इराणचे मूळ रहिवासी पारशी लोक हे प्राचीन आर्यशाखेचे होत. भाषासाम्यावरून  व आजाराच्या सादृश्यवरून प्राचीन हिंदू व प्राचीन पारशी यांचा फार निकट संबंध असावा असे दिसते. आपल्या राष्ट्राची उत्पत्ती मनुष्यजातीच्या सर्व शाखांत मुख्य म्हणून गणली जाते त्या आर्यशाखेपासून झाली. किंबहुना आर्यशाखेची मुख्य उपशाखा हिंदुस्थानातीलच असावी असाही संभव आहे. या आर्य लोकांचे मूळ ठिकाण यूरोप व आशिया यांच्या मध्यंतरी कोठेतरी असावे. तेथून वेगवेगळ्या दिशेने टोळ्या गेल्या व त्यांच्या वसाहती झाल्या. यापैकी एक टोळी पूर्वेकडे इराण देशात स्थायिक झाली व दुसरी पंचनद देशात (पंजाब) जाऊन स्थायिक झाली. ही प्राचीन हिंदु लोकांची मूळ जागा होय. तेथून ते क्रमाक्रमाने सर्व देशभर पसरले. म्हणजे भरतखण्ड हिंदूंचे नव्हे, ' कॉकेशस ' पर्वताच्या आसपास जी ' आर्यराष्ट्रे ' राहत असत त्यांतील काही पूर्वेकडे व काही पश्चिमेकडे गेली. त्यांपैकी प्राच्य आर्य म्हणजे हिंदू व पारशी. पारश्यानी इराणची वाट धरली तर हिंदूंनी पंचनद(पंजाब) देशातून हिंदुस्तानची वाट धरली. अशाप्रकारे आर्य-वंशाबाबतचा युरोपातील अभ्यासकांनी मांडलेला सिद्धांत चिपळूणकरांनी स्वीकारला होता. तो भाषाशास्त्राच्या मार्गे आल्यामुळे आणि आणि संस्कृत भाषेस व वेदास या सिद्धांतात सर्वात प्राचीन मानले गेले असल्यामुळे तो त्यांना आकर्षकही वाटत होता. युरोपातील संस्कृतचा अभ्यास करणाऱ्यांबद्दल त्यांना मनापासून आदर होता. शिवाय या सिद्धतांतून प्राचीन सुवर्णयुगाची कल्पना मान्य पावत होती. या भारतभूमीवर प्राचीन काळात सुवर्ण युग अवतरले होते ते पुढे परकियांच्या आक्रमणामुळे डागाळले व येथे अवनतीस प्रारंभ झाला, अशी ती कल्पना होती. युरोपातील संस्कृतच्या अभ्यासकांनी ही कल्पना उचलून धरली असल्याने चिपळूणकरांच्या पूर्वगौरववादास आयताच आधार मिळाला होता. त्यांचा आत्मविश्वास दृढ झाला होता.

महात्मा फुले ( १८२७ - १८९०) यांनीही आर्य वंशाचा सिद्धांत स्वीकारला होता; मात्र त्यांनी तो उलटा करून टाकला होता. आर्यांच्या प्रभुत्वाकडे ते कनिष्ठ जातींच्या स्थानावरुन पाहत होते. आर्य बाहेरून आले, ते परकीय आहेत. हा देश येथील मूळ रहिवासी शूद्र व अतिशूद्रांचा होय, त्यांच्या बळीसारख्या राजांचा पराभव करून आर्यांनी म्हणजे आजच्या ब्राह्मण मंडळींनी स्वतःचे वर्चस्व येथे प्रस्थापित केले. वर्णव्यवस्था व जातिसंस्था विशेषतः त्यातील उच्चनीचता ही ब्राह्मणांच्या कटकारस्थानाचा भाग आहे. स्वतःचे वर्चस्व लादण्याच्या कटाचे हे एक महत्त्वाचे साधन आहे. आर्यांचे वाङ्मय ज्यात वेद-स्मृतिपासून पुढील सर्व पुराणांचा समावेश होतो हे एक थोतांड आहे. त्यातील कथा म्हणजे आर्यांच्या वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या कहाण्या आहेत. फुलांवर क्रिश्चन मिशनरी यांचा प्रभाव पडलेला होता. आर्यांच्या संदर्भातील लेखनावर जॉन विल्सन याच्या ' इंडिया थाउजंड इयर्स अगो ' (१८५८) या ग्रंथाचा परिणाम झाला होता. संस्कृततज्ञांनी व प्राच्यविद्या अभ्यासकांनी भाषाशास्त्राच्या आधारे मांडलेला सिद्धांत विल्सनसारख्या मिशनऱ्यांनी हिंदूधर्म व समाजव्यवस्थेवर हल्ला करण्यासाठी वापरला होता. फुल्यांनी मिशनऱ्यांच्या या टीकेचा स्वतःच्या सैद्धांतिक मांडणीसाठी उपयोग करून घेतला होता.

 

ब्राह्मणाचे समर्थन

महात्मा फुले यांचा सत्यशोधक समाज (१८७३) त्या समाजाचे उद्देश व काम, फुले यांचे ब्राह्मणांचे कसब (१८६९ ), गुलामगिरी ( १८७३) असे ग्रंथ, त्यांना मिळणारा पाठिंबा आणि आणि त्यांनी केलेला ब्राह्मणांवरील हल्ला यास चिपळूणकरांनी ब्राम्हणांचे प्रतिनिधी म्हणून प्रतिसाद दिला. फुलांचा हल्ला परतवून लावण्याचा प्रयत्न केला. निबंधमालेकडे सत्यशोधक समाजाचा अहवाल आला होता. ती संधी घेऊन माळ्याच्या ४४ व्या अंकात मराठी पुस्तके या सदरात चिपळूणकरांनी अत्यंत सविस्तरपणे व उपहास पूर्ण भाषेत फुल्यांच्या भूमिकेचा समाचार घेतला आहे. गुलामगिरी या त्यांच्या ग्रंथात फुल्यांनी आर्य (ब्राह्मण) या देशात किरण होऊन कसे आले, शूद्रांच्या बळी नावाच्या राजाच्या माथी वामनाने कसा पाय दिला व हे आर्य कसे स्थिर झाले, असा आर्यांच्या वर्चस्वाचा इतिहास संभाषण रूपात सांगितला आहे. याचा प्रतिवाद करण्याऐवजी चिपळूणकरांनी रेवडी उडवली आहे. त्यांचा उपहास केला आहे. त्यातील व्याकरणाच्या चुकांची चेष्टा केली आहे. व त्यानंतर भट-भिक्षुकांवर फुल्यानी जी टीका केली होती त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये ब्राह्मणांची तरफदारी करणे हा प्रमुख हेतू दिसतो. शूद्र व अतिशूद्रांच्या घरी धार्मिक विधी करण्यास यास भट जातात, त्यात चिपळूणकरांना आश्चर्य वाटते. सुधारलेल्या देशातही हे 'दास्य' जर त्याला दास्य म्हणायचे असेल तर सापडते. ब्राह्मणांचा जुलमाचा फुल्यांनी बाऊ करून ठेवला आहे असे चिपळूणकरांना वाटत होते. ब्राह्मणांच्या 'बनावट' ग्रंथांच्या प्रभावातून शूद्रांना मुक्त करण्याचे बौद्धिक सामर्थ्य अद्यापि ब्राह्मण पुस्तकसूत्रांमध्ये आलेले नाही असे त्यांचे पक्के मत होते. शुद्रांतील थोडेच शिकले आहेत, शूद्र धर्मशास्त्राचे  नाव अद्यापि ऐकलेले नाही. बनावट ग्रंथांचा शेंडा का बुडखा माहित नाही असा शूद्र मनूसंहितेचा प्रतिवाद कसा करू शकेल असा प्रश्न चिपळूणकर विचारतात. ब्राह्मणांविरुद्ध फुले व त्यांच्या अनुयायांना मिशनऱ्यांनी ठरविले आहे. खरेतर नीच जातीत जन्मलेल्या साधुसंतांचा महिमा ब्राह्मणांनी नेहमीच गायलेला आहे. " ज्योतिबासारख्या पठ्ठयानी निर्धास्तपणे ब्राह्मणांवर भोकले असता त्यात त्यांची कितपत बहादुरी आहे व वेळेनुसार तोंडावर तुकडा टाकणाऱ्या धन्यांच्या पुढे लाळ घोळण्यात कितपत राजनिष्ठा व सत्यनिष्ठा आहे" हे चिपळूणकरांना समजत नव्हते. शिवाय एकमेकांना शिव्या देण्याकरता सत्यशोधक समाज स्थापण्यातील शहाणपणही त्यांना कळत नव्हते. गुलामगिरी, ब्राह्मणांचे कसब तसेच सत्यशोधक समाजावर टीका करून पुढे चिपळूणकरांनी समाजाच्या अहवालात नोंदलेल्या समाजाच्या कार्याची थट्टा केली आहे. शेवटी चिपळूणकर असा दावा करतात की त्यांनी 'नि:पक्षपातीपणे' आपले मतप्रदर्शन केले आहे. मालेच्या ४८ व्या अंकात म्हणजेच चौथ्या वर्षाच्या शेवटच्या अंकात चिपळूणकरांनी त्यांच्यावरील आक्षेपांना उत्तरे दिली आहेत. त्यात महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाज पुन्हा येतो. 'दीनबंधू' या समाजाच्या मुखपत्रात निबंधमालेवर टीका प्रसिद्ध झाली होती त्याचे उत्तर या अंकात चिपळूणकर देतात. 'दीनबंधू' सारख्या नियतकालिकात आलेल्या आक्षेपांवर उत्तर देणे म्हणजे "अक्षरजननिस व्यर्थ शिणवणे होय" असे चिपळूणकरांना वाटत होते पण ' शूद्रबंधूच्या भ्रमनिरासनार्थ ' ते करणे आवश्यक मानीत होते. ' बिचारे शुद्रबंधू  'अद्यापि केवळ ' अज्ञानी व भोळे' असल्यामुळे त्यांच्या मनात हव्या त्या 'मूर्ख कल्पना भरून देता येतात' असे होऊ नये व त्यांच्या उत्कर्षाचा खरा मार्ग त्यांच्या ध्यानात यावा म्हणून ते उत्तर देत होते. 

दीनबंधूंचा एक आक्षेप असा होता की, मालकारांनी श्रुतीस्मृतीतल्या प्रमाणांनी फुल्यांचे खंडन करायला पाहिजे होते. दयानंद सरस्वतींवर चिपळूणकरांनी कडक भाषेत टीका केली होती तेव्हाही असाच आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. चिपळूणकर यांचे म्हणणे त्यावर असे की " द्विजत्वास्तव व विद्वान लोकांच्या परिचयास्तव त्याजपाशी काही फटकळ ऋचा व शास्त्रवचने यांचा संग्रह झालेला आहे व त्यांचा अर्थही समजण्याची त्यास शक्ती आहे ... पण आमच्या शूद्र धर्मस्थापकाची तर कशी मौज आहे त्यास पुरते व्याकरणाचे व शुद्ध लिहिण्याचे ज्ञान नाही... अशा स्थितीत आम्ही शुद्ध बंधूस अशी सूचना करतो कि, श्रुतीस्मृतींचा ऊहापोह करण्याची हौस त्यांनी तूर्त एकीकडे ठेवावी आणि आधी व्याकरण व शुद्धलेखन शिकावे. गीर्वाण भाषेचा किंवा मनु-वशिष्ठ यांचा अभ्यास नंतर करावा. अशा रीतीने चिपळूणकरांनी दीनबंधूकारांचा मुद्दा उडवून लावला आहे व हे करताना मुलांना त्यांच्या जातीची आठवण करून दिली आहे.

ब्राह्मणांनी शूद्रांना डोके वर काढू दिले नाही व शुद्रांमध्ये सुधारणा झालेली ब्राह्मण सहन करू शकत नाहीत असा एक आरोप दीनबंधूंनी केला होता. त्यावर चिपळूणकर उत्तर देतात कि त्रेतायुगातल्या गोष्टी काढून विनाकारण बखेडा माजू नये. ब्राह्मणांना दुष्ट व लबाड फुल्यांनी म्हटले आहे पण जर ज्यांनी अमेरिका व आफ्रिकेतल्या या मूळ रहिवाशांची स्थिती पहावी म्हणजे ब्राह्मण हे भुदेव आहेत अशी त्यांची खात्री पटेल. चिपळूणकर वरील उत्तर देताना, त्यांच्या स्वतःच्या उपजातीची तरफदारी करताना कनिष्ठ जातीमधील सुधारकांना क: पदार्थ मानताना दिसतात. ते म्हणतात की, चित्पावनांनी गेल्या शतकात दिग्विजय केला. पेशव्यांनी उत्तरेत ज्या यशस्वी स्वार्‍या केल्या त्यांचा उल्लेख चिपळूणकर करतात. अद्यापही चित्पावनांचे "बुद्धिवैभव" जसेचे तसेच जागृत आहे. या गोष्टी ज्यांना " सहन होत नसतील त्यांनी पाहिजे तर दिवाभीतांप्रमाणे गिरिकंदरात आपले तोंड लपून राहावे. वरील पक्षाच्या पंखांनी दिनमणी जसा झाकला जाणार नाही त्याचप्रमाणे ज्योतीप्रभृतींनी कितीही कोल्हेकुई केली तरी ती सर्व व्यर्थच होय. मोहोरीचा दाणा या पारड्यात किंवा त्या पारड्यात तरी त्याच्या वजनाने काटा केसभरही ढळत नाही त्याप्रमाणे  फुल्यांची स्तुती किंवा निंदा आहे. म्हणजेच चिपळूणकर त्यास किंमत देत नव्हते. फुलेंना ते कस्पटासमान मानीत होते व त्यांच्या टीकेला किंमत देत नव्हते तर मग त्यांच्यावर मालेतील इतकी पाने खर्च का करीत होते हे कळत नाही.
लेखाच्या शेवटी चिपळूणकर फुल्यांना सल्ला देतात की, ब्राह्मण कितीही लबाड वा दुष्ट असले तरी एक गोष्ट निर्विवाद आहे की ज्ञानभांडाराच्या किल्ल्या त्यांच्या कंबरेला आहेत. त्यांच्या मदतीशिवाय इतर जातींना ज्ञानाचा लाभ होणार नाही म्ह्णून त्यांच्याशी शुद्रांनी सलोख्याने वागावे यातच शहाणपणा आहे. इंग्रजी विद्येच्या प्रसारामुळे पूर्वीचे समाज बदलत आहेत. शूद्रांविषयी पूर्वीचे ग्रह राहिलेले नाहीत. परिस्थिती बदलते आहेत त्यामुळे आक्रोश करू नये. समंजसपणाचा, स्वतःच्या जातीच्या सुधारण्याचा मार्ग अनुसरावा त्यामुळे त्यांच्या जातीचे व देशाचे कल्याण होईल. गुलामगिरी वाचून ब्राह्मणा विषयी जर गैरसमज झाले असतील तर ते सोडून द्यावेत. सर्वच ब्राह्मण सज्जन आहेत किंवा शूद्रांचे आक्रोश सर्वच व्यर्थ आहेत असे नव्हे. ब्राह्मणांचे खरे दोष त्यांना मान्य होते. जातीभेदाने शूद्रांना दुःख सहन करावी लागत असतील तर ती हलकी करणे त्यांना मान्य होते. 'आपसाआपसात वितुष्ट' वाढू देऊ नये. इंग्रजी राज्यामुळे विद्या सर्वांस मिळून सर्वांचेच कल्याण होईल यात शंका नव्हती. यावरून असे दिसते की, दिन बंधूंची टीका उलटून लावताना चिपळूणकर आक्रमक होतात व त्यातल्या त्यात चित्पावनांचा प्रश्न आल्यावर त्यांना फारच राग येतो व ते टोकाला जाऊन ची तरफदारी करतात व शूद्रांना अजिबात किंमत देत नाहीत. परंतु पुढे थोडी सबुरीची भाषा बोलतात. सावरुन घेऊन जबाबदारीचे उद्गार काढतात. आर्यवंशाचा सिद्धांत अशा तऱ्हेने त्यांच्या जातीवरच उलटेल असे बहुधा त्यांना वाटले नसावे. फुल्यांनी तसे केल्याने व त्यांच्या मागे मिशनरी आहेत असे वाटल्याने चिपळूणकरांना भयंकर संताप आला व तो जळजळीत शब्दांत बाहेर पडला. पौर्वात्यवादातील एकच सिद्धांत म्हणून आर्यवंशाच्या सिद्धांताकडे पाहिले तर असे दिसते की, या सिद्धांताचा प्रभाव सामाजिक स्थानावर अवलंबून होता. चिपळूणकर यांनी ब्राह्मणांच्या तर फुल्यांनी शूद्र व अतिशूद्रांच्या दृष्टिकोनातून तो समजावून घेतला.

 

लोकहितवादींवर हल्ला

ब्राह्मणाचे समर्थन करण्याची वेळ चिपळूणकरांवर लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख (१८२३-१८९२) यांच्या निबंधसंग्रहाचे परीक्षण करताना पुन्हा एकदा आली. तशी वेळ आली म्हणण्यापेक्षा ही जबाबदारी चिपळूणकरांनी स्वतःहूनच आपल्या शिरावर घेतली असे म्हणावे लागेल. लोकहितवादींनी १८४८ साली 'प्रभाकर' या साप्ताहिकात शंभरावर पत्रे लिहिली त्याचाच पुढे 'निबंधसंग्रह' प्रसिद्ध झाला. शिवाय इतरही त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध झाले. ते अभिप्रायासाठी मालाकारांकडे आले होते. त्यावर मालाकारांनी थोडेथोडके नव्हे तर बारा अंक खर्ची घालून अभिप्राय दिला त्याला एक वर्षाहून अधिक काळ लागला. लोकहितवादींनी त्यास उत्तर दिले नाही. लोकहितवादींवरील चिपळूणकरांच्या टीकेने निबंधमालेच्या दुसऱ्या खंडातील जवळ जवळ १५० पाने भरली आहेत. बरे ही टीका येते तेव्हा शतपत्रे प्रसिद्ध झाल्यानंतर तीस-चाळीस वर्षांनी. म्हणजेच काळ बदलला होता. लोकहितवादींची मतेही नंतर सवय झाली होती. अगदी ऐन तारुण्यात त्यांनी ती पत्रे लिहिली होती त्यामुळे त्यांच्या भाषेला धार आहे व तिखटपणा आहे. ब्राह्मण, त्यांची विद्या, त्यांचा धर्म त्यांचे आचार यावर सडकून टीका लोकहितवादींनी केली होती. स्वतः ब्राह्मण असून त्यांनी समाजाच्या अवनतीस ब्राह्मणांना जबाबदार धरले होते. हा सर्व प्रकार चिपळूणकरांच्या सहनशक्तीपलिकडे गेला असावा. फुलांच्या संदर्भात त्यांनी जी टीका केली त्यावेळी फुले शूद्र जातीचे होते म्हणून चिपळूणकर थोडे तरी समजून घ्यायला तयार होते. शूद्रांचे दुःख त्यांना समजत होते असे निदान ते म्हणाले तरी होते. पण लोकहितवादींच्या बाबतीत तोही मुद्दा नव्हता. स्वतः ब्राह्मण जातीत जन्म झाला असूनही ते ब्राह्मणावर हल्ला करीत होते आणि तोही अत्यंत कडक भाषेत. ब्राह्मणांना त्यांनी लबाड व मूर्ख म्हटले होते. त्यांनी देश बुडविला, संस्कृतविद्या वेडगळ/ निरर्थक आहे, हिंदूधर्म रसातळाला गेला आहे, एतद्देशीय राजे म्हणजे पशु, ऐतखाऊ, शास्त्री व भटांची विद्या कवडी किमतीची नाही, कर्मकांड संपले पाहिजे, सुधारणा झाली पाहिजे, इंग्रजी राज्यामुळे आता जे काही होईल ते, अन्यथा आपली धडगत नाही, आपला पराभव आपल्या मागासलेपणामुळे झाला, अशा पद्धतीची मते त्यांनी शत पत्रांतून अत्यंत परिणामकारक भाषेत मांडली होती. चिपळूणकरांना ब्राह्मण, संस्कृत व हिंदूधर्म चिनी गोष्टी प्रिय व त्यावर लोकहितवादी हल्ला करतात हे चिपळूणकरांना खपले नाही. त्यांनी मेकॉलेकडून शिकलेली वादविवादाची पद्धत, निबंध लिहिण्याची शैली, स्वतःच विकसित केलेल्या मराठी भाषेचा पुरेपूर उपयोग करून लोकहितवादींचा त्यांना प्रिय असणाऱ्या गोष्टींवरील हल्ला परतवून लावला. ज्याप्रमाणे फुल्यांवर टीका करताना त्यांनी मागेपुढे पाहिले नाही तसेच लोकहितवादींवर प्रतिहल्ला करताना कशाची भीडभाड ठेवली नाही. उपहास, आक्रमकता, विनोद, खिल्ली उडविणे, चेष्टा करणे, आडून हल्ला करणे इत्यादी सर्व शास्त्रांचा मुक्त वापर त्यांनी त्याच केला. ब्राह्मणांची अशी तरफदारी त्यानंतर विसाव्या शतकात ब्राह्मणेतर चळवळीच्या वेळी करण्यात आली पण त्याला चिपळूणकरांच्या जोश नव्हता. लोकहितवादींचा प्रतिसाद करीत असताना मालाकारांनी स्वतःचे विश्लेषणही दिलेले आहे. एका वर्षापेक्षा जास्त काळ चाललेल्या याटीकायज्ञात बरेच विषय येऊन गेले आहेत. आपल्याला याठिकाणी फक्त ब्राम्हणांची बाजू चिपळूणकरांनी कशी लढविली आहे ते पाहायचे आहे. अर्थात ब्राह्मणांवरील टीकेला उत्तर देण्यासाठी सर्वात जास्त पाने खर्च झाली आहेत हेही नोंदले पाहिजे. प्रथमतः चिपळूणकर हे स्पष्ट करतात की, गेल्या शतकात ब्राह्मणांनी क्षत्रियांची भूमिका बजावून मराठा साम्राज्य देशभर वाढविले, शौर्य व मुत्सद्दीपणाचे त्याकाळात असाधारण दर्शन झाले. नाना फडणीसाच्या मुत्सद्दीपणाबद्दल ग्रँट डफ वगैरेचे प्रशंसापर उतारे देऊन व पेशव्यांचा इतिहास सांगून चिपळूणकर त्यांचा मुद्दा पटवून देण्याचा प्रयत्न करतात. लोकहितवादींना पेशव्यांचा इतिहास ज्ञात नव्हता. फडणीसांची कामगिरी व झेप त्यांच्या लक्षात आली नव्हती. इंग्रजांकडे व स्वतःकडेच काय ते शहाणपण आहे असा त्यांचा गैरसमज होता अशी टीका चिपळूणकर करतात.

 

ब्राह्मणांच्या विद्वत्तेचा गौरव

लोकहितवादींनी जुन्या ब्राह्मण पंडितांना महामूर्ख म्हटले होते व त्यांच्या ज्ञानाबद्दल चेष्टा केली होती. त्यास उत्तर देताना मालाकार म्हणतात की, ज्याप्रमाणे विल्सनसारख्या मिशनर्‍यांना किंवा मेकॉले व मिल सारख्या इंग्रजी लेखकांना प्राच्यविद्येमधील काहीही कळत नव्हते तरीही ते बेलाशक अभिप्राय देत असत तसेच लोकहितवादींची झाले होते. त्यांनी जर विल्यम जोन्स, कोलब्रुक, मॅक्सम्युलर यांच्यापैकी कोणाचे ग्रंथ वाचले असते तर त्यांना संस्कृत साहित्याचे थोरवी कळली असती. लोकहितवादींचा संस्कृतमधील ज्ञानाबद्दल असा आक्षेप होता की ते ज्ञान उपयुक्त नाही. व्यवहारात त्याचा काही उपयोग नाही. या आक्षेपासही मालाकारांनी उत्तर दिले आहे. खऱ्या विद्येपासून काय लाभ होणार असा प्रश्न पडतच नाही. आणि हा निकष लावला तर,'विद्यादेवीचे' कितीतरी 'मुलुख ओसाड पडतील', खगोलशास्त्र, भूगर्भशास्त्र, मानववंशशास्त्र किंवा पुरातत्त्वविद्या असे बरेच विषय बंदच करावे लागतील. व्याकरण, अलंकार, मीमांसा हे संस्कृत मधील विषय जर निरर्थक आहेत तर मग इंग्रजी भाषेतील व्याकरण वगैरेही निरुपयोगी आहे, काय असा प्रश्न ते विचारतात. पाश्चिमात्य देशांत अद्यापही ग्रीक, लॅटिन भाषा शिकण्याची प्रथा आहे, सोय आहे तर मग इकडे संस्कृतची का नसावी? मेकॉलेच्या शिक्षण विषयक धोरणामुळे इंग्रजी शिक्षणात सरकार उत्तेजन देते आहे हे त्यांना माहित होते व त्याची महती त्यांना मान्य होती. अलीकडे पदार्थविज्ञानाच्या संबंधाने पुष्कळ शोध लागले आहेत व इतिहासाचे अंग संस्कृत विद्येस मुळीच नाही हे त्यांनी याच लेखात मान्य केले होते. इंग्रजी विद्येची प्रशंसा त्यांनी कशी केली होती हे आपण लेखाच्या सुरुवातीसच सविस्तरपणे नोंदविले आहे.

जुन्या शास्त्री-पंडितांच्या विद्येमुळे मनुष्य व्यवहारशून्य होतो असा एक आरोप लोकहितवादींनी केला होता त्यावर मालाकार उत्तर देतात की, पाणिनीचे व्याकरण शिकल्यास मनुष्य 'कूचकामाचा' होतो व दादोबा पांडुरंगाचे शिकला तर होत नाही किंवा शंकराचार्यांचा अभ्यास केला तर बिघडते व व बर्कलेचा केला तर बिघडत नाही कसे? लोकहितवादींनी ब्राह्मणांच्या हिंदूधर्मातील वर्चस्वावर टीका केली होती. त्यास उत्तर देताना मला काय म्हणतात, धर्माचा सर्व अधिकार प्रथमपासून ब्राह्मणांकडे चालत आला आहे. सर्वच धर्मांत जसा कोणतातरी वर्ग अधिकारी असतो तसाच हिंदूधर्मात ब्राह्मणांकडे पूर्वापार आहे. ब्राह्मणांचे हे वर्चस्व सर्वांस पूर्वीपासूनच सहन होत नाही. विश्वामित्रापासून ब्राह्मणांशी स्पर्धा चालू आहे. बुद्धानेही प्रयत्न केला परंतु शंकराचार्यांपुढे त्याचे काहीही चालले नाही. पुढे मुसलमान आले व ख्रिश्चनही बाहेरून आले. पण या सर्वांना दाद न देता आजपर्यंत ब्राह्मण 'प्रमुखचे प्रमुख' राहिले आहेत. जेव्हा कोणत्याही राष्ट्राचा जम बसून त्याची सर्व प्रकारची व्यवस्था लागते तेव्हा अर्थशास्त्र सांगितलेला श्रमविभाग सुरू होतो. कोणत्याही देशात गृहस्थ व भिक्षुक अशी विभागणी होतेच. अशावेळी एखाद्या भिक्षुक आला धर्मकृत्य सोडून दुसरे काही येत नाही असे म्हणणे व्यर्थ आहे. लोकहितवादींना जो इंग्लंड प्रिय आहे तेथेही ही भिक्षुकांचा प्रकार आढळतो. सर्वात सुधारलेला खंड युरोप खंड आहे व त्यात सर्वात प्रगत देश इंग्लंड पण तेथे भटांचा द्वेष आढळत नाही. तिकडे तर पाद्री लोकांचे फारच प्रस्थ आहे. वैदिक काळात जातिभेदाचा प्रकार मुळीच नव्हता, असा सिद्धांत प्राच्यविद्यातज्ञ मांडू लागले आहेत. तेव्हा त्या काळात ब्राह्मणांचे प्रस्थ नव्हतेच. पुढे चार वर्णन आले असावेत. जे जे ज्या ज्या वर्णात योग्य त्यात त्यांचा अंतर्भाव झाला असेल. ज्ञानी व तपोनिष्ठ असतील त्यांच्यावर ब्राह्मणत्वाचा शिक्का बसला असेल. असे होता होता वरील तिन्ही वर्गातून ही निसटलेली जी गाळीव रत्ने ती व कदाचित मूळचे रहिवासी अडाणी लोक यांचा चौथा वर्ग झाला असेल. आर्यांनी जिंकलेल्या लोकात शूद्रांचा किंवा भिल्लांचा समूळ नि:पात केला असा पुरावा नाही. असे पाहता ब्राह्मणास दोष देण्यास कारण राहत नाही. गुणावरून जात ठरली असेल तर उच्च-नीच भाव ब्राह्मणांनी निर्माण केला असे कसे सिद्ध होते? पाश्चात्य पाद्रयांपेक्षा आपले ब्राह्मण थोडक्यात गुजराण करतात. पाद्री थाटात राहतात.

ब्राह्मणांकडे इतर वर्णाहून, विद्वत्व, पावित्र्य वगैरे गुण अधिक आहेत व सर्व पूज्यतेचे अधिष्ठान असलेल्या धर्मावर त्यांचा अधिकार असेल. त्यांच्याकडे विशेष पूज्यत्व व असावयास कोणता प्रत्यवाय आहे? हे अज्ञानी माणसाने ज्ञानी माणसाचे श्रेष्ठ मानणे हा हा अन्याय आहे काय असे प्रश्न मालाकार विचारतात. म्लेंच्छ लोक आपल्यापासून आपल्या आचार-विचारात पुष्कळच बदल होत आहेत. त्यामुळे ग्रांथिक वचनांचा आधार घेऊन टीका करण्यापेक्षा प्रत्यक्ष परिस्थितीकडे लक्ष द्यावे. ब्राह्मणांना शिक्षा वेगळ्या व कमी असत असा आक्षेप घेतला असता मालाकार युरोपियन लोक हिंदुस्थानात स्वतःला न्यायालयात वेगळे नियम लावतात याकडे वाचकांचे लक्ष वेधतात. ब्राह्मणांनी विद्या लपून ठेवली या आरोपास मालाकार फार गमतीशीर उत्तर देतात. वेद व इतर सर्व विद्या शिकण्याचा अधिकार सर्व द्विजांस म्हणजे पहिल्या तिन्ही वर्गांस आहे. " चवथा जो मंदबुद्धी शूद्रवर्ग त्यासही पुढे पुराणद्वारा सर्व ज्ञान करून घेण्यास खुला मार्ग झाला." शेवटी टीकेचे व हल्ल्याचे एक वर्ष पूर्ण झाल्यावर टीकायज्ञाची सांगता करताना मालकार म्हणतात की, चाळीस वर्षे लोकहितवादींनी पसरविल्या समजुती अनर्थ करीत होत्या त्यातून फुले वगैरे शूद्र हेसुद्धा स्फूर्ती घेत होते तेव्हा त्यांचा समाचार घेणे आवश्यक होते. सजातीय लोकहितवादी शूद्रांना, मिशनर्‍यांना व इतरांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सहाय्य करीत होते असे विष्णुशास्त्रींना वाटत होते म्हणून त्यांच्या ब्राह्मणांवरील टीकेला कडक भाषेत उत्तर देणे व ब्राम्हणांचे समर्थन करणे आपले कर्तव्य मानले. अत्यंत जाणीवपूर्वक, ठरवून व पद्धतशीरपणे ब्राह्मणांची तरफदारी करणारे एकूण १२ निबंध लिहिण्यात विष्णूशास्त्रींनी फक्त ब्राह्मणांचेच समर्थन केले आहे असे नव्हे तर जातीसंस्थेमधील विषमतेचीही एका अर्थाने भलावण केली आहे व त्यासाठी त्यांना भाषाशास्त्रज्ञांनी व व प्राच्यविद्यातज्ञांनी मांडलेला आर्यवंशाचा सिद्धांत उपयोगी पडला.

 

विषमतेचे समर्थन

महात्मा फुले व लोकहितवादी या दोघांच्या ब्राह्मणांवरील टीकेला ब्राह्मणांचे सच्चे प्रतिनिधी म्हणून उत्तर देणाऱ्या विष्णुशास्त्रयांना निबंधमाला बंद केल्यानंतर व केसरीत लिहिताना पुन्हा या विषयाकडे वळावे वाटले. केसरीत १५ मार्च व २२ मार्च १८८१ रोजी ' ज्याच्या त्याच्या ब्राह्मणावर कटाक्ष' असा लेख लिहून त्यांनी पुन्हा एकदा ब्राम्हणाची बाजू लढविली. अन्य जातीच्या लोकांनी किंवा परदेशी मंडळींनी ब्राह्मणांचा हेवा करावा हे त्यांना संभवनीय वाटते पण ब्राह्मणांनी स्वतःच एकमेकांची उणी बाहेर काढणे त्यांना नापसंत होते. विष्णूशास्त्रींचे म्हणणे की ब्राह्मणांना वर्चस्व प्राप्त झाले त्यांच्या कर्तृत्वामुळे. ज्यास शहाणपण आहे व सामर्थ्य आहे त्यांना दुसऱ्यावर वर्चस्व बस व्हावेसे वाटते व ते त्यास बसविताही येते दुसऱ्यांनी त्यांना निष्कारण  दोष देण्यात अर्थ नसतो. त्याऐवजी त्यांनी शहाणपण व सामर्थ्य संपादावे व दोन हात करून निसटुन जावे. ज्यांना ब्राह्मणांचे धर्मातील वर्चस्व रुचत नसले त्यांनी नवे धर्म स्थापावे. इतर धर्मप्रसारकांप्रमाणे ब्राह्मणांनी राक्षसी उपाय योजले नाहीत. ख्रिस्त्यांनी किंवा मुसलमानांनी जसे इतर धर्मीयांचे छळ केले तसे ब्राह्मणांनी केव्हाही केले नाही. शुद्ध मनवळणीने त्यांनी धर्मवर्चस्व मिळविले. राजकीय वर्चस्व महाराष्ट्र त्यांनी गेल्या शतकात स्थापन केले तेही विष्णुशास्त्रींना स्वाभाविक वाटले. मनुष्यस्वभावाला व इतिहासाला हे धरूनच झाले. शहाणपणा अंगी आल्यावर त्याच्यापासून आपले हीत करून घेण्याचा प्रयत्न कोण करीत नाही ? धर्माची किल्ली एकदा हाती सापडल्यावर अंमल स्थापन करण्याची अनेक उदाहरणे इतिहासात सापडतात. "बळी तो कानपिळी अशीच जगाची राहटी आहे.” " धर्मात, व्यवहार व राज्यकारभारात सर्वांचे एकमेकांशी सारखे कंदन चालले आहे. बडा मासा छोट्या माशास गिळण्याचा सदा प्रयत्न करीत असतो.” अशा तऱ्हेने विष्णुशास्त्री ब्राह्मणांच्या धर्मातील व राजकारणातील वर्चस्वाचे समर्थन करतात. हे करीत असताना ते जी विधाने करतात व उदाहरणे देतात, यातील अपरिहार्यता दाखवितात यावरून असे दिसते की, त्यांच्यावर सामाजिक डार्विनवादाचा एकोणिसाव्या शतकातील युरोपातील प्रबळ विचाराचा प्रभाव पडलेला होता. या ' सर्व्हायवल  ऑफ फिटेल्ट' नैसर्गिक नियमाचा समाजातील विषमतेचा पुरस्कार करण्यासाठी वापर करणे हे सामाजिक डार्विनवादाचे एक महत्त्वाचे होते. चिपळूणकरांनी नेमके ते उचलून जातिसंस्था तील 'ब्राह्मणांच्या वर्चस्व' सेल स्पष्टीकरण दिले व ते कसे अपरिहार्य अटळ आहे किंवा अपरिवर्तनीय नियमाचा आहे हे दाखवून दिले.

जातिभेद हा विषय चिपळूणकरांच्या लिखाणात सतत कसा डोकावतो किंवा त्यावर सविस्तपणेही ते कसे लिहितात हे आपण पाहिले. त्यांचा 'देशोन्नती' हा शेवटचा लेख मानला जातो. तो केसरीच्या २८ फेब्रुवारी व ७ मार्च १८८२ या दोन अंकात प्रसिद्ध झाला होता. या लेखात ते देशाभिमानाची चर्चा करतात. जन्मभूमीचा अभिमान आपल्या देशात शिथिल होण्यास दोन मोठी करणे झाली आहेत - विस्तीर्णत्व व जातिभेद. यातील दुसऱ्याचा आपल्याला येथे विचार करायचा आहे. चिपळूणकरांचे म्हणणे असे की, जातीभेदाने आपल्या राष्ट्रात फूट पडली आहे." अठरापगड जातीस अठरा टोपकरांनी गुंडाळून टाकले व साऱ्यांच्या हाती सारखीच करवंटी दिली. इंग्रजी राज्यात भरतखंड एक राष्ट्र बनले आहे. आता देशाचा अभिमान निर्माण होईल.” "सांप्रत हास्यास्पद होऊन राहिलेला जो जातिभेद, त्याच्या संबंधाचा वेडगळपणाचा पीळही कमी कमी होत जात जाऊन, या देशातील सगळ्या जाती देशबंधुत्वाच्या थोरल्या नात्यात अंतर्भूत होऊन, बारीक सारीक क्षुद्र भेदांची मातब्बरी लोक तादृष धरणार नाहीत व एकोप्यापासून सर्वांचे हित आहे हे दिवसेंदिवस अधिकाधिक समजू लागतील". अशी आशा त्यांना वाटत होती.

 

सावरकरांचे पूर्वसुरी

विष्णुशास्त्री लेखनाचा सविस्तर आढावा घेतल्यावर आपण पुन्हा एकदा त्याच निष्कर्षापर्यंत येतो की त्यांच्या विचारावर पौर्वात्यवादाची दाट छाया होती. ही छाया इतकी दाट होती की त्यांचा स्वतः किंवा भारतीय परंपरेला विचार कोणता हे कळणे मुश्कील होते. प्रारंभी म्हटल्याप्रमाणे विष्णुशास्त्रींच्या तत्वज्ञानात व स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारत कमालीचे साधर्म्य आढळले. जणूकाही शास्त्रीबुवांचाच विचार सावरकर विसाव्या शतकातल्या बदललेल्या संदर्भात जास्त परिपक्वपणे मांडत आहेत. राजकारणात टिळक व चिपळूणकर हे आपले गुरु होत असे सावरकरांनी म्हटले होते. ते टिळकांचे कितपत शिष्य होते सांगायचे ठिकाण नाही पण एवढे मात्र खरे की चिपळूणकर हे सावरकरांचे गुरु  होऊ शकतात. सावरकरांच्या तत्वज्ञानाची बीजे चिपळूणकरांचे लेखनात दृष्टीस पडतात. सावरकरांनी अनेक निबंध पाश्चात्य संस्कृतीची तरफदारी केली आहे. पाश्चात्य वैज्ञानिकांचे कौतुक केले आहे. दोन शब्दात दोन संस्कृती या निबंधात त्यांनी दिंड व युरोपीय संस्कृती ची तुलना करून युरोपीय समाजाची तरफदारी केली आहे. देवभोळेपणा व धर्मभोळेपणा वर ते नेहमी टीका करतात. ते सुधारणावादी होते अंधश्रद्धा वर त्यांनी अनेक निबंध हल्ला केला केलेला आहे. उत्क्रांतीवाद तत्त्वज्ञान त्यांनी अंगिकारले होते त्यातील बळी तो कान पिळी हा न्याय त्यांना मान्य होता. विषमतेचे अप्रत्यक्ष व प्रत्यक्ष व समर्थन सावरकरांच्या विचारात आढळते. वंशशुद्धी  व वर्णश्रेष्ठत्व मानित तसेच ब्राह्मणांच्या श्रेष्ठत्वाचे समर्थनही करीत जातिभेदांमुळे आपला परिवार झाला असे त्यांचेही मत होते. हिंदुत्वासाठी सर्व जातींनी एक आले पाहिजे असे त्यांचे मत होते. हिंदुत्वाचा अभिमान हा त्यांच्या तत्वज्ञानाचा गाभा होता. या सर्व मुद्द्यांचा एकत्र विचार केला तर असे दिसते त्यातील जवळजवळ सर्वच विचारांचे प्राथमिक स्वरूपात का प्रारंभ विष्णुशास्त्री यांच्या लेखनात झाला होता.

 

----------------------------------------------------------------------------------------------------------

आधुनिकता आणि परंपरा : एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र (वर्ष) मध्ये प्रकाशित