राजेंद्र व्होरा :
प्रस्तुत पुस्तकात मधु वाणी यांनी रा.स्व.संघाचा सर्वांगांनी विचार केठेला आहे. त्या दृष्टीने पाहता मराठीतील संघावरील है अशा प्रकारचे पहिलेच पुस्तक आहे. वाणी यांनी संघाच्या स्थापनेपासून गुजराथच्या दंगलीपर्यंतचा इतिहास . थोडक्यात मांडला आहे, तसेच संघ परिवाराची जातकुळी कोणती आहे याचे विश्लेषण केले आहे. संघ ही फॅसिस्ट संघटना आहे, याचे साधार विवेचन त्यांनी केले आहे. इंग्रजीत संघावर जे लेखन झाले आहे त्यातही बऱ्याच अभ्यासकांनी संघाच्या विचारप्रणालीवर प्रकाश टाकताना फॅसिझमचा उल्लेख केलेला आहे. ही गोष्ट खरीच आहे की संघाने युरोपातील फॅसिझम (१९२८-४५) व नाझीझम (१९३३-४५) मधून स्फूर्ती घेतली होती. आक्रमक राष्ट्रवाद, व्यक्तिस्वातंत्र्यविरोध, लोकशाही व समाजवादास विरोध, प्रस्थापित राजकीय पक्षावर टीका, एकाधिकारशाहीवर आधारलेल्या पक्षाची सत्तेतील मक्तेदारी, अलौकिक नेत्यावर विश्वास, पक्षाचे निमलष्करी स्वरूप, जनतेच्या चळवळी उभ्या करण्यासाठी खोट्या प्रचाराचा अवलंब, दहशतवादी मार्गांचा वापर, हिंसेचे उदात्तीकरण, एखाद्या समाजगटाबद्दल शत्रुत्व, सत्ताधारी वर्गाच्या हिताचे रक्षण, सर्वस्पर्शी व सर्वंकष हुकूमशाही व गुप्त पोलीस यंत्रणा अशी फॅसिझमची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. फॅसिझमचा जो सर्वमान्य सिद्धांत आहे, त्याप्रमाणे फॅसिझमचा उदय सर्वसाधारणतः प्रगत औद्योगिक समाजात होतो. ताकदवान भांडवलदार वर्ग व सुसंघटित कामगार वर्ग असेल अशा देशात जर सामाजिक व आर्थिक पेचप्रसंगामुळे अनिश्चितता आली असेल व त्यास तोंड न देऊ शकणारा मध्यमवर्ग असेल आणि लोकांचा राजकीय व्यवस्थेवरील विश्वास उडाला असेल, तर फॅसिझमचा उदय होण्याची शक्यता असते. समाजवादी, साम्यवादी चळवळींचा पराभव होऊन त्यांचे नीतिधेर्य खच्ची झाले असेल तर फॅसिझमचे फावते. फॅसिस्ट पक्षाकडे राजकीयदष्ट्या जागृत, भीतिग्रस्त मध्यमवर्ग आकृष्ट होतो. छोटे भांडवलदार, छोटे व्यापारी, शेतकरी, पांढरपेशे व कनिष्ठ कर्मचारी फॅसिस्टांच्या प्रचारास भुलतात. आर्थिक पेचप्रसंगावर मात करण्यासाठी भांडवलदार वर्ग फॅसिझमचा आश्रय घेतो आणि आपले वर्चस्व पुन्हा स्थापन करतो.
महायुद्धपूर्व इटली व जर्मनीमधील राजवटीमध्ये वरील लक्षणे दिसून आली. फॅसिझमचा सिद्धांत त्यावरूनच तयार झाला आहे असे म्हणता येईल परंतु फॅसिझम ही आता इतिहासजमा झालेली गोष्ट आहे. भांडवलशाहीतील पेचप्रसंगावर मात करण्यासाठी सर्वंकष हुकूमशाहीची गरज अलीकडे भासत नाही. सामाजिक नियंत्रणाचे सुप्त मार्ग उपलब्ध झालेले असल्यामुळे मोठे संघर्ष टाळता येतात. तसेच पेचप्रसंगांवर मात करण्याचे नवनवे मार्ग पुढे आले आहेत (उदा. जागतिकीकरण). साम्यवाद-समाजवादाचा 'धोका' टळला आहे. नव-उदार मतप्रणालीचा व संस्कृतीचा प्रसार सर्वदूर होत गेला आहे. नव-उदार विचाराच्या प्रभावामळे आर्थिक मुद्यांबाबत सहमती निर्माण झाली आहे राजकारणातून सामान्यांच्या पोटा-पाण्याचे प्रश्न एका अर्थाने हद्दपार झाले . त्यांच्या चळवळींचा प्रभाव कमी झाला. (भारतासारख्या देशात हे जास्त लांगू पडते) अशावेळी राजकारणात पाठिंबा मिळविण्यासाठी इतर मुद्यांचा उपयोग करणे सुरू झाले. भावनिक मुद्यांवरून जनतेला रस्त्यावर आणणे सुरू झाले भांडवलशाही व राजकारण यांचा एकास एक असा संबंध बऱ्याच वेळा नसतो संसदीय राजकारणाचे स्वतःचे एक गतिशास्त्र असते. प्रबळ वर्गाचे राजकारणावर पूर्ण नियंत्रण राहत नसते.. राजकारणात निर्माण होणाऱ्या अंतर्विरोधाची सोडवणूक करण्याचे प्रयत्न राजकीय शक्ती व पक्षांकडून चालू असतात. त्याचाही एक परिणाम म्हणून वांशिक/धार्मिक मुद्दे पुढे येतात शिवाय भांडवलशाही पेचप्रसंगापासून कधीच मुक्त होऊ शकत नाही. छोटे का होईना, अंतर्विरोध निर्माण होतातच व त्यावर मात करण्यासाठी भांडवलशाही प्रयत्न करत असते. राजकारणातील व भांडवलशाहीतील अशा अंतर्विरोधावर मात करण्याचा जो प्रकार सर्वदूर वाढतो आहे, त्यास नव-फॅसिझम असे म्हणता येईल. प्रभुत्वशाली वर्गातील अंतर्विरोधावरचे उत्तर म्हणूनही नव- फॅसिझम अवतरतो.
नव-फॅसिझममध्ये फॅसिझमची काही वैशिष्ट्ये दिसून येतात परंतु नव- फॅसिझम स्वतःच्या पक्षाची राजवट आणेलच असे नाही, त्या पक्षाचे राज्य आले तरी ते सर्वकष व सर्वस्पर्शी असेलच असे नाही. नव-फॅसिझम बळाचा हिंसेचा व दहशतीचा वापर करेल पण देश-काल परिस्थितीप्रमाणे त्याचा कमी- अधिक वापर केला जातो. विचारप्रणालीचे वर्चस्व महत्त्वाचे असते. सत्ताधारी पक्षाला किंवा राजवटीला उजवीकडे - अतिरेकी बाजूला ढकलण्याचे काम नव-फॅसिझम करतो. ख्रिश्चन किंवा मुस्लिम मूलतत्त्ववाद, वंशवांद, उग्र एतद्देशीयवाद यांचे स्वरूप नव-फॅसिस्ट असते. स्थितीवाद्यांना नव-फॅसिझम आपल्या बाजूला ओढतो. जनतेच्या चळवळी उभ्या करून आपला पाठिंबा वाढवतो. निवडणुकीदारे सत्तेवर येतो. प्रस्थापित पक्षांच्या दुर्बलतेचा फायदा घेऊन असा पक्ष सत्ता ताब्यात घेऊ शकतो. सत्तेवर आल्यावर लोकशाही प्रथा पायदळी तुडवून लोकशाहीचा देखावा चाळू ठेवतो. नव-फॅसिझम बऱ्याच ठिकाणी पक्षाऐवजी संघटनेदवारे पुढे येतो. अतिरेकी/दहशतवादी कारवायांतून स्वतःची राजकीय ताकद सिद्ध करतो. दबावतंत्राचा उपयोग करून घेतो. सामाजिक, आर्थिक अंतर्विरोध, बेकारी, भणंगपणा, हिंसक संस्कृती, काळा व्यवहार, गुन्हेगारी, व तीव्र स्पर्धा यांसारख्या घटकांमुळे नव-फॅसिझम एका अर्थाने उदयाला येतो व याच घटकांच्या साहाय्याने वाढतोही.
आपल्या देशात नव-फॅसिझम हिंदुत्ववाद व मूलतत्त्ववादाच्या रूपाने अवतरला आहे. त्यातील हिंदुत्ववाद जास्त प्रभावी व ताकदवान असल्याने व त्याने स्वतःचा एक परिवार स्थापून शिवाय राजकीय पक्षादवारे पुढे जाण्याचा मार्ग अवलंबल्यामुळे तो जास्त आक्रमक बनला आहे. नव-फेॅसिझमच्या उदयाची व वाढीची याआधी नोंदवलेली कारणे भारताला काही अंशी लागू पडतातच, तसेच येथील विशिष्ट परिस्थितीही नव-फॅसिझमचा प्रसार होण्यास कारणीभूत ठरली आहे. भारताच्या अर्थकारणात निर्माण झालेले अंतर्विरोध, नव्या मध्यम वर्गाचा झालेला उदय व त्याची हिंसक संस्कृती, नव-उदार मतप्रणालीचे वर्चस्व व आर्थिक मुद्यावरील सहमती, काँग्रेसच्या घसरणीमुळे निर्माण झाठेली पोकळी, बहुजनवादी जातयादाची घसरण, धर्मनिरपेक्षतेचा पोकळपणा, शहाबानोसारखी प्रकरणे, गैरकाँग्रेसवादाच्या आहारी जाऊन समाजवाद्यांनी हिंदुत्ववादी शक्तींना दिलेला अवकाश, कामगार वर्गाच्या चळवळींचे खल्चीकरण, प्रसंगी काँग्रेसने घेतलेली सौम्य हिंदुत्ववादी भूमिका, भणंग भांडवलाचा शहरातील वाढता प्रभाव, अशा घटकांमुळे हिंदुत्ववादाची ताकद वाढण्यास मदत झाली आहे. (विस्तारभयास्तव याची सविस्तर चर्चा टाळली आहे.)
मधु वाणी यांचे पुस्तक मराठीत असल्याने त्याचा वाचक वर्ग मराठी व महाराष्ट्रीय असणार म्हणून महाराष्ट्रात रा.स्व.संघाचे काय स्थान आहे याची चर्चा करणे येथे अप्रस्तुतत ठरणार नाही.
संघाला महाराष्ट्रात पाठिंबा मिळविणे फारच अवधड गेले आहे. खरे पाहिले असता महाराष्ट्रातच संघाचा जन्म झाला. हिंदुत्वाची मूलभूत पुस्तकेही येथूनही निर्माण झाली. पहिले तीन सरसंघचालक महाराष्ट्रीयच होते. संघाचे मुख्य कार्यालय महाराष्ट्रातच आहे. मराठी प्रचारकांनी संघ देशभर नेला. असे असतानाही संघ या मातीत म्हणावा तसा वाढला नाही. महाराष्ट्राबाहेर वाढल्यावरच संघाला सत्तास्थानी येता आले. मराठी राज्यात सत्तेत येण्यासाठी त्याला शिवसेनेची मदत घ्यावी लागली.
महाराष्ट्र देश हा ब्राह्मणेतर वादासाठी प्रसिद्ध आहे. शंभर वर्षानंतरही ब्राह्मणेतरवाद येथे संपला नाही. महात्मा फुल्यांचा सत्यशोधकवाद येथे अद्याप तग धरून आहे. संघाकडे एक ब्राह्मणी संघटना म्हणून आजही पाहिले जाते. महात्मा गांधींची हत्या एका ब्राह्मण हिंदुत्ववाधयाने केली होती, याचा विसर आजही पडलेला नाही. मराठा-कुणबी जातसमूह सर्वांत प्रभावशाली गट म्हणून येथे ब्राह्मणांशी दोन हात करूनच पुढे आला आहे.
छत्रपती शिवाजी किंवा शाहू महाराज यांना क्षत्रियत्व नाकारणाऱ्या मराठी ब्राह्मणांवरील राग आजही धुमसतो आहे. दलितांचे तारणहार म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर उभे राहिले तेही या महाराष्ट्रातच. ब्राह्मण समाजव्यवस्थेस नकार देण्याची हिंमत आंबेडकरांनी या समाजात निर्माण केली, त्यावेळी हिंदुत्ववाद उभा राहण्याचा दुबळा प्रयत्न करीत होता. दलित! हे एक राजकीय चिन्ह म्हणून उभे राहिले व ब्राह्मणी राजकारणाला अटकाव झाला; हिंदू म्हणून मरणार नाही अशी शपथ घेणाऱ्या व बुद्ध धर्माचा स्वीकार करणाऱ्या आंबेडकरांच्या अनुयायांमध्ये हिंदुत्वाबद्दह आकस निर्माण झाला होता. दलित पँथर्सनी हिंदू देवदेवतांची व कर्मकांडाची अवहेलना करण्यात पुढाकार घेतला. दलित साहित्यातून हिंदूंच्या जातिव्यवस्थेवर आधारलेल्या समाजावर तीव्र प्रहार करण्यात आले. तसेच समाजसुधारणेच्या चळवळीची मोठी परंपरा असलेल्या महाराष्ट्रात उदारमतवादी दृष्टिकोन उभा राहू शकला. भक्तिमार्ग व वारकरी परंपरेमुळे हिंदू धर्मातील उदार परंपरा ताकदवान होऊ शकली. गांधीवादी व समाजवादी विचारानेही बराच सांस्कृतिक अवकाश येथे व्यापला होता.
अशा सामाजिक वातावरणात संघाचे स्वयंसेवक चेष्टेचा व विनोदाचा विषय बनले त्याच्या अर्ध्या चड़ीमुळे व लाठीमुळे. हिंदु महासभावाले पूर्वी संघावर “संघटनेसाठी संघटना' या मुद्यावरून टीका करीत असत. कारण संघाने 'अराजकीय' दृष्टिकोन घेतला होता. काही सावरकरवाद्यांनी संघास सोडचिठ्ठी दिली. संघाचे बंदिस्त घुसमटवणारे वातावरण त्यांना पटले नाही. त्यांनी स्वत:च्या संस्था, संघटना काढल्या. या संदर्भात देवल, पेंडसे यांची उदाहरणे प्रसिद्ध आहेत. जनसंघाच्या उमेदवारांची चेष्टा केली जायची, कारण त्यांची अनामत रक्कम दरवेळी जप्त होत असे. थोडक्यात म्हणजे संघ ही एक क्षीण राजकीय शक्ती होती. तिचा पाठिंबा शहरी ब्राह्मण कनिष्ठ मध्यम वर्गापुरता किंवा थोड्याबहुत व्यापाऱ्यांपुरता मर्यादित होता.
संघ परिवाराने अशा स्थितीतून एक महत्त्वाची राजकीय शक्ती होण्यापर्यंत वाटचाल केली आणि १९९५ मध्ये शिवसेनेबरोबर तो राज्यात सत्तेवर आला. या वाटचालीचा प्रारंभ ८ मे 9९७४ साली बाळासाहेब देवरस यांनी वसंत व्याख्यानमालेत दिलेल्या भाषणातून झाला असे म्हटले, तर फार चुकीचे होणार नाही. जातिसंस्थेवर, त्यातील विषमतेवर व अस्पृश्यतेवर टीका करून या दोषांमुळे हिंदू समाजाचे विघटन कसे झाले आहे व धर्मांतरे होणे कसे सोपे जाते, अशी मांडणी देवरसांनी त्या ठिकाणी केली. जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनात व नंतर आणीबाणीविरोधी चळवळीत संघाने भाग घेतला व मुख्य प्रवाहात येण्यास सुरुवात केली. तुरुंगात संघ व इतर नेते यांच्यात संवाद होऊन काँग्रेस विरोधात एकत्र येण्याचे ठरले. १९७४ मध्ये तयार झालेला हा बनाव दुहेरी सभासदत्वाच्या मुद्यापर्यंत टिकला (9९७९). नंतर संघ परिवाराला एकट्यालाच वाटचाल करावी लागली. त्यांच्या १९८० मधील गांधीवादी समाजवादाला महाराष्ट्रात पाठिंबा मिळाला नाही. मीनाक्षीपुरम् (तमिळनाडू) येथे १९८१ साली झालेल्या दलितांच्या धर्मांतरावरून देवरसांचे “सामाजिक बाजूवर' जोर देण्याचे धोरण खऱ्या अर्थाने पुढे आले, त्यातूनच डॉ.आंबेडकरांच्या (हिंदू पंचांगाप्रमाणे डॉ. हेडगेवारांची जयंती) जयंतीदिवशी (१४ एप्रिल) १९८३ साली सामाजिक समरसता मंचची स्थापना झाली. डॉ.आंबेडकरांचे हिंदूकरण करण्याचा प्रयत्न करण्यास संघाने सुरुवात केली. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरास पाठिंबा दिला. समरसता साहित्य संमेलने भरवली. डॉ.आंबेडकरांच्या “रिडल्स इन हिंदुइझझम' या प्रकरणात सामोपचाराची भूमिका घेतली. १९९१ नंतर समरसता मंचने भटक्या व विमुक्त जमातींपर्यंत आपले कार्यक्षेत्र वाढविले. या जमातींना हिंदू ओळख देण्याचा प्रयत्न केला. महारेतर दलित जातीमधील महारांबद्दलच्या द्वेषाचा उपयोग करून त्यांना आकृष्ट करून घेतले. या जातींच्या ऐतिहासिक पुरुषांचे उदात्तीकरण केले. गोळवलकरांच्या काळात जातिसंस्थेबद्दल पुराणमतवादी भूमिका घेणारा संघ देवरसांच्या कारकिर्दीत जातिसंस्थेतील उतरंडीबद्दल उघडपणे बोलू लागला व समरसता झाल्याशिवाय एकी होणार नाही असा मुद्दा मांडू लागला. संघ परिवाराने व विशेषत: भाजपने मराठेतर जातींना आकर्षित करून घेण्यास सुरुवात केठी. इतर मागास जातींना पक्षात पदे दिली. धनगर, वंजारी, माळी यांना चुचकारून त्यांच्या जातसंघटना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. विदर्भात कुणबी नेतृत्व पुढे आणले. खानदेशात लेवा पाटलांना स्थान दिले. मुंबईत अमराठी नेत्यांना हिंदुत्वाच्या मुद्यावरून पुढे आणले
परंतु जातवादी राजकारण करणे हे काही संघ परिवाराचे प्रधान उद्दिष्ट नव्हे. मुख्य ध्येय आहे, सर्व जात-जमातींना हिंदुत्वाची ओळख देण्याचे. लोकांमधील धार्मिकतेचा उपयोग करून घेऊन हे केले जाते, किंवा सर्व जातींचा समान शत्रू म्हणून मुस्लिमांना रंगवले जाते. हिंसाचाराचा किंवा दंगलींचा उपयोग त्यासाठी केला जातो.. हिंदुत्वाची जाणीव निर्माण करणे व वाढविणे हे बराच काळ चालणारे कार्य आहे. काहीवेळा हे कार्य वरून दिसतही नाही. महाराष्ट्रात संध परिवाराने स्वतःकडे हिंदुत्वाची जाणीव निर्माण करण्याची जबाबदारी घेतली आहे व दंगलीसाठी लागणारी कृतिप्रवणता वाढविण्याचे काम मुख्यतः शिवसेनेकडे दिले आहे, असे म्हणता येईल. हिंदु- मुस्लिम दंगलीत संघ परिवाराचा सहभाग मर्यादितच राहिला आहे, शिवसेना महाराष्ट्रात बजरंग दलाची भूमिका वठविते, म्हणून येथे बजरंग दल मोठ्या प्रमाणावर वाढले नाही. संघाने पडद्याच्या मागे राहून हालचाली करण्यावर भर दिलेला दिसतो. संघ व सेनेचे काम एकमेकांना पोषक ठरले आहे. संघाने वैचारिक क्षेत्रापासून फटकून राहण्याचेच धोरण अंगीकारले होते. महाराष्ट्रातील विचाराचे जग बहुजनवाद, उदारमतवाद, गांधीवाद व समाजवादानेच व्यापलेले होते. संघाने स्वतःच्या कोषात राहून काम करण्याचे धोरण अवलंबले होते. अलगपणे काम करणे व विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करण्याचा दृष्टिकोन संघाने घेतला; बौद्धिकताविरोध हेच त्याचे वैशिष्ट्य होते. साहित्य-संस्कृती-विचार या क्षेत्रांत संघाचे अस्तित्व नगण्य होते. हे सर्व जवळजवळ १९८०पर्यंत चालले होते. पण त्यानंतर संघ परिवाराने वैचारिक, सांस्कृतिक क्षेत्रात मोठ्या हस्तक्षेपाची भूमिका घेतली. साहित्य संमेलन, साहित्य संस्था, वाचनालये, वादविवाद सभा, व्याख्यानमाला, वृत्तपत्रे, शैक्षणिक संस्था संघाने एकतर आपल्या नियंत्रणाखाली आणल्या किंवा नव्याने स्थापन केल्या. 'हिंदुत्ववादी विचारवंत हा प्रकार पूर्वी ऐकीवात नव्हता तो आता निर्माण झाला. संघ परिवाराने आपल्या परीने वैचारिक मांडणी करण्यास सुरुंवात केली. “विवेक'सारखे साप्ताहिक जोमाने चालविले. रमेश पतंगे आणि भिकू इदाते यांसारखे लेखक पुढे आणले. आंबेडकर, फुले यांच्यावरही लिहिण्याचे धाडस करणारी ही मंडळी आपल्या मांडणीतून समतेऐवजी समरसता पुढे आणू लागली. समाजवादी, पुरोगाम्यांच्या चर्चासत्रांना नावे ठेवणारे संघवाले स्वतःच त्यात भाग घेऊ लागले. त्यांचा नवशिकेपणा त्यांना नडला. लपवाछपवी व कावेबाजपणा याने ग्रासलेले लेखन मराठीत त्यामुळे प्रसिद्ध झाले. हिटलरचे व नथुराम गोडसेचे उदात्तीकरण करणारे साहित्य त्यातूनच पुढे आले. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गौरवाने व गांधीजींना खलनायक करणाऱ्या लेखनाने मराठी भाषेत शिरकाव केला. महाराष्ट्रातील संघ परिवार बुद्ध धर्माचा स्वीकार करणाऱ्या आंबेडकरांवर अरुण शौरीसारखे वार करणार नाही; पण गांधीजींच्या अहिंसेची व परधर्मसहिष्णुतेची खिल्ली उडविण्यात मागे राहणार नाही. गांधीजींच्या हत्येवरील पुस्तकाच्या आवृत्त्या मागे आवृत्त्या निघत आहेत व नाटकाचे प्रयोग जोरात चालू आहेत. पूर्वी गांधीजींची चेष्टा संघवाल्यांच्या कुटुंबांत होत असे; आता ती उघडपणे होते आहे. सावरकरांबद्दल काय भूमिका घ्यायची हे ठरले नसल्यामुळे संघ त्यांच्यापासून थोडे अंतर राखूनच असे. पण आता सरळ सरळ सावरकरवादी भूमिका संघाने घेतली आहे. देवरसांनी संघात सावरकरवादी भूमिका केंद्रस्थानी आणली. गांधीजींच्या चळवळीमुळे बहुजन स्वातंत्र्य चळवळीत आले व ब्राह्मणांचे सीमांतीकरण झाले, म्हणून गांधीजींवर मराठी ब्राह्मणांचा फारच राग आहे. तसेच त्यांचा अहिंसावाद संघाच्या हिंदुत्वाला छेद देणारा आहे. म्हणूनही गांधीजींवर संघाचा रोष आहे. धार्मिक क्षेत्रात हस्तक्षेप करणे संघाला फारच अवघड गेले. हिंदू धर्म म्हणजे हिंदुत्व हे समीकरण महाराष्ट्रात रूढ करणे अवघड होते. सामान्य लोक वर म्हटल्याप्रमाणे उदार भक्तिसंप्रदायाच्या प्रभावाखाली आहेत. येथील मुसलमान मुख्यत्वेकरून मागास जातींमधून आलेले आहेत, ते हिंदूंच्याबरोबर खेड्यापाड्यांत अनेक वर्ष एकत्र राहात आहेत. त्यांचे बरेच सण व दैवते सामायिक आहेत. लोकसंस्कृतीचा प्रभाव खेड्यांतील जनमानसावर आहे. शहरातील गणपती उत्सवात सर्व जाती-जमातीचे सामान्य लोक एकत्र येतात. अशा धार्मिक संस्कृतीत हिंदुत्वाचे बीज रोवण्यास व वाढविण्यास संघाला बराच काळ लागला. अप्रत्यक्षरित्या संघाचे काम करणारे काही गट किंवा संस्था आहेत, त्यांचे साहाय्य संघाला लाभले आहे. रामदास संप्रदायाचा प्रभाव शहरी मध्यमवर्गात वाढणे, 'सनातन प्रभात'सारख्या संप्रदायाला अनुयायी मिळणे यांतून हे घडले आहे. पतित पावन संघटना किंवा हिंदू एकता आंदोलनाने हिंदुत्व ब्राह्मणेतरांपर्यंत नेण्याचे कार्य केले आहे. गणपती उत्सवात संघाला शिरकाव करणे फारसे जमलेले नाही. मुंबईत शिवसेना व पुण्यात कॉँग्रेसचा प्रभाव या उत्सवावर आहे. ब्राह्मणी चेहरा असलेल्या संघास हे जमले नाही. रामशीला पूजनाच्या वेळी स्थानिक मराठा नेतृत्वाची मदत त्यांना घ्यावी लागली. मुंबईतील नवरात्री महोत्सवावर नियंत्रण करणे संघ परिवाराला किरीट सोमय्या किंवा प्रकाश मेहता या गुजराथी नेत्यांकरवी जमलेले आहे. जुन्या उत्सवांना हिंदुत्वाचा राजकीय रंग देणे संघाला फारसे जमले नाही. वारकरी संप्रदायातही त्यांनी असा प्रयत्न करून पाहिला. पण नव्या उत्सवात (नवरात्री) ते शक्य झाले. मुंबईतील भाषिक अल्पसंख्यांक व अमहाराष्ट्रीय लोकांना हिंदू ओळख सोयीची वाटली असे म्हणता येईल. अशा प्रकारे १९७४-७५ नंतर व विशेषतः १९८१ नंतर महाराष्ट्रात संघ परिवाराची ताकद वाढली. त्यापूर्वी संघाच्या वाढीवर फारच मर्यादा पडल्या होत्या. संघाने आपली व्यूहरचना आणि डावपेच बदलल्यानंतर त्याची वाढ होऊ शकली. तरीसुद्धा आजही भाजप स्वतःच्या ताकदीवर सत्तेवर येईल अशी स्थिती नाही. १९९५ मध्ये तो शिवसेनेच्या मदतीने महाराष्ट्रात सत्तेवर आला, पण त्यानंतरच्या दोन निवडणुकीत भाजप व शिवसेना युती विजयी होऊ शकली नाही. काँग्रेसचे राजकारण, मराठ्यांचा प्रभाव व त्यांनी प्रसंगी घेतलेली 'क्षत्रिय हिंदुत्वाची' भूमिका हे घटकही महाराष्ट्रात हिंदुत्वाच्या
वाढीवर मर्यादा आणतात हे लक्षात घेतले पाहिजे; असो.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरील प्रस्तुत पुस्तकाचे स्वागत महाराष्ट्रातील चोखंदळ वाचक करतील अशी मला खात्री वाटते.
- राजेंद्र व्होरा.
टीप :-- ही प्रस्तावना लिहिताना माझ्या पुढील लेखांचा संदर्भ म्हणून उपयोग केला आहे.
“हिंदुत्ववादाचे नव-फॅसिस्ट स्वरूप', समाजप्रबोधन पत्रिका (जाने-मार्च १९९३).
“गुजरातचा व्यापक संदर्भ व मध्यमवर्गात पडलेली फूट', समाजप्रबोधन पत्रिका
(एप्रिल-मे २००२ 'Political Mobilization in Maharashtra', दिल्ली
विद्यापीठातील एका परिसंवादात सादर केलेला निबंध (१६ डिसेंबर २००४).
--------------------------------------------------
म ( ) मध्ये प्रकाशित